गेल्या अनेक वर्षापासून अस्तित्वात असलेली आणि नागरिकांना अचूक सुविधा देणारी भारतातील सर्वात अग्रगण्य संस्था म्हणजे टपालसेवा. टपालसेवेसाठी भारत हा प्रथम क्रमांकावर आहे.
मुंबई- गेल्या अनेक वर्षापासून अस्तित्वात असलेली आणि नागरिकांना अचूक सुविधा देणारी भारतातील सर्वात अग्रगण्य संस्था म्हणजे टपालसेवा. टपालसेवेसाठी भारत हा प्रथम क्रमांकावर आहे. पूर्वी टपालसेवा फक्त सरकारी कामकाजाकरिताच वापरात होती. परंतु काळानुरूप या सेवेचा फायदा सामान्य लोकांनाही होऊ लागला. सुरुवातीच्या काळात या सेवेला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला; परंतु आताच्या ईमेल्स, इन्स्टन्ट मॅसेजिंगच्या जमान्यात टपालसेवेचा वापर लोकांकडून कमी होऊ लागला आहे. त्यामुळे डबघाईला आलेले हे टपाल आता ग्राहकांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी नवनव्या योजना राबवताना दिसत आहेत. या योजनांनाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद दिसून येतो. त्यामुळे नुकसानीत चाललेले टपाल आता पुन्हा स्थिरस्थावर होऊ पाहत आहे.
ग्राहकांना पुन्हा आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी राज्य सरकारने टपालसेवांमध्ये वाढ केलेली दिसून येते. टपाल खात्याने बँक सेवाही उपलब्ध केल्याने अनेक ग्राहक या योजनेकडे आकर्षित झाले आहेत. बँकसेवेसोबतच लोन सुविधाही टपाल खात्याकडून पुरवण्यात येत आहे. एक्सप्रेस पार्सल, ई-पोस्ट, आय. एम. ओ. स्पीड पोस्ट, बिझनेस पोस्ट, रिटेल पोस्ट इत्यादी सेवा देऊन टपाल खाते लोकांना आकर्षित करत आहेत. शिवाय स्वत:च्या नावाचा व फोटोचा वापर करून आपण तिकीट काढू शकतो. खासकरून तिकीट वाढदिवसाला भेट देण्यासाठी ग्राहकांचा कल आहे. यासाठी काही नियम व अटींची पूर्तता करावी लागते. सध्या नव्याने राबविण्यात येणा-या योजनेमध्ये सुकन्या समृद्धी योजनेचा नागरिक जास्त फायदा घेताना दिसत आहेत. या योजनेमध्ये १० वर्षाखालील मुलींना खाते उघडता येते. किमान एक हजार रुपये सुरुवातीला भरावे लागतात.
ही योजना मुलींच्या उच्च शिक्षणासाठी व लग्नासाठी अमलात आणली गेली आहे. मुलीच्या वयाच्या १८ वर्षानंतर ती उच्च शिक्षणासाठी ही रक्कम काढू शकते. शिवाय लग्नासाठी रक्कम काढायची असल्यास तिचे वय १८ र्वष पूर्ण असणे गरजेचे आहे. यामुळे मुलींच्या शिक्षण खर्चाचा प्रश्न सुटू शकतो व बालविवाह थांबण्यास मदत होऊ शकते.
इंटरनेटच्या जमान्यात आता टपालनेही एक पाऊल पुढे ठेवले आहे. आपल्या पार्सलबाबतची माहिती ऑनलाईन बघण्यासाठी टपाल खात्याने ट्रॅकिंग सेवा सुरू केली आहे.
शिवाय टपालच्या संकेतस्थळावर स्पीड पोस्ट, इंटरनॅशनल ई-एमएस, ई-मनी ऑर्डर, रजिस्टर मेल, एक्सप्रेस पार्सल आणि इलेक्ट्रॉनिक व्हॉल्यू पेयेबल पार्सल आदी पार्सलबाबतची माहिती नागरिकांना समजू शकणार आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच टपाल सेवेकडून डिजिटल आठवडा साजरा करण्यात आला. डिजिटल इंडिया या कार्यक्रमाचा उद्देश भारताला डिजिटल रूपात सशक्त बनवण्याचा होता. इंटरनेटच्या जमान्यातही टपाल सेवा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव-नव्या योजना अमलात आणत आपला कारभार वाढवत आहे. टपाल खात्यावर असलेला ग्राहकांचा विश्वासामुळेच एवढी र्वष टपाल सेवा अबाधित आपले कार्य ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकली आहे.