निवडणूका झाल्यानंतर नैसर्गिक वायूच्या किंमती वाढविण्यासंदर्भात निर्णय घ्या असे निर्देश निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला दिले आहेत.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/06/natural-gas.jpg)
नवी दिल्ली – निवडणूका झाल्यानंतर नैसर्गिक वायूच्या किंमती वाढविण्यासंदर्भात निर्णय घ्या असे निर्देश निवडणूक आयोगाने केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाला दिले आहेत. त्यामुळे तूर्तास ग्राहकांची गॅस दरवाढीतून सुटका झाली आहे.
गॅस दरवाढीच्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व बाबी ध्यानात घेऊन निवडणूक आयोगाने केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाला गॅस दरवाढीचा निर्णय पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा थेट फटका रिलायन्स इंडस्ट्रीजला बसणार आहे.
रिलायन्स आणि अन्य काही कंपन्यांसाठी केंद्र सरकारने येत्या एप्रिल महिन्यांपासून नैसर्गिक वायूच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला रंगराजन समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करता येणार नाही.
रंगराजन समितीने आपल्या अहवालात नैसर्गिक वायूची किंमत वाढवण्याची शिफारस केली होती. भारतात लोकसभा निवडणूकांसाठी अचारसंहिता लागू झाली आहे. मे महिन्यात नवे सरकार अस्तित्वात येईल. त्या सरकारची काय धैय्य, धोरणे आहेत त्यावर गॅस दरवाढीच्या निर्णय अवलंबून असेल.