आज गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी उत्सव. अनेक तरुणांचा विशेष आवडता सण. समाजातील तरुणांची एकी वापरून कठीणातली कठीण गोष्टही सहज साध्य करता येते, हे दाखवून देणारा सण. मात्र यंदा न्यायालयाने काही निर्बंध घातल्यामुळे या सणावर थोडेसे नियमांचे काळे ढग आलेले दिसतात. वयाने लहान असलेल्या म्हणजेच ‘अल्पवयीन’ मुलांचा या उत्सवात होत असलेला सहभाग न्यायालयाने बंद करण्याची सूचना दिली आहे. ती सूचना रास्त असल्यामुळे सगळे त्याचा स्वीकारही करतील. पण सामाजिक जीवनातही हेच सूत्र लागू करून ‘अल्पवयीन मुले गुन्हेगारी विश्वाकडे वळणार नाहीत,’ याकडेही आज तेवढेच लक्ष देण्याची वेळ आली आहे.
काही दिवसांपूर्वी ‘नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्युरो’तर्फे देशातील गुन्हेगारी विश्वाचा आकडा गृहमंत्रालयातर्फे देशाच्या जनतेसमोर ठेवण्यात आला. तो आकडा पाहून महाराष्ट्रातील अनेकांच्या हृदयात धडकी बसल्याशिवाय राहिली नसेल. कारण चांगल्या टवटवीत फळाला कीड लागून ते फळ खराब व्हावे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता आकडा पाहून अनेकांना प्रश्न पडला असेल. या अहवालानुसार राज्याचा क्रमांक गुन्हेगारीच्या आकडयात सर्वात वरचा दिसत असतानाच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील अल्पवयीन मुलांचा आकडा हत्या, चो-या, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पुढे आलेला दिसत आहे. जी अत्यंत गंभीर बाब आहे.
अगदी महिन्याभरापूर्वी विरार येथे दोन शाळकरी मुलांकडून सातवी इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली. ही एकच घटना अशी नाही ज्यात गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा समोवश असेल. अशा अनेक घटना आज मुंबई महाराष्ट्रात अगदी सर्रासपणे समोर येत आहेत. आतापर्यंत असे अनेक गुन्हे झाले आहेत, ज्यात काही शाळकरी मुलांनी खंडणीसाठी आपल्याच मित्राचे अपहरण करून नंतर त्याची हत्या केली. मुळात अल्पवयीन मुलांली केलेल्या या कृत्याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.
‘मला कायदा माहीत नव्हता,’ असे वाक्य गुन्हेगाराला कधीही त्याने केलेल्या गुन्ह्यातून वाचवू शकत नाही. मग तो गुन्हेगार वयाने मोठा असो की अल्पवयीन. हे वाक्य न्यायालय कधीही मान्य करू शकत नाही. ब-याचवेळा गुन्हेगार अल्पवयीन ठरल्यानंतर न्यायालयात गुन्हेगाराच्या बचावासाठी असे अनेक युक्तिवाद केले जातात; परंतु ते सर्व निर्थक असतात. गुन्हेगार हा शेवटी गुन्हेगारच मानला जातो आणि तो गुन्हेगारच मानला जावा याबाबत कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. त्याचवेळी ही मुले गुन्हेगारीकडे का वळतात, हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरते.
ब-याचवेळा अल्पवयीन मुले गुन्हेगार ठरल्यानंतर किंवा त्यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांच्या पोलिसांनी केलेल्या चौकशीतून असे पुढे येते की, ‘वाहिन्यांवरील काही मालिका पाहून त्यांनी ते कृत्य केले.’ तेव्हा आपला पाल्य टीव्हीवर काय पाहतो, यावरही लक्ष ठेवणे आज तितकेच महत्त्वाचे झाले आहे.
