गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेली दंगल ही मोठी चूक होती.
नवी दिल्ली- गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेली दंगल ही मोठी चूक होती. यामुळेच २००४ मधील लोकसभा निवडणूक त्यामुळेच भाजपा हरली, अशी कबुली माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्याजवळ दिली होती, असा दावा ‘रॉ’चे माजी प्रमुख दौलत यांनी त्यांच्या ‘काश्मिर वाजपेयी इयर्स’ पुस्तकात केला आहे.
२००४ ची निवडणूक हरल्यानंतर आपण वाजपेयी यांना भेटलो. मी त्यांना म्हणालो, सर, ये क्या हुऑँ, त्यावेळी जोरात हसून ते म्हणाले की, उनको (कॉँग्रेस) भी मालूम नही ये क्या हुऑँ. कॉँग्रेसलाही आश्चर्याचा धक्का होता.
आमच्याकडून गुजरातबाबत चूक झाली, या वाक्यानंतर ते गंभीर झाले. त्यानंतर मी त्यांना काहीच प्रश्न विचारले नाही, असे दौलत यांनी सांगितले. दौलत यांनी आपल्या काश्मीरबाबतच्या पुस्तकात हे गौप्यस्फोट केले आहेत.
कंदाहार विमान अपहरणाच्यावेळी गोंधळ नडला
१९९९ मध्ये कंदाहार विमान अपहरणाच्या वेळी सरकारी पातळीवर हे प्रकरण हाताळण्याबाबत गोंधळ होता. हे विमान अमृतसर येथे असताना तेथे तत्कालिन मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी विशेष कारवाई करण्यास नकार दिला. तसेच पंजाबच्या पोलीस महासंचालकांनी आपले कमांडो तयार असल्याचे सांगितले.
मात्र, कारवाईत कोणत्याही कमांडोचा बळी जाता कामा नये, असे आदेश मुख्यमंत्री बादल यांनी आपल्याला दिल्याचे सांगितले. त्याचवेळी दिल्लीत सुरू असलेल्या कॅबिनेट सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली आपत्कालिन व्यवस्थापन गटाच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही.
..आग्रा शिखर परिषद कोलमडली
आग्रा येथे शिखर परिषदेत भारत आणि पाकिस्तानमध्ये वादांवर तोडगा निघणार होता. मात्र, थोडक्यात तो हुकला, अशी माहिती आपल्याला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांनी दिली.
लालकृष्ण अडवाणी आणि जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यातील संबंध चांगले नसल्यानेच दोन्ही देशांमध्ये करार झाला नाही. ही शिखर परिषद होण्यापूर्वीच्या रात्री अडवाणी यांनी राष्ट्रपती भवनात दाऊद इब्राहिमचा विषय काढला. त्यावर मुशर्रफ यांनी आक्षेप घेतला. याबाबत चर्चा करण्यापूर्वी त्याची माहिती मला मिळायला हवी होती, असे मुशर्रफ यांनी सांगितले, असे दौलत यांनी सांगितले.