गर्भातील बाळांत व्यंग असेल तर गर्भपात करता येऊ शकतो, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. या निर्णयाचे दिलासादायक निर्णय असेच वर्णन करावे लागेल. डोंबिवली येथील एका महिलेच्या गर्भात २४ आठवडय़ाचे बाळ वाढत होते. पण या बाळाची कवटी विकसित झालेली नव्हती. त्यामुळे हे बाळ जन्मले असते तरी वाचले नसते. किंबहुना असे बाळ अधिक काळ गर्भात ठेवणे हे त्या महिलेसाठी त्रासदायक ठरणार असल्याने या दांपत्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने याबाबतचा निकाल देताना वैद्यकीय पथकाचा अहवाल ग्राह्य धरल्याने या दांपत्याला जरासा दिलासा मिळाला आहे. पण येत्या काळात अशी अपवादात्मक घटना घडणार असेल तर त्या त्या दांपत्यांसाठी न्यायालयाचा हा निकाल उपयोगी पडू शकतो.
मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी, १९७१ च्या कायद्यानुसार २० आठवडय़ानंतर गर्भपात करता येत नाही. या कायद्यात बदल करण्यात यावा याबाबतची एका डॉक्टरची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. असे असताना सर्वोच्च न्यायालयाने डोंबिवली येथील एका दांपत्याची निकड लक्षात घेता असा गर्भपात करण्याची परवानगी दिलेली आहे. असा अपवादात्मक गर्भपात करण्यास देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. २०१६ रोजी बलात्कार प्रकरणातील एका महिलेच्या गर्भात व्यंग असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने २० आठवडय़ानंतर गर्भपात करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे येत्या काळात या न्यायालयालाही १९७१च्या कायद्यात आवश्यक बदल करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे.
भारतात वीस आठवडय़ानंतर गर्भपात करण्याची परवानगी नाही. त्यामुळे अनेक श्रीमंत मंडळी परदेशात जाऊन असे गर्भपात करून घेतात. काही महिन्यांपूर्वी एका अभिनेत्रीच्या अशा गर्भपाताबाबतचे वृत्त वृत्तपत्रांत आलेले होते. त्यामुळे कायद्यालाही पळवाटा काढणारे असतात. त्यामुळे काळानुरूप कायद्यात बदल करणे आवश्यकही आहे. भारतीय घटना ही परिदृढ आणि लवचिकही आहे. त्यामुळे काळानुरूप राज्यघटनेत अनेक संशोधने झालेली आहेत. गर्भपाताबाबतच्या कायद्यातील तरतुदीमुळे जर कोणाच्या जीवावर बेतणार असेल तर या कायद्यात बदल करणे आवश्यकही ठरते. त्यामुळे ही जबाबदारी केवळ न्यायमंडळावर टाकून उपयोगी नाही. संसदेलाही त्यात पुढाकार घ्यावा लागेल.
मातृत्व हा स्त्रीसाठी आनंद सोहळा असतो. गर्भ पोटात वाढत असताना महिलांना असह्य वेदनाही होतात. कधी कधी गर्भातील बाळाच्या हालचालीने तिला आनंदही होतो. त्यामुळे वेणा सहन करीत ती अखेर बाळाचा जन्मसोहळाही अनुभवत असते. पण गर्भातील बाळात व्यंग असेल तर ते त्या त्या मातेसाठी धोकादायकही ठरू शकते. त्यामुळे गर्भपात करून महिलेचा जीव वाचवता येऊ शकतो. २४ आठवडय़ांच्या सव्यंग गर्भामुळे गर्भपातास परवानगी देण्याचा न्यायालयाचा निर्णय योग्यच आहे. पण त्याचे येत्या काळात रूपांतर कायद्यात व्हावे, त्याने अनेकांना दिलासा मिळेल.