समाजामध्ये प्रत्येक पालकाचे आपल्या मुलाकडे किंवा मुलीकडे बारीक लक्ष असणे अत्यंत आवश्यक आहे. आपली मुले काय करतात, त्यांचे मित्र कोण आहेत? ते कुठे कुठे जातात, ते फोनवर कोणा-कोणाशी बोलतात, या सर्वावर पालकांचे लक्ष असणे अतिशय आवश्यक आहे. काय चांगले आणि काय वाईट या गोष्टी घरातल्या वरिष्ठांनीच मुलांना सांगितल्या पाहिजेत. कारण आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात आपला मुलगा किंवा मुलगी मोबाईल फोनवरील इंटरनेटद्वारे सगळया जगाशी जोडला गेला आहे.
जितक्या वेगाने सर्वसामान्य माणूस बदलते तंत्रज्ञान स्वीकारणार नाही, त्यापेक्षा कितीतरी पट अधिक वेगाने ही अल्पवयीन मुले हे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत आहेत. तेव्हा आपला मुलगा किंवा मुलगी मिळालेल्या तंत्रज्ञान सोयीचा योग्य वापर करत आहे की नाही हे पाहणे आज अत्यंत आवश्यक बनले आहे. परंतु आजचे पालक ‘वाढत्या महागाईमुळे एकाच्या पगारात घर चालत नसल्यामुळे आम्ही दोघेही पती-पत्नी कामावर जातो’ आणि त्यामुळे मुलांकडे फारसे लक्ष देता येत नसल्याची सबब पुढे करतात.
अर्थात ही सत्य परिस्थिती आहे की आज अनेक घरात पती-पत्नी दोघांनाही कामावर जावे लागत आहे. पण यावर तोडगा आपल्यालाच शोधला पाहिजे. नंतर होणा-या गंभीर घटनेचा पश्चाताप करत बसण्यापेक्षा त्यावर अगोदरच लक्ष दिले तर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.
सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचे राहणीमान बदलत चालले आहे. बरीच लहान मुले नेमकी याच राहणीमानाला किंवा अशा प्रकारच्या फसव्या जीवनशैलीला बळी पडत आहेत. त्यांना वाटणारे हे छानछोकीचे आयुष्य जगण्याकरिता मग पैसे कमी पडले तर यातलीच काही मुले कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी ते नेमका कोणता मार्ग निवडतील हे कोणीही सांगू शकत नाही आणि मग यातूनच ही मुले चुकीच्या कृत्यांकडे वळतात. तेव्हा या सगळयांवर अंकुश ठेवणे कुठेतरी गरजेचे बनले आहे.
अनेकवेळा आपल्या आजूबाजूच्या परिसरात किंवा रेल्वे स्टेशनच्या परिसरात अल्पवयीन मुले अनेक प्रकारच्या व्यसनांच्या अधीन झालेली दिसतात. अशा काही मुलांकडून गंभीर गुन्हे घडल्याचे आतापर्यंत ब-याच वेळा समोर आले आहे.
गुन्हेगारीमधील अनेक प्रकरणांमध्ये बालगुन्हेगारीचे वाढते प्रमाण ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. या सगळयाला कुठेतरी लगाम बसणे आज अत्यंत आवश्यक बनले आहे. यातून कसा तोडगा काढता येईल याचा विचार गांभीर्याने व्हायला हवा. पोलीस या कार्यात नेहमीच पुढे असतात. पण केवळ पोलिसांवर ही जबाबदारी न ढकलता समाजातील सर्वानीच ही बालगुन्हेगारी रोखण्याकरिता पुढे येणे आवश्यक आहे.
गृह मंत्रालयाच्या ‘नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्युरो’तर्फे देशातील गुन्हेगारी विश्वाचा लेखाजोखा मांडण्यात येतो. यंदा प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीत एकीकडे राज्याचा क्रमांक गुन्हेगारीत अव्वल दिसत असतानाच, देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील अल्पवयीन मुलांचा आकडा हत्या, हत्येचा प्रयत्न, बलात्कार, दरोडे, चो-या अशा गुन्ह्यांमध्ये पुढे आलेला दिसत आहे.