कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात पोलिसांनी ‘सनातन’ संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता समीर विष्णू गायकवाड (३२) याला अटक केली आहे.
सांगली- ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येवरील रहस्याचा पडदा तब्बल सात महिन्यांनी दूर झाला असून, अखेर पोलिसांनी ‘सनातन’ संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता समीर विष्णू गायकवाड (३२) याला अटक केली आहे. मात्र, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक-यांबाबत पोलीस अद्याप अंधारातच चाचपडत आहेत. गायकवाड याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून, त्याच्या अटकेने हिंदुत्ववादी संघटनांचा या प्रकरणातील हात उघड झाला आहे.
सनातन संस्थेने मात्र समीर गायकवाडला पोलिसांनी विनाकारण या प्रकरणात गोवल्याचा आरोप केला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कर्नाटकातील विचारवंत प्रा. कलबुर्गी यांच्या मारेक-यांचा छडा लागण्याची आशा पोलिसांना गायकवाडच्या अटकेमुळे वाटू लागली आहे. पुरोगामी संघटनांनीही पोलिसांच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करीत असतानाच केवळ मारेकरी पकडून चालणार नाही, तर या हत्यांमागे ज्या संघटना आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
कामगार नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे या मॉर्निग वॉक करीत असताना १६ फेब्रुवारी, २०१५ रोजी त्यांच्यावर कोल्हापूर येथे गोळीबार करण्यात आला होता. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यातून उमा पानसरे बचावल्या तरी कॉ. गोविंद पानसरे यांचा मुंबई येथे २० फेब्रुवारी २०१५ रोजी उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.
या हत्येप्रकरणी कोल्हापूर येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगवेगळय़ा तपास यंत्रणा चौकशी करीत होत्या. पुरोगामी विचावंत आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडण्यात पोलिसांना अपयश आलेले असताना तसाच विचार पुढे घेऊन जाणारे कॉ. पानसरे यांची हत्या झाल्याने सरकार आणि पोलिसांवर मोठय़ा प्रमाणात टीका केली जात होती.
याबाबत पुरोगामी संघटनांनी वारंवार मोर्चे, निदर्शने आणि आंदोलने करून आपला संताप व्यक्त केला होता. अलीकडेच कर्नाटकातील पुरोगामी विचावंत प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर या आंदोलनाची धार अधिकच तीव्र झाली होती. या तिन्ही हत्याकांडामागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. समीर गायकवाडच्या अटकेनंतर अखेर तो खरा ठरला आहे. गायकवाड याचे सर्व कुटुंबच सनातनचे साधक असून ते गोव्यातील आश्रमात असल्याचे सांगण्यात येते.
सनातनचा कांगावा
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी समीर गायकवाड याला पोलिसांनी नाहक गुंतवले आहे. या प्रकरणाशी सनातन संस्था किंवा समीरचा कोणताही संबंध नाही. तो गणपतीसाठी सांगलीत आला असताना पोलिसांनी त्याला अटक केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली तेव्हाही सनातनच्या साधकांना पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली त्रास दिला होता. तेव्हा त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे न मिळाल्याने आमचे कार्यकर्ते निर्दोष सुटले होते. समीरच्या विरोधातही पोलिसांकडे कोणतेही पुरावे नसल्याने तो सुद्धा निर्दोष सुटेल असा आम्हाला विश्वास वाटतो, असे सनातनचे प्रवक्तेसंदीप शिंदे यांनी सांगितले.
हत्येमागील संघटनांवर कारवाई व्हावी
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे, ही समाधानाची बाब आहे. सात महिन्यांच्या परिश्रमानंतर पोलिसांना अखेर धागेदोरे मिळाले. परंतु केवळ मारेक-याला अटक करून ही प्रवृत्ती संपणार नाही. तर त्यासाठी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्यामागे कोणते विचार आहेत, कोणत्या संघटना आहेत त्याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, अशी मागणी मुक्ता दाभोलकर यांच्यासह पुरोगामी विचारांच्या संघटनांनी केली आहे.
कोण आहे समीर गायकवाड?
सांगली येथील रहिवासी असणारा समीर गायकवाड हा १९९८पासून सनातन संस्थेचा कार्यकर्ता आहे. त्याची पत्नीही सनातनच्या गोव्यातील आश्रमात साधक आहे. सांगली, मिरज भागात झालेल्या हिंदू-मुस्लीम दंगल प्रकरणी त्याच्यावर या पूर्वीच गुन्हे दाखल झालेले आहेत. तो मोबाईल फोन दुरुस्तीचे काम करतो. कॉ. पानसरे यांच्या हत्येनंतर आणि अगोदर जे फोनकॉल्स झाले त्याची तपासणी करण्यात आली होती. अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने तपास करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेनंतर महत्त्वाचे धागेदोरे हाती आले आहेत, अशी माहिती एटीएसचे अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार यांनी दिली.