गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र असल्याने गोव्यात येणा-या देशी-विदेशी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
पणजी- गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र असल्याने गोव्यात येणा-या देशी-विदेशी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तर भारतातील दिल्ली, हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरात तसेच महाराष्ट्रातील पर्यटकही मोठया प्रमाणात मुंबई-गोवा महामार्गाचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीचीही अनेक वेळा मोठया प्रमाणात कोंडी होते त्याचबरोबर रस्ता अपघातांची संख्याही वाढत आहे.
त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकार आणि गोव्यातील मुरगाव पोर्ट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई ते गोवादरम्यान कोकण रेल्वेच्या ‘रो रो सेवे’च्या धर्तीवर ‘कार ऑन सी’ हा अनोखा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.
विशेष म्हणजे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पास्रेकर यांनीही अशी योजना महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने महाराष्ट्र सरकारच्या विचारासाठी ठेवली असल्याचे वृत्तपत्र प्रतिनिधींकडे म्हटले आहे. हा ‘प्रयोग’ यशस्वी झाल्यास गोव्याकडे स्वत:चे वाहन घेऊन येणा-या प्रवाशांसाठी आणखी विशेष आकर्षण ठरणार आहे, असा विश्वास पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय भूपृष्ठ आणि महामार्ग तसेच जहाजोद्योग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या अलीकडेच झालेल्या दौ-यात अशा प्रकारची सेवा सुरू करण्याचे संकेत दिले होते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन कामात येणारे अडथळे आणि प्रत्यक्ष प्रवासादरम्यान वाहनचालकांना होणारे त्रास तसेच इंधनाची होणारी अब्जावधी रुपयांची बचत या गोष्टी विचारात घेऊन ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी म्हटले होते. त्याचीच कार्यवाही आता प्रभावीपणे सुरू होत आहे.
मुंबईतून प्राप्त झालेल्या खात्रिलायक माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारच्या साधन सुविधा मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता देण्यात येऊन हा प्रस्ताव राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. नवी मुंबईजवळील मांडवा, नेरुल, धरमतर न्हावाशेवा यांसारख्या बंदरांवर जेटी उभारून वा असलेल्या जेटींची सुधारणा करून गोव्यात येणारी चारचाकी वाहने बोटीतून गोव्याकडे आणण्याची ही सेवा असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पास्रेकर यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या या संकल्पनेला ‘हिरवा कंदील’ दाखवला असल्याने ही सेवा लवकरात लवकर अंमलात येईल, असा विश्वास गोव्यातील पर्यटन व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या सेवेसाठी गोव्यातील मुरगाव पोर्ट ट्रस्टनेही पुढाकार घेतला असून; आवश्यक साधन सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारीही दर्शवली आहे.