शासनाने सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती योजना आखली. मात्र या योजनेसाठी निधी उपलब्ध झाला नसल्याने दलित वस्तींमधील स्वच्छतागृह व नळ पाणी योजनेचे लाभार्थी वंचित राहिले आहेत.
कुडाळ- शासनाने सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती योजना आखली. मात्र या योजनेसाठी निधी उपलब्ध झाला नसल्याने दलित वस्तींमधील स्वच्छतागृह व नळ पाणी योजनेचे लाभार्थी वंचित राहिले आहेत. या लाभार्थ्यांकडून शासनाने लाभार्थी हिस्सा म्हणून घेतलेला आहे. गेली दोन र्वष हा लाभार्थी हिस्सा शासन दरबारी पडून आहे.
शासनाने सुवर्ण महोत्सवी वर्षी दलित वस्तीसाठी योजना आखली होती. योजनेमध्ये दलित वस्तीतील नागरिकांना स्वच्छतागृह बांधण्यासाठी ११ हजार रुपये तर नळपाणी कनेक्शनसाठी ४ हजार रुपये देण्याचे ठरले होते. ही योजना वैयक्तिक स्तरावरची होती. तसेच लाभार्थ्यांना लाभार्थी हिस्सा म्हणून शासनाने ठरवून दिला होता. स्वच्छतागृह उभारणा-या लाभार्थ्यांला ३३० रुपये व नळकनेक्शनच्या लाभार्थ्यांसाठी १२० रुपये भरून घेण्यात आले होते.
कुडाळ तालुक्यात सुमारे ५०० लाभार्थी झाले होते. त्यापैकी काही लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. पण अजूनही बरेच लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. त्यांना शासनाकडून या योजनेचा लाभ मिळालेला नाही. पण या लाभार्थ्यांनी लाभार्थी हिस्सा ग्रामपंचायतीमध्ये भरलेला आहे. ही योजना २०१२-१३मध्ये आली होती. त्यावेळी लाभार्थ्यांनी लाभार्थी हिस्सा भरलेला होता. लाभार्थी हिस्सा भरूनही शासनाकडून या योजनेसाठी अनुदान आलेले नाही.
कुडाळ पंचायत समितीमधून या योजनेसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून पत्रव्यवहार करण्यात आलेले आहेत. यासाठी ५० लाख रुपये निधी अपेक्षित आहे. दलित वस्तीमधील नागरिकांना या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यांनी लाभार्थी हिस्सा भरून २ वर्ष उलटली तरी हे लाभार्थी या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत.