राज्यात व मराठवाडयात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून फडणवीस सरकारकडून कोणतीही ठोस उपाययोजना न करता केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.
मुंबई- राज्यात व मराठवाडयात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून फडणवीस सरकारकडून कोणतीही ठोस उपाययोजना न करता केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.
मराठवाडयात दोन दिवसांच्या दुष्काळी पाहणी दौ-यांदरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. शेतक-यांच्या आत्महत्यांचा आकडा तीन हजारांवर गेला आहे. तरीही योग्यवेळी कर्जमाफी देवू म्हणारे फडणवीस सरकार आणखी किती शेतक-यांचा बळी घेणार आहे, असा सवालही चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला.
राज्याबरोबर केंद्र सरकार दुष्काळी उपाययोजनांबाबत उदासीन आहे. मुख्यमंत्र्यांनी दीर्घकालीन योजनांसाठी केंद्र व रिझर्व्ह बँकेकडे जरूर हात पसरावेत. परंतु तातडीच्या योजना राबवाव्यात. दिल्लीला जाणा-या मुख्यमंत्र्यांनी अनुभवी विरोधकांनाही सोबत घेतले असते तर योग्य ठरले असते, असा चिमटाही चव्हाण यांनी काढला.