गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर आणि यंदाच्या जून महिन्यात गुहागर तालुक्यात झालेल्या सर्वेक्षणामध्ये ११२ (९ टक्के) कुपोषित बालके असल्याचे निदर्शनास आले आहे.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/12/kuposhan-e1373955152275-300x200.jpg)
गुहागर- गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर आणि यंदाच्या जून महिन्यात गुहागर तालुक्यात झालेल्या सर्वेक्षणामध्ये ११२ (९ टक्के) कुपोषित बालके असल्याचे निदर्शनास आले आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि आरोग्य विभागामार्फत ० ते ६ या वयोगटातील मुलांसाठी चालवल्या जाणा-या योजनांकडे सकारात्मक दृष्टीने जनतेने पाहिल्यास गुहागर तालुका कुपोषण मुक्त करणे शक्य असल्याचे प्रकल्प अधिकारी उज्ज्वला पवार यांनी सांगितले.
एकात्मिक बालविकास सेवा योजनांमार्फत तालुक्यामध्ये १९७ अंगणवाडय़ा आणि ३१ मिनी अंगणवाडय़ा आहेत. त्यांच्या माध्यमातून बालकांना पोषण आहार दिला जातो. मुलाला पुरक पोषण आहार मिळावा म्हणून सरकारतर्फे एक महिना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनच्या माध्यमातून प्रत्येक कुपोषित बालकाला ९६० रु. थेट अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून दिले जातात. अशा बालकांना ग्राम बालविकास केंद्राच्या माध्यमातून आहार, औषधे दिली जातात. त्याचबरोबर आहारातील विविधता, मुलाचे वजन वाढवण्यासाठी आहारामधील बदल याबद्दल मातांना मार्गदर्शनही केले जाते.
ग्राम बालविकास केंद्राच्या कार्यक्रमातूनही बालक कुपोषण मुक्त झाले नाही तर अधिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाल उपचार केंद्रात २१ दिवस मातेसह राहण्याचा आग्रह केला जातो. या काळात मातांनाही तेथेच राहावे लागते. म्हणून या टप्प्यात बुडीत मजुरी भत्ता देण्यात येतो. शासनातर्फे गरोदर महिला आणि स्तनदा मातांनाही आरोग्य, आहार याबाबत मार्गदर्शन केले जाते. अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाच्या परिचारिका यांच्यामार्फत या महिलांकडे लक्ष पुरवले जाते.
आवश्यक असल्यास औषधेही पुरवली जातात. माता व ० ते ६ वयोगटातील मुलांचे पोषण व्हावे म्हणून सरकार प्रयत्न करत असताना जनता, मात्र या योजनेचा लाभ घेण्यास उत्सुक नसते. सरकारकडून आलेला पोषण आहार घेणेदेखील कमीपणाचे वाटते. चौकशी करण्यासाठी किं वा मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या सेविकांना अपमानास्पद वागणूक मिळते. ग्राम बालविकास केंद्रातून अधिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाल उपचार केंद्रात पाठवण्याची शिफारस केली गेली, तर माता रुग्णालयात गेल्यावर घरच्यांना जेवण कोण घालणार? असे प्रश्नदेखील विचारले जातात, अशी व्यथा एका अंगणवाडी सेविकेने व्यक्त केली.