१९५१-५२मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आतापर्यंत पाचपट मतदार वाढल्याची आकडेवारी निवडणूक आयोगाने जारी केली आहे.
नवी दिल्ली- १५वी लोकसभा संस्थगित होऊन १६व्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर १९५१-५२मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आतापर्यंत पाचपट मतदार वाढल्याची आकडेवारी निवडणूक आयोगाने जारी केली आहे.
१९५१-५२मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी १७ कोटींहून अधिक मतदार होते. आगामी एप्रिल-मेमध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीला ८१ कोटींहून अधिक मतदार आपला हक्क बजावणे अपेक्षित आहे. म्हणजेच हा आकडा ४.७पट एवढा वाढला आहे. २००९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीला ७१ कोटींहून अधिक मतदारांनी, तर १९९८ सालच्या निवडणुकीला ६० कोटींहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला.
देशातील सर्वात मोठे राज्य म्हणून ओळखल्या जाणा-या उत्तर प्रदेशात ८० लोकसभेच्या जागा आहेत. २००४ सालच्या तुलनेत येथील मतदारांमध्येही मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. उत्तर प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मतदारांची संख्या जास्त आहे. देशातील एकूण मतदारांपैकी उत्तर प्रदेशात एकूण १६.५ टक्के मतदार आहेत. तर इतर पाच राज्यात ४९.१ टक्के मतदार आहेत.
२००४ ते २०१४ या कालावधीत देशातील २८ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांमधील दादरा आणि नगर हवेली येथे ५३.९ टक्के एवढी सर्वात जास्त मतदारांच्या संख्येत वाढ झाली. त्यापाठोपाठ पुद्दुचेरी येथे ३९.१ टक्के मतदार वाढले.