अनावधानाने घडलेल्या कृत्याचं वैशम्य वाटायला हवं, एकदा केलेला गुन्हा पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न करायला हवेत.असे मत अभिनेता नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.
पुणे – अनावधानाने घडलेल्या कृत्याचं वैशम्य वाटायला हवं, एकदा केलेला गुन्हा पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. परंतु त्याचं समर्थन करायला लागलं की गुन्हेगारी वृत्ती वाढीस लागते. रस्ता चुकलेल्या गुन्हेगारांना समाजाने सहानुभुती देऊन मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत करण्याची आवश्यकता आहे. गुन्हा हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. भिडायची वृत्ती सोडू नका. परंतु कुठे भिडायचं हे समजलं पाहिजे. गुन्हेगारीकडे वळणारी पावले रोखण्यासाठी समाजानेही आपली भूमिका सतत बदलत ठेवली पाहिजे. प्रत्येकाने स्वत:चे आई वडील स्वत:च व्हा म्हणजे चांगले वाईट समजेल असे मत अभिनेता नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.
पुणे शहर पोलिसांतर्फे गुन्हेगार आणि गुन्हेगारी मानसिकता बदलण्यासाठी संवाद परिवर्तनाचा हा कार्यक्रम शुक्रवारी घेण्यात आला. त्यावेळी पाटेकर बोलत होते. यावेळी संसदीय कामकाज, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, पोलीस आयुक्त सतीश माथुर, सह आयुक्त संजय कुमार, अतिरीक्त आयुक्त डॉ. शहाजी सोळुंके, प्रकाश मुत्याळ, मानसोपचार तज्ञ डॉ. हरिश शेट्टी, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले उपस्थित होते. आपल्यापैकी प्रत्येकजण गुन्हेगार आहे. प्रत्येकाने कुठला ना कुठला गुन्हा केलेला असतो. जो नाही म्हणतो तो लबाड माणूस आहे. आपण पकडले गेलो नाही म्हणून या बाजुला आहोत. एकमेकांना हात देऊन वर घ्यायला हवं. एकमेकांना भेटणे, समजून घेणे आवश्यक आहे. असेही पाटेकर यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना बापट म्हणाले की, पोलिसांनी हा कार्यक्रम घेणे म्हणजे त्यांच्यामध्येही परिवर्तन घडले आहे. गुन्हेगारीचा शिक्का लागला तर मनुष्याचे जीवन उद्ध्वस्त होते. आणिबाणी आणि राजकीय गुनंमध्ये अडीच वर्ष कारागृहात काढली त्यावेळी कैद्यांचे जीवन आपण पाहिले आहे. जन्मत: कुणीच गुन्हेगार नसते. परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते. कुटुंब व्यवस्था कोलमडल्याने गुन्हेगारीत वाढ झाली असून संस्कारांची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. यासोबतच राजकारण्यांनीही स्वत:ची प्रतिमा बदलण्याची गरज आहे. पोलिसांमधला संवेदनशील माणूस ओळखायला शिकले पाहिले. आदर्शाच्या जोरावर परिवर्तन शक्य असल्याचेही ते म्हणाले. समाजात घडणा-या बदलांबरोबर आपण बदललो नाही तर अडचणी निर्माण होतात. सामाजिक, आर्थिक बदल आवश्यक असतात. गुन्हेगारांचे परिवर्तन घडवणेही न्याय प्रक्रियेचाच एक भाग आहे. शहरात खुनांपेक्षा अपघातांमध्ये अधिक जीव जात असल्याचे सह पोलीस आयुक्त संजय कुमार म्हणाले. तर आयुक्त माथुर यांनी बदलत्या व्यसनांबाबत चिंता व्यक्त करत आगामी काळातील आव्हाने विषद केली.
जन्मठेपेची १४ वर्षाची शिक्षा भोगत असताना विविध प्रकारच्या तब्बल अकरा पदव्या घेऊन आपले शिक्षण पूर्ण करणा-या तसेच एक चांगला नागरिक म्हणून काम करणा-या संतोष िशदे या तरुणाचा नाना पाटेकरच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच १६ वर्ष कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुधारलेल्या प्रवीण पाटील या तरुणाचाही सत्कार करण्यात आला. पाटील हा सध्या सुरक्षा अधिकारी म्हणून काम करीत आहे.