वातावरणातील लहरीपणामुळे कुठे एका वर्षात तीन-तीन वेळा गारपीट झाली. शेतकरी उद्ध्वस्त झालेला असल्याने त्यांना धीर देण्याची गरज आहे.
मुंबई- वातावरणातील लहरीपणामुळे कुठे एका वर्षात तीन-तीन वेळा गारपीट झाली. शेतकरी उद्ध्वस्त झालेला असल्याने त्यांना धीर देण्याची गरज आहे. म्हणून हेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी.
संपूर्ण कर्जमाफी करावी, वीजबिल माफ करावे, अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांनी विधानसभेत केली. अनेक सत्ताधारी आमदारांनी सरकारच्या संथ गतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
विधिमंडळ अधिवेशनाच्या दुस-या दिवशी सकाळपासून शेतक-यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाले होते. सकाळी कामकाज सुरू होताच, विरोधकांनी सर्व कामकाज बाजूला सारून शेतक-यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू करावी, अशी मागणी केली.
मात्र प्रश्नोत्तराचा तास झाल्याशिवाय इतर कोणताही विषय घेणार नाही, अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घेतली.
सभागृहात गोंधळ झाल्यानंतर दोन वेळा कामकाज तहकूब करावे लागले. अखेर प्रश्नोत्तराचा तास संपल्याने सत्ताधारी आमदारांनी नियम ९३अन्वये दिलेल्या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली.
भाजपाचे संजय कुटे यांनी चर्चेला सुरुवात करताना सरकारने शेतक-यांच्या मागे उभे राहावे, असे आवाहन केले. या प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली.
ते म्हणाले, शेतकरी संकटात सापडला असताना सरकार मात्र भावनाशून्यपणे वागत आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे शेतक-यांना दिलासा देण्याऐवजी त्यांची थट्टा करीत आहेत.
एकदा मदत मिळाली असल्यास दुस-यांदा मिळणार नाही, असे ते सांगतात. खरे तर सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास देऊन शेतक-यांना धीर देण्याची गरज आहे. तेच असे बोलत असल्याने शेतकरी हतबल होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारीत आहेत.
या सरकारवर आणि केंद्र सरकारवर आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही. तत्कालीन पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक ठिकाणी चाय पे चर्चा केली.
यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी येथे २० मार्च २०१४ रोजी मोदींनी तेथील शेतक-यांशी चाय पे चर्चा केली. त्यांना मोठमोठी स्वप्ने दाखविण्यात आली. त्या स्वप्नांना भुलून लोकांनी मतदान केले.
मोदी पंतप्रधान झाले. मात्र लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. म्हणूनच त्या चाय पे चर्चेमध्ये सहभागी झालेल्या विठ्ठल जाधव नावाच्या शेतक-याने आत्महत्या केली.
हतबल झालेल्या शेतक-यांना पुन्हा उभे करायचे असेल तर २५ हजार रुपये हेक्टरी मदत करा आणि त्याला दोन हेक्टरची मर्यादा ठेवू नका, अशी मागणीही त्यांनी केली.
शेतक-यांना शंभर टक्के कर्जमाफी आणि वीजबिल माफी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. शिवसेनेचे अनिल कदम, काँग्रेसचे विजय वड्डेटीवार आदींनी या वेळी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.