चर्चगेट-विरार एलेव्हेटेड प्रकल्पाचे घोडे अजूनही अडलेलेच असून केंद्रीय नियोजन आयोग आणि रेल्वे बोर्ड यांची दिल्ली येथे मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक होत आहे.
मुंबई- चर्चगेट-विरार एलेव्हेटेड प्रकल्पाचे घोडे अजूनही अडलेलेच आहे. गेल्या वर्षीपासून होऊ घातलेल्या राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन यांच्यातला सहकार्य करार अजूनही प्रलंबित आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नियोजन आयोग आणि रेल्वे बोर्ड यांची दिल्ली येथे मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत या प्रकल्पाबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता रेल्वेच्या सूत्रांनी व्यक्त केली.
चर्चगेट-विरार एलेव्हेटेड प्रकल्प हा २४ हजार कोटी रुपयांचा असून, तो सार्वजनिक, खासगी भागिदारीतून राबवला जाणार आहे. हा प्रकल्प राबवत असताना राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, त्यापूर्वी राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन यांच्यात सहकार्य करार होणेही तितकेच गरजेचे आहे.
मात्र हा करार अजूनही झालेला नाही. याकडे केंद्रीय नियोजन आयोग गंभीरतेने पाहत आहे. त्यामुळे मंगळवारी तातडीने रेल्वे बोर्डाबरोबर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत रेल्वे बोर्ड आपली भूमिका मांडणार असून, राज्य सरकारच्या भूमिकेबाबतही या बैठकीत चर्चा केली जाईल.