अच्युत गोडबोले आणि डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांनी लिहिलेले ‘गणिती’ हे पुस्तक लवकरच ‘मनोविकास प्रकाशन’तर्फे प्रकाशित होत आहे. ४८० पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तकात गणिताचा इतिहास, मूलतत्त्व, संकल्पना आणि गणितज्ञांची ओळख सोप्या-सुटसुटीत, पण रंजक भाषेत सांगितली आहे. या पुस्तकात नेमकं काय आहे, याची ही झलक.
गणिताची भीती भल्याभल्यांना वाटते. विशेषत: शाळेत जायला लागल्यावर सुरुवातीच्या काळातच हौदाचं उदाहरण आठवून अंगावर काटा येतो. तो हौद, ती गळकी तोटी आणि ती बादली किती वेळात पाण्यानं भरेल असे भीतिदायक प्रश्न! त्याचप्रमाणे दुस-या उदाहरणात विचारलेलं असतं त्यात अमुकच्या वडिलांचं वय आणि त्यात तमुकचं वय वजा केलं की मिळणारं अमुकतमुकचं वय हे आजही आठवलं की, जीवाचा थरकाप उडतो.
गणिताची ही भीती घालवण्यासाठी अच्युत गोडबोले आणि माधवी ठाकूरदेसाई यांनी संयुक्तपणे ‘गणिती’ हे पुस्तक लिहिलं आहे. अच्युत गोडबोले यांनी आजपर्यंत विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, व्यवस्थापन, साहित्य आणि संगीत या विषयांवर पुस्तकं आणि विविध वर्तमानपत्रांत कॉलमच्या माध्यमातून लेखन केलं आहे. त्यांचं लिखाण सोप्या भाषेत पण रंजकपणे वाचकांची त्या त्या विषयातली गोडी वाढवणारं असतं. ‘गणिती’ या पुस्तकात गणिताचा इतिहास आणि गणिताची मूलतत्त्वं सोप्या आणि सुटसुटीत भाषेत समजावून सांगितली आहेत. खरं तर पुस्तकाचा मूळ उद्देशच गणिताची भीती नष्ट होऊन या विषयाची गोडी निर्माण व्हावी हा आहे. त्यासाठी या पुस्तकात अंकगणित, भूमिती, बीजगणित, कॅल्क्युलस, ग्राफ थिअरी, वक्र स्पेस, गेम थिअरी, टोपॉलॉजी, चौथी मिती, नॉन-यूक्लिडियन जॉमेट्री, सेट थिअरी, ग्रुप थिअरी, मॅट्रिक्स, तर्कशास्त्र, संभाव्यताशास्त्र, संख्याशास्त्र, शून्य आणि अनंत अशा अनेक कल्पना या पुस्तकात सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत. याशिवाय गणितीमध्ये अनेक गणितज्ञांची चरित्रं तर आहेतच, पण त्याचबरोबर गणिताची गरज कशी भासायला लागली, अनेक थिअरींचा उदय कसा आणि कुठल्या परिस्थितीत झाला, गणिताची मूलतत्त्वं कोणत्या परिस्थितीत निर्माण झाली आणि ती करण्यात कोणत्या गणितज्ञांचा पुढाकार होता, त्यांच्यात मारामाऱ्या आणि वादविवाद कसे झाले, त्यांनी एकमेकांना सहकार्यही कसं केलं याचा रंजक इतिहासही या पुस्तकात रंगवलाय. त्यामुळे ही मूलतत्त्वं नुसतीच हवेत तरंगणारी सूत्रं न राहता जिवंत माणसांच्या आयुष्याला व्यापून टाकतात आणि गणिताच्या सगळ्या इतिहासाचाच एक अविभाज्य भाग होऊन जातात आणि त्यांच्याविषयीचं आपलं आकलन वाढायलाही मदत करतात. थोडक्यात आपले दोस्त बनून ती एका सुरस गोष्टीचा हिस्सा बनतात.
हजारो वर्षापूर्वी बॅबिलोनियन, इजिप्शियन, माया, इंका, भारतीय, अरब, चिनी अशा संस्कृतीत गणिताचा उगम कसा झाला, हेदेखील या पुस्तकात वाचायला मिळेल. आर्यभट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, पायथॅगोरस, युक्लिड, आर्किमीडिज यांच्यासारखे गणिताचे पाया रचणारे महान गणितज्ञ या पुस्तकात भेटतात. तसंच देकार्त, फर्मा, न्यूटन यांच्यासारखे गणिताला नवीन दिशा देणारे अतिरथी, महारथी आणि लायब्निझ आणि पास्कल यांच्यासारखे अज्ञात राहिलेलेगणितज्ञांविषयी पुस्तकात वाचायला मिळतं. आँयलर, लाग्रांज, कोशी, गाउस यांच्यासारखे अमूर्त गणिताचे राजे या मैफलीला हजेरी लावतात. मांज, फुरिये यांच्यासारखे राजमैत्रीनं पोळलेले, आबेल, रीमान, रामानुजन यांच्यासारखे दारिद्रय़ानं होरपळलेले, गाल्टा आणि टय़ूरिंग यांच्यासारखे उपेक्षा झालेले, तर बूल, पॉइनकेअर यांच्यासारखे गणितातले एकलव्य, गर्डेल, नॅश यांच्यासारखे मनोरुग्ण गणितज्ञ, फ्रेगे, रसेल असे तर्कतीर्थ गणितज्ञ या सगळ्यांच्या भावविश्वाबद्दल, त्यांच्या संघर्षाबद्दल, त्यांच्यातल्या वादविवादांबद्दल, चढाओढीबद्दल आणि आशा-निराशेबद्दल हे पुस्तक एक अनोखं भावविश्व उभं करतं.
‘गणिती’ हे जरी पाठय़पुस्तक नाही किंवा झटपट आकडेमोड कशी करावी, याविषयीचंही ते पुस्तक नाही, तरीही हे पुस्तक वाचल्यावर अनेक विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना या पुस्तकामुळे गणिताची वेगळी दृष्टी मिळेल आणि आपण शिकत किंवा शिकवत असलेल्या या विषयाचा खूप आनंद घेता येईल. हे पुस्तक गणिताविषयी नवीन वाचण्यासाठी उद्युक्त करणारं आहे. थोडक्यात, कुठल्याही शाखेच्या प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, पालक, गृहिणी आणि व्यावसायिक या सगळ्यांनी जरूर वाचावा असा हा दुर्मीळ खजिना आहे!