पुणे जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या गारपिटीमुळे सुमारे २२ हजार ८०० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे/बारामती- पुणे जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या गारपिटीमुळे सुमारे २२ हजार ८०० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिके व फळबागा भुईसपाट झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
इंदापूर तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे ५० ते ६० गावातील सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. येत्या चार दिवसात नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे पूर्ण करण्यात येतील. या भागाची जिल्हाधिकार्यानी पाहणी केली आहे, अशी माहिती तहसीलदार संजय पवार यांनी दिली. इंदापूरचे सहाय्यक निबंधक बी. डी. मोहिते यांनी सांगितले, सरकारकडून किंवा सहकार विभागाकडून या बाबतचा जी. आर. अद्याप आम्हांस प्राप्त झाला नाही. तसा जीआर आल्यास गारपीटग्रस्तांच्या कर्जाच्या संदर्भातील प्रस्ताव बँकेस सादर करू. तालुक्यातील द्राक्षे, डािळब, केळी, ज्वारी, गहू, मका, कांदा, पपई आदी पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय पोल्ट्रीशेड, घरांचे देखील नुकसान झाले आहे. बोरी, कळस, शेळगाव, काझड, बिरंगुडी, निमगाव केतकी, वरकुटे, रामकुंड, कडबनवाडी, भरणेवाडी, लाकडी, िनबोडी, सणसर आदी गावांमधील शेती उद्ध्वस्त झाली आहे. पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार संजय पवार, तालुका कृषी अधिकारी संजय विश्वासराव यांनी दिले. ग्रामसेवक तलाठी, कृषी सहाय्यक पंचनामा करीत आहेत.
खेड तालुक्याच्या पूर्व भागात काल झालेल्या गारपिटीमुळे सुमारे शंभर हेक्टर क्षेत्रावरील गहू, कांदा, उन्हाळी बाजरी या पिकांचे १५ ते १६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी पर्यवेक्षक कैलास घुमटकर यांनी दिली. वाफगाव, वरुडे, चौधरवाडी, गाडकवाडी, जऊळके बुद्रुक, चिंचबाईवाडी या गावांना गारपिटीचा तडाखा बसला. सुमारे ४० हेक्टरवरील कांदा आणि ११ हेक्टरवरील कांदा बियाणांचे नुकसान झाले. तसेच, ३० ते ३५ हेक्टरवरील उन्हाळी बाजरी सपाट झाली. रब्बी गव्हालाही फटका बसला. गारपिटीने ओंब्या गळून पडल्या. आंब्याला मोठा फटका बसला. आंब्याचा मोहोर पूर्णपणे झडला. काही भागातील डािळबाच्या बागांना गारपिटीचा तडाखा बसून फळे गळाली किंवा डागाळली. या भागातील भाजीपाला पिकांवरही गारपिटीने संक्रांत आणली. बटाटय़ाच्या शेतातल्या पिकाचेही नुकसान झाले आहे. धान्याबरोबर चा-याचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शेतामध्ये रचलेल्या कडबा व सरमाडाच्या वळ्या भिजून चा-याचे नुकसान झाले आहे.
या आपत्कालीन संकटाला निवडणूक आचारसंहिता आडवी येणार नाही. संबंधित अधिका-यांना नुकसानग्रस्त शेतक-यांच्या शेतीपिकाचे पंचानामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले. नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून त्या पिकाचे पीककर्ज माफ करण्यात यावे; तसेच मध्यम मुदत कर्जाचे पुनर्गठण करण्याची आग्रही मागणी शेतक-यांनी जिल्हाधिकारी राव यांच्याकडे केली.
जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे तहसीलदार हिरामणी यांनी कृषी, महसूल व पंचायत समितीची संयुक्त बैठक घेऊन शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनाम्यासाठी १० पर्यवेक्षकांच्या नेतृत्वाखाली ४० कर्मचा-यांचे पथक तयार करण्यात आले असून, हे पथक नुकसान झालेल्या भागात जाऊन पंचनामे करणार आहे. बेल्हे येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत शेतक-यांनी आपल्या परिसरात झालेल्या नुकसानीची माहिती दिली. नुकसान झालेल्या भागामध्ये पीक कर्ज व वीजबिले माफ करावीत, बँकेने कर्जवसुली करू नये असे आदेश देऊन कर्जवसुली थांबवावी, जनावरांचा चाराही या गारपिटीमध्ये भुईसपाट झाल्याने जनावरांसाठी त्वरित चारा उपलब्ध करून द्यावा, शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी आदी मागण्या उपस्थित शेतकरी व पदाधिकार्यानी तहसीलदार हिरामणी यांच्याकडे केल्या.