गुन्हेगारी रोखण्यासाठी समाजाने जागरूक राहणे गरजेचे आहे, असे आवाहन ठाण्याचे पोलिस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी मंगळवारी डोंबिवलीत ‘चला मुलांना गुन्हेगारीपासून वाचवू’ या परिसंवादात केले.
डोंबिवली – गुन्हेगार पकडला, जेलमध्ये गेला म्हणजे समाज सुधारत नसतो. गुन्हेगारांनी जेल भरले आहेत. त्यामुळे गुन्ह्याच्या घटना कमी होत नाहीत. प्रत्येक माणूस हा साध्या वेशातील पोलिस असतो. तुम्ही आम्ही सर्वानीच मिळून जागरूकता दाखवली पाहिजे. पोलिस आपली जबाबदारी झटकत नाहीत. मात्र गुन्हेगारी रोखण्यासाठी समाजाने जागरूक राहणे गरजेचे आहे, असे आवाहन ठाण्याचे पोलिस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी मंगळवारी डोंबिवलीत ‘चला मुलांना गुन्हेगारीपासून वाचवू’ या परिसंवादात केले.
ठाणे पोलिस आयुक्त व कल्याण परिमंडळ तीन यांच्या पुढाकाराने डोंबिवली क्रीडासंकुलात या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रघुवंशी बोलत होते. डोंबिवली शहराशी माझा २७ वर्षापासूनचा संबंध आहे. सुशिक्षित व सुसंस्कृत शहर म्हणूनच डोंबिवलीची ओळख आहे. इतर शहरांपेक्षा डोंबिवलीत जागरूकता अधिक आहे. मात्र, अशा शहरात गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याची खंत रघुवंशी यांनी व्यक्त केली. २७ वर्षापूर्वी डोंबिवलीत तीन पोलिस ठाणी होती. आता नव्याने टिळकनगर पोलिस ठाणे झाले आहे. त्यावेळची लोकसंख्या अडीच लाख होती आता ती आठ ते दहा लाखापर्यंत पोहोचली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत १०० ते १५० पोलिस कर्मचारी वाढले आहेत. अपुरे पोलिस बळ आहे. पोलिस चौकी बांधता येतील. मात्र पोलिस कुठून आणणार, असा प्रश्न आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिस भरती करणे सरकारलाही शक्य नाही. समाजात घडलेल्या घटनांक डे दुर्लक्ष करू नका. भविष्यात त्याच घटना मोठय़ा होतात. त्यामुळे वेळीच प्रतिबंध करणे आवश्यक आहे, असे रघुवंशी यांनी सांगितले.
महापौर वैजयंती घोलपी यांनी पोलिस पैसे दिल्याशिवाय सेटलमेंट करत नाहीत. यामुळे पोलिसांनी प्रतिमा सुधारण्याची गरज असल्याचे सांगितले. तोच धागा पकडून रघुवंशी यांनी आमची प्रतिमा काय आहे, आम्हाला माहिती आहे, असेही स्पष्ट केले. कौटुंबिक वातावरण, सामाजिक वातावरण, शाळेतील वातावरण, संगत आणि मुलांचा भावनांक हे महत्त्वाचे असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ श्रीखंडे यांनी सांगितले. मुले मैदानी खेळांऐवजी टीव्ही, सायबर कॅफे याकडे जास्त आकर्षित होत आहेत, अशी नाराजी सुरेंद्र वाजपेयी यांनी व्यक्त केली.