देश सध्या संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. अशा वेळी देशाला गांधीजींच्या विचारसरणीची खरी गरज आहे. आदर्श समाज हा देशाच्या विकासाचा आधारस्तंभ मानला जातो. कोणत्याही समाजाचा विशिष्ट आदर्शापर्यंतचा प्रवास मूल्यांमार्फत होतो. ती मूल्यं गांधीजींनी आपल्या आचार-विचारांद्वारे देशाला दिली आहेत. हे लक्षात घेऊन या मूल्यांचं पालन करणं प्रत्येकाचं नतिक कर्तव्य आहे.
गांधीजींनी देशाला सत्य, अहिंसा या तत्त्वांची शिकवण फक्त विचारातूनच नाही तर आचारातूनही दिली. सध्या गांधीजी नोटांवरील आणि फोटोमधील प्रतिमे इतपतच आपल्यात उरले आहेत, हे दुर्दैवाने खरं आहे. तत्त्वांचं पालन करणं इतरांना कठीण वाटू नये, यासाठी त्यांनी स्वत: त्या तत्त्वांचा अंगिकार केला. खरं पाहता गांधीजी समजून घेण्याआधी त्यांच्या आचरणाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. खरं बोलावं ही अत्यंत साधी गोष्ट गांधीजींनी सांगितली. सत्य आचरण कसं असावं, हेही सांगितलं. पण त्या आचरणात आणण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही. समाजात एखादी वाईट घटना घडली, एखादी समस्या निर्माण झाली तर या तत्त्वांची आजघडीला किती गरज आहे, याचा अंदाज लावता येतो. जातीय तेढ निर्माण झाल्यानंतर होणा-या दंगली अिहसा या तत्त्वाची सामाजिक गरज जाणवून देतात. देशाच्या राजकारणाची पातळी समाजकेंद्री होण्याऐवजी व्यक्तीकेंद्री होत आहे. भ्रष्टाचाराच्या रोज नव्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे मथळे भरले जातात. तेव्हा समजतं, देश वेगळ्या दिशेने जात आहे. समाजातील प्रबळ वर्ग दुर्बळांवर होणा-या अन्यायाचं कारण बनत आहे. अनेकदा स्वत:च्या मुलभूत हक्कांसाठी व्यक्तीचा संघर्ष दिसतो. गांधीजींची तत्त्वं सध्याच्या युगात कालबाह्य ठरत आहेत, असा एक प्रवाह समोर येताना दिसतो. पण देशाची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता गांधीजींचे विचार या काळासाठीही लागू पडतात हे पटते.
गांधीजींनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण राष्ट्रहितासाठी दिला होता. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानातून फक्त स्वातंत्र्यप्राप्ती नव्हे तर मानवता आणि विश्वबंधुता या मूल्यांची शिकवण मिळते. गांधीजींची कृती आणि उक्ती यांच्यात काडीमात्रही फरक नसे. देशभर राबवल्या गेलेल्या स्वच्छता अभियानाला महात्मा गांधी यांचं नाव देण्यामागे त्यांची स्वच्छतेबाबतीत असणारी तत्त्वं कारणीभूत आहेत. स्वच्छता हा जगण्याचा अनिवार्य भाग आहे. याला अनुसरून वर्तनाचा गांधीजींनी आदर्श घालून दिला. स्वच्छता या तत्त्वाचा आधार स्वावलंबन हा आहे. मानवी मूल्यांना योग्य प्रतिष्ठा मिळावी हा त्यामागील सुप्त हेतू असे. वैयक्तिक स्वच्छतेबरोबर परिसर, गाव, राज्य, देश यांच्या सीमेपलीकडेही स्वच्छतेमार्फत पाहण्याची दृष्टी विकसित होणे या मागचा गांधीजींचा उद्देश होता. श्रम करणा-या व्यक्तीचा सन्मान व्हावा. यासाठी श्रमदानातून स्वच्छतेचा मंत्र गांधीजींनी दिला. आज या विचारांना आलेलं स्वरूप उत्सवी असलं तरी तितकंच बेगडी आहे. हक्क आणि अधिकारांची मोजदाद करणारा माणूस कर्तव्यांच्या तराजूतलं माप जाणिवेनी कमी टाकताना दिसतो.
महात्मा गांधीजींच्या नावाचा वापर राजकीयदृष्टय़ा केला जातो. अनेक नेते स्वत:ला त्यांच्या तोडीचं मानायलाही कमी करत नाहीत. त्यांचे कार्य, त्यांचा त्याग, तत्त्वनिष्ठा, विचार हे सारे अद्वितीय आहे यात शंका नाही. त्यामुळे अशी तुलना संयुक्तिक ठरत नाही. गांधीजींचे विचार घेऊन कोणी पुढे जात असेल तर ती कौतुकास्पद बाब आहे हे निश्चित. पण तेवढय़ाने त्यांची तुलना बापूजींशी होऊ शकत नाही. सध्याच्या काळात बापूजींचे विचार समजून घेणे हेच एक आव्हान आहे. कारण सध्या जो-तो स्वत:च्याच हिताचा विचार करण्यात रमला आहे. शिवाय विविध भौतिक सुखांकडील ओढा वाढला आहे. कोणत्या का मार्गाने होईना, मी हवे ते सुख मिळवणारच असा निर्धार केला जातो. त्यातून मग गरमार्गाचा अवलंब करण्याची वृत्ती बळावते. अशा परिस्थितीत समाजहिताचे भान बाळगणारे कितीजण उरले आहेत असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. देशातील विविध क्षेत्रात वाढत असलेला भ्रष्टाचार, वाढती गुन्हेगारी, अन्याय-अत्याचार या समस्यांमागील कारणांचा शोध घ्यायचा तर सत्ता आणि संपत्तीचा अविवेकी हव्यास हेच प्रमुख कारण असल्याचे दिसते. त्यामुळे सामाजिक जाणिवा बोथट झाल्यास आश्चर्य वाटायला नको. अशा वेळी स्वत:मधील बदलाबरोबर समाजजागृतीची, देशहिताच्या प्रेरणेची ज्योत पुन्हा एकदा पेटवणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणा-या नि:स्वार्थी, निष्कलंक चारित्र्याच्या आणि साधी राहणी, उच्च विचारसरणी असणा-या व्यक्तिमत्त्वांची आवश्यकता आहे.
