गेल्या तीन वर्षात भारतीय हवाई दलातील २० लढाऊ विमानांना अपघात झाला.
नवी दिल्ली – गेल्या तीन वर्षात भारतीय हवाई दलातील २० लढाऊ विमानांना अपघात झाला असून या अपघातांमुळे देशाच्या तिजोरीला ५७४.४२ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले अशी माहिती मंगळवारी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी राज्यसभेत दिली.
२०१४-१५ या वर्षात सर्वाधिक अपघात घडले. या एका वर्षात हवाई दलाने आठ लढाऊ विमाने गमावली. २०१२-१३ आणि २०१३-१४ या दोन वर्षात हवाई दलाच्या सहा लढाऊ विमानांना अपघात झाला. तर या चालू वर्षात कोणताही अपघात झालेला नाही, असे पर्रिकर यांनी राज्यसभेत लेखी उत्तरादरम्यान सांगितले.
गेल्या तीन वर्षात झालेल्या विमानांच्या अपघातामुळे भारतीय तिजोरीतील ५७४.४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले. या लढाऊ विमानांना झालेल्या अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यासाठी न्यायालयाच्या चौकशीनुसार तपास केला जातो आणि याबाबतच्या शिफारशींची अंमलबजावणी केली जाते. यामधील अनेक अपघात हे मानवी चुका तसेच तांत्रिक बाबींमुळे झाल्याचे पर्रिकर म्हणाले.