देशात अधिकाधिक भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी सर्वप्रथम परकीय गुंतवणूकदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करावे लागेल. यासाठी भारतात गुंतवणूक करण्यासाठी कोणतेच अडथळे नाहीत हे त्यांना पटवून देण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. प्राप्तिकर कायद्यामध्ये पूर्वलक्षी प्रभावाने होणारे बदल आणि जनरल अँटी-अव्हॉयडन्स रुल्स (गार) यावरून परकीय गुंतवणूकदारांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
तरुणांमध्ये कौशल्य विकासावर भर
आगामी काळात सरकारचा देशामध्ये रोजगारनिर्मितीवर भर राहणार असून, विविध क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाची मोठी गरज भासणार आहे. यासाठी पुढच्या पाच वर्षात आठ कोटी युवकांना विशिष्ट कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष संस्थेची निर्मिती करण्यात येणार असल्याची पंतप्रधानांनी घोषणा केली. हा सरकारचा सर्वात महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याचा सरकार विचार करत असून या संस्थेच्या माध्यमातून कौशल्य विकास कार्यक्रमाची अमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात खासगी आणि बिगर सरकारी संस्थांनाही सहभागी करण्याचे निमंत्रणही पंतप्रधानांनी दिले. पुढच्या काही वर्षात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे.
शहरातील गरिबांसाठी स्वस्तात गृहकर्ज
शहरी भागांमध्ये वास्तव्य करणा-या गरिबांसाठी गृहकर्जाची नवीन योजना आणली जाणार असल्याचे पंतप्रधानांनी या वेळी जाहीर केले. यामध्ये पाच लाखांपेक्षा कमी गृहकर्जावर व्याजदरांमध्ये सवलत देण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षामध्ये बँकांच्या मार्फत लाभार्थ्यांला सर्व योजनांचा लाभ मिळेल. यासाठीही सरकार प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी म्हटले आहे. शहरातील गरिबांना गृहखरेदीसाठी पाच लाखांपेक्षा कमी रकमेवरील कर्जाच्या दरात सवलत दिली जाणार आहे. यासाठी ‘राजीव गृहकर्ज योजना’ राबवण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले.