भाजपा महिला कार्यकर्तीचा विनयभंग करणा-या गणेश पांडेला तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी गुरुवारी विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत सभागृहात गोंधळ घातला.
मुंबई- भाजपा महिला कार्यकर्तीचा विनयभंग करणा-या गणेश पांडेला तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी गुरुवारी विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत सभागृहात गोंधळ घातला. अखेर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी निवेदन करून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे सांगत सारवासारव केली.
गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे गणेश पांडे प्रकरणी मुद्दा उपस्थित केला. पांडे याने भाजपा कार्यकर्ती मैथिली जावकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह अनुद्गार काढले आहेत.
शिवाय तिच्या मराठीपणाबद्दलही आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. तरीसुद्धा काही मराठीचा कैवार घेणारे गप्प का, असे सांगत शिवसेना आणि मनसेला टोला मारला. या महिलेने भाजपाचे आशीष शेलार यांना दिलेल्या तक्रारीत भाजपाच्या एका बडया नेत्याच्या नावाचाही उल्लेख केला असल्याचे पाटील यांनी सांगितले.
त्यामुळे गणेश पांडे याला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. त्याला जोरदार समर्थन देत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेत सरकारला कोंडीत पकडले. त्यावर सदर महिलेने तक्रार करताच पांडेची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
तसेच सदर महिलेला पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले होते. पण तिने नकार दिल्याने हे प्रकरण आम्ही महिला आयोगाकडे सोपविले. आता या महिलेने स्वत:हून
तक्रार दाखल केली आहे. पोलीस पुढील कारवाई करत असून या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सारवासारव केली.