आदर्श समाज हा देश विकासाचा आधारस्तंभ मानला जातो. कोणत्याही समाजाचा विशिष्ट आदर्शापर्यंतचा जो प्रवास होतो त्या मूल्यांमार्फत होतो ती मूल्यं गांधीजींनी देशाला दिली आहेत. अशा वेळी या मूल्यांचं पालन करणं प्रत्येकाचं नतिक कर्तव्य आहे. प्रत्येकाने मी कोणतेही नियम मोडणार नाही असा निश्चय करायला हवा. कारण भ्रष्टाचार विविध क्षेत्रात इतका खोलवर रुजला आहे की एका लोकपालाच्या नियुक्तीने किंवा कायद्याने त्याला आळा बसेल असं मानण्याचं कारण नाही. त्यामुळे प्रत्येकानेच लोकपालाची कर्तव्यं पार पाडायला हवीत. भ्रष्टाचाराला उत्तेजन देणं किंवा भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालणं या बाबींना आळा बसला तर भ्रष्टाचार आपोआप आटोक्यात येईल. पण असा निश्चय करण्यासाठी आणि त्याप्रती प्रामाणिक राहण्यासाठी आत्मचिंतन महत्त्वाचं ठरणार आहे. बापूजींच्या सत्याग्रहात आत्मशुद्धीच्या तत्त्वाचा आवर्जून समावेश केला जायचा. किंबहुना, ते आत्मशुद्धीनंतर समाजशुद्धीकडे वळायचे. कार्यकर्त्यांनाही ते याच मार्गाने जायला सांगत. म्हणूनच त्यांच्या लढय़ाचे वेगळेपण प्रकर्षाने पुढे येते.
सामाजिक चळवळींमध्ये नेत्याची आत्मशुद्धी महत्त्वाची आहे. नेता भ्रष्टाचारी आहे किंवा चोर आहे असं मानायचं तर त्यात मीही कुठे ना कुठे भागीदार आहे याची जाणीव व्हायला हवी. किंबहुना, तशी कबुली देण्याचं धाडस अंगी असेल तरच ख-या अर्थाने सामाजिक सुधारणांचा पाया घातला जाऊ शकतो. याशिवाय कोणत्याही चळवळीला ‘मास बेस’ असला तरच ती यशस्वी होते याचीही जाणीव ठेवायला हवी. स्वातंत्र्यपूर्व काळातील चळवळी अशाच स्वरूपाच्या होत्या. म्हणून इंग्रजांची अनेक वर्षाची राजवट आपण उलथून टाकू शकलो. पूर्वी देशाला बाह्य आक्रमणाचा धोका होता. आता बाह्य आक्रमणापेक्षाही अंतर्गत समस्यांचे आव्हान वाढीस लागले आहे. हे संकट सोपे नाही. यावर वैयक्तीक सुधारणा आणि आत्मपरीक्षणाचा उपाय गरजेचा ठरणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा गांधीविचारांच्या प्रचार आणि प्रसारावर भर दिला जाणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर बापूजींची एखादी तरी शिकवण आचरणात आणायला हवी. उदाहरणच द्यायचे तर बापूजी ‘नेहमी सत्य बोलावे’ असे सांगत. आज बहुतेकांना या साध्या-सोप्या तत्त्वाचा विसर पडला आहे. खरे बोलण्यासाठी किंवा सत्याला सामोरे जाण्यासाठी धाडस लागते. हे धाडस चिंतनातून, आत्मशुद्धीतून, पारदर्शक व्यवहारातून अंगी बाणवता येते. पण याच बाबींकडे दुर्लक्ष होत असेल तर लोक असत्याच्या मार्गानेच चालत राहणार. म्हणून गरज आहे ती त्यांना सत्याच्या मार्गाने जाण्यासाठी मार्गदर्शन करण्याची. ‘सत्याला मरण नाही’ या मंत्राचा जप आणि त्याप्रमाणे आचरण ठेवल्यास देशासमोर आणि समाजासमोर असलेले अनेक प्रश्न सहजगत्या सुटू शकतील या विषयी माझ्या मनात किंचितही शंका नाही.
स्वातंत्र्यलढय़ातील जनतेची एकजूट जुलमी सत्तेच्या विरोधात होती. क्रांतिकारकांनी जनतेतील आत्मविश्वास पुन्हा निर्माण केला. त्यातून जनता परकीय सत्तेच्या विरोधात उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरली. त्यातून इतिहास घडला आणि इंग्रजांना हा देश सोडून जावे लागले. पण आज इतक्या वर्षानंतरही परकीयांच्या आक्रमणाचा धोका कायम आहे. देशांतर्गत शत्रूही मोठय़ा प्रमाणात निर्माण होत आहेत. या घरभेद्यांना शोधून नेस्तनाबूत करायचे खरे आव्हान समोर उभे आहे. याशिवाय देश अनेक समस्यांनी पोखरत चालला आहे. थोडक्यात, ही संक्रमणावस्था आहे. त्यातून देश वाचवायचा आणि जनतेला ख-या अर्थाने स्वातंत्र्य, बंधुता प्रदान करायची असेल तर गांधीगिरी गरजेची आहे.