एकदा यशोदा माता यमुना नदीत दीपदान करत होत्या. दीपदान म्हणजे झाडाच्या पानावर पेटता दिवा वाहत्या प्रवाहासोबत सोडून देणे. पूजेबरोबरच ती प्रथेप्रमाणे सगळे दिवे एकेक करून यमुनेमध्ये सोडत होती. पण, पूजा संपल्यानंतर तिने प्रवाहावर नजर टाकली, तर लक्षात आलं की, आपण सोडलेले दिवे यमुना नदीच्या पात्रात तर दिसतच नाहीत आणि मध्येच दिवे बुडल्यासारखेही काही दिसत नव्हते. नीट निरखून पाहिल्यावर तिच्या लक्षात आले की, किना-यावर एके ठिकाणी तिचा लाडका कान्हा थांबला आहे आणि काही दिवे त्याच्या पायापर्यंत पोहोचले आहेत. कान्हा एकेक करून ते दिवे पाण्यातून बाहेर काढून ठेवत आहे.
यशोदेने विचारले की, लल्ला तू हे काय करतो आहेस..?
कान्हा म्हणाला, काही दिवे पुढे जाऊन पाण्यात बुडत होते मी त्यांना वाचवत आहे.
यशोदेने विचारले की, म्हणजे तू नेमके काय करत आहे?
कान्हा म्हणाला, अगं आई! जे जे दिवे या प्रवाहासोबत माझ्याकडे येतात, त्यांना मी उचलतो आणि काठावर ठेवतो. म्हणजे ते बुडत नाहीत.
यशोदा हसून म्हणाली, ‘अरे कान्हा, असे किती दिवे तू बाहेर काढून ठेवणार?’
यावर बाळकृष्ण तितकाच गोड हसून म्हणाला. अगं आई सगळेच दिवे मी वाचवणार नाही. पण, जे माझ्याकडे येतील त्यांना तर मी नक्कीच बुडण्यापासुन वाचवू शकतो ना! आणि माझ्यापासून जे दूर जातील, ते आपोआपच बुडतील.