मुंबईतील शिवाजीनगर, गोवंडी भागात जवळपास १० हजार बालके कुपोषित असल्याचे महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात स्पष्ट केले.
नागपूर – मुंबईतील शिवाजीनगर, गोवंडी भागात जवळपास १० हजार बालके कुपोषित असल्याचे महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात स्पष्ट केले.
या भागात जवळपास १० हजार मुले कुपोषित असून त्यांच्या आरोग्य सुधारणेबाबत आमदार विद्या चव्हाण यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. या भागात मध्यम कमी वजनाची १८६७, तीव्र कमी वजनाची ४६५ बालके असल्याचे त्यांनी लेखी उत्तरात सांगितले.
कुपोषण कमी व्हावे किंवा बालकांची स्थिती सुधारण्यासाठी आरोग्यविषयक सर्व काळजी घेतली जात आहे. शिवाय पालकांनाही सकस आहाराबाबत सल्ला दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे, पालघरलाही कुपोषणाचा विळखा
ठाणे पालघर जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, पालघर आणि डहाणू तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे. या तालुक्यात दोन हजारांपेक्षा जास्त मुले कुपोषित असल्याचे महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले. या दोन्ही जिल्ह्यांत जून २०१४ अखेपर्यंत तब्बल १३५१४ मुले तीव्र कमी वजनाची आढळली आहेत. ५६ हजार ७४६ बालके ही मध्यम कमी वजनाची असल्याचे आढळले आहे.
आरोग्य यंत्रणेच्या विस्कळीत कारभारामुळे हे कुपोषण वाढत आहे. त्यावर उपाययोजना झालीच पाहिजे, याविषयीचा तारांकित प्रश्न निरंजन डावखरे यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना पंकजा यांनी ही माहिती दिली. आरोग्य विभागाच्या विस्कळीत कारभारामुळे कुपोषण वाढल्याची बाब त्यांनी नाकारली.
लाकडांची चोरटी वाहतूक करणारी वाहने जप्त करणार
जंगलात वृक्षतोड करून लाकडांची चोरटी वाहतूक करणारी वाहने यापुढे जप्त केली जाणार आहेत. शिवाय त्यानंतर कोणाला न्यायालयातही जाता येणार नाही, असा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी विधान परिषदेत सांगितले.
मात्र त्या वाहनातील वनसंपदेची किमत तीन लाखांपेक्षा जास्त असावी लागणार आहे. वन विभागात मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. अवैध वृक्ष तोडीबाबतचा प्रश्न माणिकराव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
वाडा तालुक्यात खैर आणि सागाची तस्करी
वाडा तालुक्यातील वन परीक्षेत्रात खैर, साग आणि इतर झाडांची तस्करी होत असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले. इतकेच नाही तर तस्करांकडून वनसंरक्षक व वनपालांवर हल्ले होत असल्याची बाबही त्यांनी मान्य केली. त्यामुळे वन कर्मचा-यांना संरक्षणासाठी हत्यारे देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आमदार जगन्नाथ शिंदे यांनी वाडा तालुक्यातील वनक्षेत्रात होत असलेल्या तस्करीबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
‘एनजीओ’ देतात वनजमिनीवर अतिक्रमणाला प्रोत्साहन
काही एनजीओ (स्वयंसेवी संस्था) वन जमिनीवर अतिक्रमणासाठी लोकांना प्रोत्साहन देत असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिली. असे प्रकार आढळल्यास लोकप्रतिनिधींनी वनविभागाच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन केले. वन विभागातील अवैध वृक्षतोडीबाबत माणिकराव ठाकरे यांनी उपस्थित केलेला तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.