गोपाल नीलकंठ दांडेकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. या प्रासादिक लेखकाचे हे विश्लेषण
मराठी साहित्यामधील सरळ, शांत आणि तेवढेच प्रासादिक लेखक यांची यादी करायची म्हटली तर त्या यादीत गोपाळ नीळकंठ दांडेकर म्हणजे अप्पा यांचा समावेश करावाच लागेल. कथा, कादंबरी, प्रवास वर्णने, किल्ल्यांची वर्णने, चरित्र, आत्मचरित्र अशा कितीतरी साहित्य प्रकारांमध्ये अप्पांनी भ्रमण केले आणि केवढी मोठी साहित्य संपदा निर्माण केली. त्यांचा साहित्याचा प्रवास जसा विलक्षण तसाच त्यांचा सार्वजनिक प्रवाहही विलक्षण.
जन्म विदर्भातला परतवाडा या गावचा. आयुष्य गेले पुण्याजवळ तळेगाव, दाभाडयात. पण अप्पा घरी किती दिवस राहिले असतील, हे त्यांच्या घरच्यांनाही माहीत नाही. सतत भ्रमंती करणारा अप्पांएवढा दुसरा लेखक नाही. खळाळता उत्साह आणि खूप मोठे इतिहास संशोधक आहोत, असा आव न आणता इतिहास जपणारा हा लेखक होता. महाराष्ट्रातला जवळपास एकही असा किल्ला नसेल जो अप्पांनी पालथा घातला नाही.
विदर्भातला माणूस तरुण वयात गाडगेबाबांकडे आकर्षित झाला हाही त्यांच्यावरच्या संस्काराचाच एक भाग आहे. स्वातंत्र्य आंदोलनातही सहभागी झाले. पुढे वेगळया टोकाच्या विचारसरणीत म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही प्रवेश झाला. पण अप्पांचे वागणे-बोलणे संघवाल्यांचे वाटलेच नाही. किंबहुना अप्पा संघवाले कधीच वाटले नाहीत. विदर्भातल्या या माणसाने कोकणाची जी वर्णने केली ती त्यांच्या ‘शितू’ आणि ‘पडघवली’ या कादंब-यांच्या पानापानांवर अशी नुसती तरंगत आहेत. कोकण अप्पांनी नुसते लिहिले नाही, डोळय़ांत साठवून ठेवले आणि मग लेखणीतून उतरवले.
कोकणची घरे, घराचा परस, परसातला वेल, मांडव, त्याला लगडलेली तोंडली, पडवळे, काजू, आंबा, दारासमोरून खळाळणारे ओढे, तुडुंब वाहणा-या नद्या, सागराची गाज, हे सारे अप्पांनी इतक्या छानपणे टिपले आहे. त्यामुळे शितू, पडघवली पन्नास वर्षापूर्वी वाचताना कोकणात राहून रोज ते सौंदर्य न्याहाळणारी माणसेही आपला प्रदेश इतका सुंदर आहे का, असे स्वत:च विचारू लागली. तीच गंमत ‘पावनाकाठचा धोंडी’ची. पण निसर्ग वर्णनातच अप्पा रमले नाहीत. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी भाक्रा नानगलचे काम सुरू केले तेव्हा त्या महाकाय धरणाने साहित्यिकांसमोरही मोठे आव्हान उभे केले.
जमशेदपूर येथे पेटलेली पोलादाची भट्टी आणि भाक्रा, नानगल हे पंजाबमधील महाकाय धरण ही या देशाची दोन मंदिरे आहेत, असे पंडित नेहरू जेव्हा म्हणाले होते आणि मराठीतल्या या महालेखकाने भाक्रा, नानगलचे आव्हान स्वीकारून थेट तिथे मुक्काम केला आणि मग अप्पांच्या लेखणीतून उतरले,‘आम्ही भगीरथाचे पुत्र’ ही कांदबरी देश उभारणीच्या कामात साहित्यिकांचे फार मोठे योगदान ठरली. एवढा मोठा शंभर कोटींचा देश त्यावेळी चाळीस कोटींचा होता.
गेल्या पन्नास वर्षात अनंत अडचणी असताना या देशाने जी झेप घेतली, त्यातले वास्तव ज्या थोडया लेखकांना कळले आणि ज्या थोडया लेखकांनी सकारात्मक विचार करून शक्तिमान होत असलेल्या या देशाचे नेमके चित्र आपल्या साहित्यातून उभे केले, त्यात मराठीत गोनीदांचा हात कोणी धरणार नाही. वर्तमान घडत असताना इतिहासही समृद्धपणे जपण्याचे काम अप्पांनी निव्वळ दुर्ग, किल्ल्यांची पुस्तके लिहून केले नाही, तर पायपीट करून प्रत्येक गडावर अप्पा पोहोचले. आणि दुर्ग किल्ल्यांचे महत्त्व किती विलक्षण आहे, याची महती त्यांनी त्यांच्या दुर्ग प्रेमातून नुसती लिहिली नाही तर एक अप्रतिम छायाचित्रकार म्हणूनही ‘गोनीदांची दुर्गचित्रे’ हे गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचे पुस्तक त्यांच्या दुर्ग प्रेमाचे साक्षीदार आहे.
