काँग्रेसने नोंदवलेल्या तीव्र आक्षेपानंतर भाजप नेते साक्षी महाराज यांनी सपशेल माघार घेत नथुराम गोडसेच्या विधानाबद्दल शुक्रवारी सभागृहाची माफी मागितली.
नवी दिल्ली – काँग्रेसने नोंदवलेल्या तीव्र आक्षेपानंतर भाजप नेते साक्षी महाराज यांनी सपशेल माघार घेत नथुराम गोडसे संबंधी केलेल्या विधानाबद्दल शुक्रवारी सभागृहाची माफी मागितली.
मी सभागृहाचा आदर करतो. मी माझे शब्द मागे घेतो माझ्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तरी, मी माफी मागतो असे साक्षी महाराज म्हणाले. उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराजांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना महात्मा गांधींची हत्या करणा-या नथुराम गोडसेला राष्ट्रभक्त ठरवले होते.
नथुराम गोडसे दुखावला गेला होता. त्याने चुकून काही केले असेल. पण तो राष्ट्र विरोधी नव्हता तो राष्ट्रभक्त होता अशी स्तुतीसुमने साक्षी महाराजांनी गोडसेवर उधळली होती. साक्षी महाराजाच्या या विधानावर काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला. शुक्रवारी सकाळी लोकसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षांच्या खासदारांनी यावरुन जोरदार गदारोळ केला.
काँग्रेसने नोटीसव्दारे प्रश्नोत्तराचा तास निलंबित करण्याची मागणी केली. पण सभापती सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसची मागणी फेटाळून लावली. महात्मा गांधींच्या मारेक-याचे कौतुक होत असेल तर ही फार गंभीर बाब आहे असे काँग्रेसचे सभागृहातील नेते मल्लिकार्जून खर्गे म्हणाले.
गुरुवारी या विषयावरुन राज्यसभेत जोरदार गदारोळ झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांना सार्वजनिक ठिकाणी बोलताना भान बाळगण्याचे आवाहन केले आहे. मात्र भाजप खासदार वारंवार वादग्रस्त विधाने करुन नरेंद्र मोदींच्या अडचणी वाढवत आहेत. नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक भाषणात महात्मा गांधींच्या आदर्शांचे उदहारण देतात आता त्यांच्याच पक्षाच्या खासदाराने महात्मा गांधींच्या मारेक-याला राष्ट्रभक्त ठरवून मोदींची अडचण वाढवली आहे.