महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाच्या मागण्यांवरील चर्चेत बोलताना काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दिकी यांनी टीकेची झोड उठवली.
महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाच्या मागण्यांवरील चर्चेत बोलताना काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दिकी यांनी टीकेची झोड उठवली. राज्यात एखाद्या व्यवहारात भ्रष्टाचार होत असेल तर त्याच्या विरोधात बोलून सरकारवर झोड उठवणे, हे तर विरोधी पक्षाचे काम समजले जाते. परंतु विधानसभेत बुधवारी सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच सरकारला लक्ष्य केले. मुंबईतल्या काही भ्रष्टाचारांना वाचा फोडत महानगरपालिकेत सत्तेवर असलेल्या भाजप-शिवसेना युतीवरही ताशेरे ओढले. मुंबईचा कचरा ज्या भागात नेऊन टाकला जातो त्याला डंपिंग ग्राउंडमध्ये कोटयवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा त्यांनी आरोप केला. डंपिंग ग्राउंडमध्ये जमा होणा-या कच-यांमध्येही कोटयवधी रुपयांचा भ्रष्टाचार होऊ शकतो, ही बाबच कल्पनेच्या पलीकडची आहे. परंतु आमदार बाबा सिद्दिकी यांनी मुंबईच्या देवनार, कांजूर मार्ग, मुलुंड येथील कचरा डेपो आणि डंपिंग ग्राउंडमध्ये नऊ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा घणाघाती आरोप केला. मुंबईची महानगरपालिका ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीच्या ताब्यात आहे. म्हणून बाबा सिद्दिकी यांनी या युतीला टीकेचे लक्ष्य बनवले आहे. या नऊ हजार कोटी रुपयांच्या डंपिंग घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष कार्यदल नेमावे, अशीही मागणी त्यांनी केली. त्यामुळे राज्य सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे. कच-यामध्ये कसला भ्रष्टाचार होणार असे सामान्यत: वाटू शकते. परंतु वस्तुस्थिती फार वेगळी आहे. सध्या कचरा, शेण अगदी मलमूत्र यांनासुद्धा सोन्याचा दर आला आहे. दुष्काळी भागामध्ये जनावरांच्या छावण्या उघडलेल्या असतात आणि तिथे सरकारतर्फे जनावरांना चारा आणि पाणी पुरवले जाते. तिथे रात्रंदिवस जनावरे बांधलेली असतात. अशा या जनावरांच्या छावण्यांमध्ये जनावरांचे शेणसुद्धा पडलेले असते आणि ते एकत्रित करून त्यांचा ढीग बनवलेला असतो. शेणाचे काय पैशात रूपांतर होते का? असा प्रश्न पडू शकतो. कारण शहरात राहणा-या लोकांना शेणाची किंमत कळत नाही. अगदी एखाद्या बैलगाडीचा साठा भरून शेणसुद्धा ५०० ते १००० रुपये किमतीचे असते. त्यामुळे २००३च्या दुष्काळात सरकारने छावण्यातल्या शेणाकडे दुर्लक्ष केले. परंतु छावण्या उघडणा-यांनी ते शेण विकून साधारण २० कोटी रुपयांचा अपहार केला. त्याचे खटले अजून जारी आहेत. परंतु आपण जी गोष्ट दुर्लक्षित समजतो ती प्रत्यक्षात कोटय़वधी रुपयांची असते, हे विसरता कामा नये. डंपिंग ग्राउंडचे असेच झालेले आहे. सध्या कच-याला फार किंमत आलेली आहे. कारण कच-यापासून खत तयार होते आणि त्या सेंद्रीय खताला शेतक-यांकडून प्रचंड मागणी आहे. एवढेच काय पण हा कचरा जाळून त्यापासून वीजही तयार केली जाते. म्हणजे हा कचरा त्या अर्थाने ‘कचरा’ नाही. नाही तर आपण वाया जाणा-या वस्तूंना कचरा म्हणत असतो. पण शहरातला कचरा हा कचरा नसून लक्ष्मी आहे. म्हणून त्या कच-यातसुद्धा भ्रष्टाचार होत आहे. हा कचरा खत म्हणून विकूनसुद्धा बराच पैसा मिळत असल्यामुळे त्याच्या लिलावातही भ्रष्टाचार चालतो. तेव्हा शेणाप्रमाणे कच-याला उपेक्षित समजून बसलो तर त्यातून निर्माण होणा-या दुर्लक्षातून भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे लोक कोटी रुपये कमवून बसतील. त्यामुळे महापालिकेचे मोठे नुकसान होईल.