गडकिल्ल्यांची छायाचित्रे काढून त्याची प्रसिद्धी करून प्रदर्शन भरवणारे आजही आहेत. पण अप्पांना अशा प्रसिद्धीची गरज वाटली नाही. पण गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र त्या गडकिल्ल्यांबद्दलची आत्मीयता निर्माण होऊन महाराष्ट्रातल्या हजारो तरुणांनी गडकिल्ल्यांची भ्रमती सुरू केली याचे श्रेय पुरंदरे यांना नसून दांडेकर यांना आहे. पण त्याचा गाजावाजा त्यांनी केला नाही. ‘सृजनशील’ हा शब्द ज्यांना ख-या अर्थाने लागू होईल, अशा सौम्य, सरळ आणि चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्त्वात गोनीदा खूप वरच्या रांगेत आहेत.
गोनीदांचे जन्मशताब्दी वर्ष जुलै महिन्यातच सुरू झाले आहे. ८ जुलै २०१६ रोजी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होईल. महाराष्ट्रातला हा कादंबरीकार जेवढा मोठा होता, त्याचप्रमाणे दुर्गभ्रमण गाथेने प्रवासवर्णनकार म्हणूनही गोनीदा खूप मोठे आहेत.
१९५७-५८ची गोष्ट आठवते. मॅट्रिकची परीक्षा संपली होती आणि रोह्याच्या बहि:शाल व्याख्यानमालेत गोनीदांना आणायचे असे मी आणि राजाभाऊ देसाईंनी ठरवले. त्यावेळी त्यांची ‘आम्ही भगीरथाचे पुत्र’ साकारत होती. तळेगाव, दाभाडे येथे अप्पांना पत्र लिहिले. पण त्याचे उत्तरच आले नाही. म्हणून मी आणि राजाभाऊ तळेगावला गेलो तर अप्पा भाक्रा नानगल धरणावर गेलेले कळले. घरी पत्र ठेवून आलो. तीन महिन्यांनी त्याचे उत्तर आले. उत्तर असे होते,
मग अप्पांचे भाषण गणेशोत्सवात ठेवले. अप्पांनी एक अट घातली की रात्री व्याख्यान आटोपल्यावर रोह्याहून तराफ्याने रेवदंडयाला जायचे. मग तशी व्यवस्था केली. व्याख्यान ११ वाजता संपल्यावर रात्री १२ वाजता अप्पांच्या सोबत रेवदंडयाला निघालो. रेवदंडा येईपर्यंत म्हणजे उजाडेपर्यंत अप्पा अखंड माहिती देत राहिले.
रेवदंडयाच्या किना-याला तराफा लागला तेव्हा सूर्योदय होत होता. ते लाल तांबूस सूर्यबिंब पाहताना अप्पा किना-यावरच बसून राहिले. अर्धा तास ते बिंब न्याहाळत होते आणि मग रेवदंडयाचा किल्ला, तो किल्ला लढविणारा चिमाजी अप्पा, अशी सगळी माहिती अप्पा सांगत राहिले. रेवदंडयाच्या किना-यावर वैद्य नावाच्या गृहस्थांचे घर होते. तिथे उतरण्याची व्यवस्था केली होती. त्यांच्या घरात झोपाळा होता. हातपाय धुवून अप्पा जे झोपाळयावर बसले, अर्धा तास मोठमोठे झोके घेत राहिले आणि कितीतरी कविता म्हणत राहिले. दुपारी मुरूडचा जंजिरा किल्ला पाहताना अप्पा वर्णन करत होते की, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी यांनी हा किल्ला जिंकण्याकरीता शिकस्त केली होती. अप्पा हे असे माहितीचे विद्यापीठ होते त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. मराठी साहित्यात अप्पांचे नाव कायमचे तळपत राहणार आहे.
» साहित्य अकादमी
» महाराष्ट्र शासन उत्कृष्ट
» वाड्.मय निर्मिती पुरस्कार
» महाराष्ट्र शासन उत्कृष्ट
» चित्रपट कथा पुरस्कार
» महाराष्ट्र गौरव पुस्कार १९९०
» जिजामाता पुरस्कार
केंद्र शासन उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार
» अप्पांच्या कोणत्याही पुरस्कारावर वाद झाला नाही.
अप्पांच्या कादंब-या
» शितू
» पडघवली
» माचीवरला बुधा
» पवनाकाठचा धोंडी
» मृण्मयी
» आम्ही भगीरथाचे पुत्र
» जैत रे जैत
» तांबडफुटी
» चरित्र आत्मचरित्र
» आनंद भुवन
» कहाणी मागची कहाणी
» गाडगे महाराज
» तुका आकाशा एवढा
» दास डोंगरी राहतो
» स्मरणगाथा
ऐतिहासिक कादंबरीत शिवकाल ही कादंबरी एवढी जाडजूड आहे की त्यात पाच छोटया कांदब-यांचा समावेश आहे.
श्री. शं. वंदे पत्र मिळाले.
भाक्रा, नानगल धरणाकाठी होतो. व्याख्यानाकरिता येईन. पण आता तुमची व्याख्यानमाला संपली असेल. गणेशोत्सवात आलेले चालेल का? फक्त एक अट माझ्या व्याख्यानानंतर सिनेमा ठेवू नये.
कळावे आणि कळवावे.
गोनीदा.