काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना एक पत्र पाठवले आहे. हे पत्र देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनातील घुसमटीला वाट मोकळी करून देणारे आहे. त्यामुळे ते पत्र जरी राणे यांनी पाठवले असले तरी ते त्यांचे हे व्यक्तिगत पत्र नाही. एक प्रकारे समस्त काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घुसमटीला वाचा फोडणारे ते पत्र आहे.
लोकसभा निवडणुकीत देशपातळीवर काँग्रेसचा मोठा पराभव झाला. इतका मोठा पराभव होता की, विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेेसला मिळण्यासाठी आवश्यक असलेली संख्याही काँग्रेसला गाठता आली नाही. पाठोपाठ महाराष्ट्र विधानसभेतही काँग्रेसचा पराभव झाला. दोन्ही ठिकाणी सत्ता गेली. लोकसभेत काँग्रेसला जेवढ्या जागा मिळाल्या, जवळपास तेवढ्याच जागा महाराष्ट्र विधानसभेत मिळाल्या आहेत. फरक एवढाच की, अधिकृतपणे विधानसभेत विरोधी पक्षाचा दर्जा काँग्रेसला मिळू शकला. तरीसुद्धा या दोन्ही पराभवानंतर सात महिने आणि विधानसभेच्या पराभवानंतर चार महिने झाले, काँग्रेस कार्यकर्ते खचल्यासारखे वाटत आहेत आणि नेते तर या पराभवाला आव्हान समजून रस्त्यावर उतरण्याच्या अजूनही मानसिकतेत नाहीत. भाजपाला यश मिळाले हे खरे. देशातली सगळी प्रचार साधने आणि सगळे भांडवलदार भाजपाच्या मागे उभे राहिले, हेही खरे. वातावरण काँग्रेसविरुद्ध करण्यात भाजपाला यश मिळाले, हेही मान्य केले पाहिजे; पण जे घडले त्यात दिखाऊपणा जास्त होता. लोकांच्या मनात काँग्रेसबद्दल एक प्रकारचा रागही होता. काँग्रेस पक्षानेही पक्ष म्हणून काही चुका केल्या होत्या. त्या सगळय़ा गोष्टी एकत्रित होऊन हा पराभव झाला; पण पराभव झाला म्हणून हताश होऊन किती दिवस बसणार. घरातही एखादी दुर्घटना घडली तर काही दिवस त्याचे दु:ख वाटणे स्वाभाविक आहे. पण नंतर ते सगळे झटकून पुन्हा माणसाला उभे राहावेच लागते. जी गोष्ट घरात आहे तीच गोष्ट राजकारणात आहे. नारायण राणे यांनी पत्रात व्यक्त केलेली भावना नेमकी याच स्वरूपाची आहे. काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची अत्यंत गरज आहे. लोकांमध्ये जायची गरज आहे. काय चुकले, त्या चुका शोधून काढण्याची गरज आहे. पक्षाचे जे नेते लोकांमध्ये नाहीत, मिरवण्यापुरते आहेत त्यांना किती महत्त्व द्यायचे, याचाही निर्णय करण्याची वेळ आलेली आहे. तालुका काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचे महत्त्व, काँग्रेस सत्तेत असताना फार कमी मंत्र्यांना समजले होते. त्यामुळे सत्ता एकीकडे आणि पक्ष एकीकडे अशी स्थिती होती. प्रदेश काँग्रेसनेही काही मूलभूत चुका केल्या. सत्तेत बसलेले तर पक्षापासून फटकूनच होते. राज्याचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते काँग्रेसची सत्ता असली तरी पक्षातर्फे मांडले गेले पाहिजेत, या सूत्राचा विसर पडला होता. खरं म्हणजे तालुका आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्षांमार्फत जी सामाजिक कामे समोर येतील, ती काँग्रेसच्या मंत्र्यांनी प्राध्यान्याने केली असती तर पक्षातल्या पदाधिका-यांनाही प्रतिष्ठा मिळाली असती आणि त्यामुळे ग्रामीण भागात पक्षाची पाळेमुळे रुजण्याकरिता त्याचा निश्चित उपयोग झाला असता. नारायण राणे यांनी पत्रात अशा जवळपास १६ मुद्यांची व्यवस्थित मांडणी केली आहे. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनात जे काही आहे, त्याला या पत्राच्या निमित्ताने वाचा फोडली गेली, हे सगळय़ात महत्त्वाचे आहे. कारण सातत्याने घुसमट होत राहणे, यातून असंतोष वाढतच जातो. तेव्हा कार्यकर्त्यांला काय वाटते? कार्यकर्ता जेव्हा थेट बोलू शकत नाही, तेव्हा नेत्याने बोलायचे असते. पण देशपातळीवर आणि महाराष्ट्रातल्या ब-याच नेत्यांनी गेले सात-आठ महिने मिठाची गुळणी तोंडात धरली आहे. मग बोलायचे कोणी? कोंडी फोडायची कोणी? लोकशाहीमध्ये ‘संवाद’ हे सगळय़ात मोठे साधन आहे. तुमच्या मनात काय आहे, हे जर समजले नाही, तर घुसमट वाढत जाणार. प्रश्न असा होता की, काँग्रेस कार्यकर्त्यांनी घुसमटून मरायचे, की लढून मरायचे? नारायण राणे यांच्या पत्राने काँग्रेस कार्यकर्त्यांची घुसमट मोकळी झाली आहे आणि जर काँग्रेसने विचारपूर्वक या पत्रातल्या प्रत्येक मुद्यांची चर्चा करून सामान्य कार्यकर्त्यांला शक्ती देण्याचा प्रयत्न केला, तर झपाटय़ाने ओसरत आलेल्या मोदी लाटेवर निश्चितपणे मात करता येईल, असा एक चांगला संदेश नारायणरावांनी पाठवलेल्या पत्रातून काँग्रेस कार्यकर्त्यांना जाणवलेला आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला यश मिळाले, हे खरेच; पण त्यांना एकूण मिळालेली मते ३८ टक्के आहेत आणि काँग्रेसला देशभर मिळालेली मते ३४ टक्के आहेत. जागांमधला फरक खूप असला तरी मतांच्या टक्केवारीत काँग्रेस फार मागे पडलेला नाही. याचे कारण देशाच्या कानाकोप-यात प्रत्येक गावात काँग्रेस आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, काँग्रेसला मानणारे लोक आहेत. देशाचे स्वातंत्र्य काँग्रेसने मिळवले, यावर लोकांचा ठाम विश्वास आहे, सगळय़ा जातीधर्माना बरोबर घेऊनच देश उभा राहील, या काँग्रेसच्या तत्त्वज्ञानाबद्दलही देशातल्या सर्वधर्मसमभाव जपणा-या सगळय़ांना आदर आहे. काँग्रेस कमी पडली नेतृत्वात. प्रचार उलटवून टाकण्यात. एकीकडे वाढती महागाई आणि त्याचवेळी सिलिंडरच्या किमती वाढवून सिलिंडरचे रेशनिंग करणे यामुळे देशातला समस्त महिलावर्ग काँग्रेसच्या विरोधात गेला. अशा अनेक चुका झाल्या आहेत. आता जे झाले ते झाले. १९७७च्या पराभवानंतर इंदिरा गांधी ज्या हिमतीने रस्त्यावर उतरल्या, त्याच हिमतीने काँग्रेसने उतरले पाहिजे. ‘इंदिराजी आता नाहीत’ असे म्हणून हाताची घडी घालून बसलात तर काहीच होणार नाही. काँग्रेसचा विचार तर निश्चित बरोबर आहे. काही दमदार नेतेही काँग्रेसमध्ये आहेत. त्यांच्यासह रस्त्यावर उतरण्याची भूमिका घ्या आणि मोदी सरकारच्या सात महिन्यांचा, फडणवीस सरकारच्या १०० दिवसांचा पंचनामा करायची तयारी करून रस्त्यावर उतरा. मोदींची जी हवा मे महिन्यात होती, ती हळूहळू कमी होत आहे. समुद्राची भरती कधीही १२ महिने टिकत नाही, ती ओसरत जाते. राजकारणातल्या यशाचेही असेच आहे. भाजपासारखे आणि मोदींसारखे जाती-धर्मावर मते मागून सत्ता मिळवणारे जे आहेत ते टिकाऊ नाहीत, दिखाऊ आहेत, हे लोकांच्या हळूहळू लक्षात यायला लागले. लोकसभेत मोदींना बहुमत मिळाले; पण महाराष्ट्रात भाजपाला बहुमत मिळू शकलेले नाही. शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करूनही मिळालेले नाही. भाजपासोबत फरफटत गेलेल्या शिवसेनेची अवस्था तर आणखीन वाईट आहे. त्यामुळे दिसायला महाराष्ट्रात सरकार बहुमतात असले तरी आतून ते पूर्ण कुरतडलेले आहे. काँग्रेसने हीच वेळ साधून १०० दिवसांत या सरकारने नुसती घोषणाबाजी केली आणि नाकाने कांदे सोलले, ते त्यांचे खोटेपण अतिशय प्रभावीपणे लोकांसमोर उघडे पाडण्याची गरज आहे. त्यासाठी गावागावात सभा, मेळावे व्हायला हवेत. यासाठी पक्ष प्रमुखांचे, अध्यक्षांचे राज्यभर दौरे व्हायला हवेत, सगळय़ांना बरोबर घेऊन फिरायला हवे. विश्वास द्यायला हवा आणि घ्यायला हवा. ही घुसळण झाली तर वातावरण बदलायला वेळ लागणार नाही. राणेसाहेबांनी या घुसमटीला वाचा फोडली. पुढचे काम पक्षाचे आहे.