मे महिना म्हणजे आनंद आणि उत्साहाचा जाणवतो. मुंबईत अगदी सकाळी निघाल्यापासून रात्री येईपर्यंत जबाबदारीने वागणारा चाकरमानी मात्र गावी जेऊन बाकावर निर्धास्त झोपून जातो एवढा मोकळा श्वास या कोकणात आहे.
मुलांना सुट्टी पडली शाळा आणि परीक्षांच्या जाचातून मुलं आणि पालक मुक्त झाले. शेवटच्या पेपर नंतरचं ‘एन्जॉयफुल’ जीवन म्हणजे सुटकेचा सोडलेला दीर्घश्वास. दिवसरात्र अभ्यास करून कंटाळलेली मुलं आणि रागाने, प्रेमाने मुलांचा अभ्यास घेणारी वडील माणसं मुक्तपणे वावरू लागली.
परीक्षा झाल्यावर पाहिजे तेवढे खेळा, पण आता अभ्यास करा हे शेवटच्या पेपपर्यंत आईचं ब्रीदवाक्य ऐकून कानटळ्या बसल्या पण परीक्षा संपल्यावर निकाल कसाही असूदे हे वर्ष तरी संपलं असं मनोमन का वाटतं, तर आता अभ्यासक्रमात फार मोठया प्रमाणात बदल झाले आणि अभ्यासाचं प्रचंड दडपण मुलांवर आणि पालकांवर आहे. मुलं टय़ूशनला गेली किंवा कितीही मन लावून अभ्यास करायला गेली, तरी अभ्यासाचे सततचे दडपण यांच्यावर जाणवते. मुलांची भूक कमी झालीय. सततच्या अॅक्टीव्हेटीज आणि प्रोजेक्ट यामुळे त्रस्त झालेले आपण पाहतो. पण तरीही पर्याय नाही. आपण काही वेगळे नाही. सर्वासोबत आपणही.
आता सुट्टीचे दिवस, वेध लागले प्रत्येकाला गावी जाण्याचे. गावच्या मातीत जाऊन खेळायची स्वप्ने रंगवण्याचे काम सुरू आहे. गावची मोकळी हवा, अंगणात बसून गार हवेची झुळूक आणि घरातून येणारा जेवणाचा सुवास, जाणवतो. आपला बोजा बिस्तारा गुंडाळून गावी जाण्याची वाट पाहणारे हे शाळकरी आणि चाकरमानी. रेल्वे रिझर्वेशनसाठीची धडपड. गावाला काय काय न्यायचे याची यादी तयार करून बसणारे हे चाकरमानी. गावाची प्रचंड ओढ असलेली ही मुले गावी जावून खूप मज्जा कशी करायची याचे नियोजन करत बसतात.
गावी गेल्यावर मातीत, दगडात खेळणे, नवीन मित्र जमवणे, गुरा-ढोरांकडे उत्साहाने जाणे, नदीच्या डोहात डुंबणे, विहीरीवर जाऊन गार पाण्याची आंघोळ करणे हे सारं खूप मजेशीर असतं. पूर्वीचा ‘रहाट’ फार कमी दिसतो. बावडी (विहीर) यावर गोल आकाराचा लाकडी रहाट त्याला ‘येटा’ची वेल याने विणलेल्या माळेत मातीचे ‘मोगे’ अथवा तत्सम भांडी बांधून पायाने गोल फिरवून ते पाणी लाकडाच्या एका विशिष्ट भांडयात पडेल अशी व्यवस्था, अथवा लाटेचे पाणी ही सुद्धा एक यंत्रणा कोकणात दिसते. बावडीच्या बाजुला कांद्याची लागवड, मिरची लागवड दिसते. मुलांना हे पाहाण्यातही एक आनंद दिसतो. फणसाची भाजी (शॅक) आणि उकडया, तांदळाची पेज हे समीकरण वर्षानुवर्षे कोकणात आहे. हे एक प्रकारचे टॉनिक आहे. आता घरोघरी पाण्याची व्यवस्था झाली, पण पूर्वी नदीच्या डोहावर डोक्यावरून जर्मन बादलीवरून स्त्रीया कपडे धुण्यासाठी जात.
आता गावी गुरे कमी झाली, पण पूर्वी गुरांसाठी जानेवारी ते मे महिन्यापर्यंत समोरच्या बाजुला किंदळीच्या झाडाच्या फांद्यांपासून एक घर बनवले जात असे, त्याला ‘वाड’ कुडणे असे म्हटले जायचे. याचा उद्देश असा की गुरांना मोकळी हवा मिळत असे आणि उन्हापासून पण बचाव होत असे. जून मध्ये पहिल्या पावसाच्या अगोदर हे गुरांचे घर कोसळून त्याच कोप-यात जाळले जायचे. त्यात तरवा पेरणी (भात पेरणी) व्हायची. हे मुलांसाठी एक आकर्षण होते. मुलांना मुंबईची खेळणी तिथे आवडत नसतात. तिथे मोकळ्या हवेत दगड-धोंडयासोबत खेळणे, उंदडणे, फिरणे मनसोक्त मज्जा करून रात्री बाहेरच्या अंगणात हवेशीर वातावरणात झोपायचे.
मोठयांच्या गोष्टी ऐकायच्या. भजनाला जायचे. बारशाला, लग्नाला जायचे वरातीत नाचायचे, पंक्तीत जेवायचे, वाटले तर झोपायचे नाहीतर उन्हात क्रिकेट खेळायचे. घरातून आजी ओरडली, आजोबांनी दम दिला तरी दुर्लक्ष करायचे. भय-भीती हा प्रकार यावेळी दिसत नाही. आम्ही मुंबईवरून फक्त मज्जा करायला आलोय एवढेच भान असते. या मुलांना हे बालपण किती सुंदर, निरागस आहे ना, आम्ही मुलांच्या काळजीपोटी त्यांच्यावर नजर ठेवतो, पण त्यांना मनसोक्त हुंदडण्यात जी मज्जा येते त्याचे मोजमाप नाही करता येत. फणसाच्या भाजीत एक गोडवा आहे. रसाळ गरे, कापे गरे आणि आजीने दिलेले भाजलेले काजू गर, राखून राखून ठेवलेला कोंबडा सगळेजण एकत्र येईपर्यंत जपून ठेवला जातो. हा मे महिना म्हणजे आनंद आणि उत्साहाचा जाणवतो.
मुंबईत अगदी सकाळी निघाल्यापासून रात्री येईपर्यंत जबाबदारीने वागणारा चाकरमानी मात्र गावी जेऊन बाकावर निर्धास्त झोपून जातो एवढा मोकळा श्वास या कोकणात आहे. गावची मंडळी तर या मुलांचे खूप लाड करत असतात. प्रेमाने सर्व बनवून घालतात, त्यात त्यांनाही आनंद मिळतो, सर्वजण एकत्र त्या निमित्ताने येतात, घर भरून जातं. माहेरवाशिणीही येतात आणि सर्वाचा तो उत्साह वर्षातून एकदा पुन्हा पुन्हा निर्माण होतो.
सुट्टी संपत आली की पुन्हा परतीच्या प्रवासाची चर्चा सुरू होते. मुलांचा चेहरा हिरमुसला होतो. पुन्हा मुंबई, पुन्हा शाळा, अभ्यास, तोच तोचपणा टेंशन येतं. पुन्हा बांधाबांध, आवराआवर आणि पुन्हा गावचा आणि गावच्या मंडळींचा निरोप घेऊन आपण मुंबई नगरीत येतो. सुट्टी संपली, शाळेचे दिवस पुन्हा सुरू, पुन्हा दप्तराचे ओझे वर्षभर असाच प्रवास वर्षानुवर्षे..