आपल्या संस्कृतीत गाय व गोवंश यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे गाईची ‘माता’ ही ओळख आहे. म्हणूनच तर तिला आपण ‘गोमाता’ म्हणतो. या ‘गोमाते’विषयी..
समुद्रमंथनात जी चौदा रत्नं निर्माण झाली, त्यातून ‘कामधेनू’ प्रकट झाली, अशी आपल्याकडे धारणा आहे. ‘कामधेनू’ म्हणजे गाय. ‘नंदिनी’, ‘सुभद्रा’, ‘सुरभी’, ‘सुशीला’ व ‘बटुका’ या पुराणातील पाच दैव कामधेनू. या पाच कामधेनू जगदग्नी, भारद्वाज, वसिष्ठ, असित आणि गौतम या श्रेष्ठ ऋषींकडे होत्या.
देवाधिकांकडेही गोकुळातील पशुधन होतं. ‘नंदी बैल’ हे भगवान शंकराचं वाहन, तर ‘वृषभ’ हे भगवान आदिनाथांचं (ऋषभदेव) स्वरूप. भगवान दत्तात्रेय आणि श्रीकृष्ण यांच्या सहवासात सदैव गाय असते. शैलपुत्री व गौरी यांचंही वाहन गाय आहे. गाईच्या आशीर्वादाशिवाय व मदतीशिवाय पापी लोक नरकाच्या वाटेतली वैतरणा नदी ओलांडून न्याय मागण्यासाठी जाऊ शकत नाहीत, असं पुराणात वर्णन आहे. प्राचीन नाण्यांवर गाय/बैलाचं चित्र कोरलेलं आढळतं. सम्राट अशोकाच्या सिंहमुद्रेवरही बैलाचं चित्र कोरलेलं होतं.
ही सिंह मुद्रा आता भारत सरकारनं आपलं अधिकृत चिन्ह म्हणून स्वीकारलं आहे. गोवर्धन पर्वताची पूजा करण्याकरता आजही गाईच्या शेणापासून बनवलेली प्रतिकृती वापरतात. गोपालष्टमी, वसुबारस, पोळा यांसारख्या सणांना गाय व तिच्या गोवंशाचीही पूजा केली जाते. या उदाहरणावरून हे स्पष्टच होतं की, गाय आणि तिची प्रतिष्ठा भारतीय संस्कृतीच्या केंद्रस्थानी आहे. यावरून भारतीय संस्कृती ही ‘गोसंस्कृती’ म्हणूनही ओळखली जाते.
आपली लाडकी गोमाता अनेक आश्चर्यकारक लोककथांचा विषय बनली आहे. सम्राट विक्रमादित्य हा रामाच्या जन्मस्थानाचा शोध घेत प्रयागराज येथे पोहोचला. तिथे त्याला साक्षात्कार झाला. ज्या स्थानावर एखादी गाय तिच्या चारही कासांतून दुग्धाभिषेक करताना दिसेल तीच रामजन्मभूमी. त्यानुसार विक्रमादित्य शोध घेत गेला आणि त्याला साक्षात्कार झाला. त्यानुसार अयोध्येतील विशिष्ट स्थानी गाय दुग्धाभिषेक करताना त्याला दिसली. तिथे थोडं उत्खनन केल्यावर प्राचीन रामजन्मभूमीच्या मंदिराचे अवशेष त्याला सापडले. अगदी अशीच कथा भगवान महावीर (२४वे र्तीथकर ) यांच्या समाधीस्थानासंबंधी सांगितली जाते.
श्री वल्लभाचार्य मथुरेहून जातिपुरा गावापर्यंत शोध घेत आले. या ठिकाणी दुग्धाभिषेक करणारी गाय त्यांनी पाहिली. तिथे त्यांनी श्रीनाथजी (नाथद्वारा) मंदिराची स्थापना केली. तिरुपती बालाजी मंदिराची जागाही दुग्धाभिषेक करणा-या गाईनंच दाखवून दिली होती. सुरतमधील कातारेश्वर मंदिराच्या शिवलिंगावर गाय दुग्धाभिषेक करताना भक्तांनी पाहिली होती. जोधपूरजवळच्या भेडता येथे भक्तिमयी मीराचं जन्मस्थान आहे. तिथे भगवान चार भुजाजी मंदिर उभं करताना हीच खूण भक्तांनी पाहिली होती. वृंदावन येथील श्रीगोविंदजी मंदिर, वाझियाबादचं दुधेश्वर महादेव मंदिर, भगवान एकलिंगजींचं मंदिर हीसुद्धा दुग्धाभिषेक करणा-या गोमातेनंच दाखवून दिली असल्याचे पुराणात संदर्भ आहेत. पहाटे गाईचं दर्शन होणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. गावात शिरताना गाईचं दर्शन झालं, तर नियोजित काम शंभर टक्के होणार, असं मानलं जातं.
हजारो गावांची नावं, माणसांची नावं, वस्तूंची नाव गाईवरूनच ठेवली आहेत. उदा. ‘गोपुरी’, ‘गोझटी’, ‘गोरखपूर’, ‘गोवा’, ‘गोध्रा’, ‘गोंदिया’, ‘गोपुरम’, ‘गोपल’, ‘गोविंद’, ‘गोदावरी’, ‘गोवर्धन’, ‘गौतम’, ‘गोमूल’, ‘गोमुख’, ‘गोकर्ण’, ‘गोधाम’, ‘गोलोक’, ‘गोखरू’, ‘गोदा’, ‘गोयल’, ‘गोचर’, ‘गोरोयन’, ‘गोरज’, ‘गोधुली’, ‘गोदान’, ‘गोग्रास’ इ. ‘गो’ हा प्रत्यय लावला की, विशेष पावित्र्याचा बोध होतो.
गोचर म्हणजे गाईसाठी राखून ठेवलेलं कुरण. कोणतीही गाय गवत खाताना ते कधीच मुळापासून उखडत नाहीत. ती केवळ गवताची पाती खाते. त्यामुळे गवताची मुळं पक्की राहतात. श्वेतांबर साधू व साध्वी पाच कुटुंबांकडून गोचरी घेतात. इथे हीच संकल्पना आहे. एखादी मधमाशी प्रत्येक फुलातून थोडा थोडा मध गोळा करते व त्या फुलांचं फलन व्हायला पोषक वातावरण निर्माण करते. अगदी त्याचप्रमाणे सेवाक्षेत्रात काम करणाऱ्यांकडून जनतेचं शोषण न होता, त्यांचं अधिक सक्षमीकरण होणं अपेक्षित असतं. या संकल्पनेचं मूळ उगमस्थान म्हणजे गाय.
‘गोघृत’ म्हणजे गाईच्या दुधापासून तयार झालेले तूप (भेसळ नसलेलं, प्रक्रिया न केलेलं) हे यज्ञकार्यात वापरतात. पूजास्थानाच्या शुद्धीकरणासाठी ती जागा गाईच्या शेणानं सारवून घेतात. पंचामृत हा यमाचा प्रसाद असतो. ‘गोदुग्ध’, ‘गोमूत्र’ व ‘गोदधी’ एकत्र करून पंचगव्य बनवतात. यावरील आयुर्वेदिक प्रक्रियांनी पंचामृत बनवतात. आयुर्वेदात याचं फार महत्त्व आहे. ‘गोबर’ शब्द खरं तर ‘गोवर’ असाच आहे. त्यापासून इंधन केक, बायोगॅस, खत, जैविक खतं तयार होतात. या खतांमुळे जमिनीचा कस वाढतो. रासायनिक खतं ही जमीन निकृष्ट आणि विषारी बनवतात. यावरूनच गाय ही आपल्या नित्य आयुष्यात किती महत्त्वाची आहे, हे लक्षात येईल.