आझाद मैदान दंगलीच्या पार्श्वभूमीवर, गणेशोत्सव मंडळातील काही सदस्यांना बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे देणार आहेमुंबई – आठवड्यापूर्वी आझाद मैदानासमोर घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, महिन्याभरावर येऊन ठेपलेला गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती निवडक कार्यकर्त्यांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे देणार आहे. त्यासाठी प्रत्येक मंडळाने गणसेवक नेमावेत, अशी सूचनाही समितीने केली आहे.
समितीने गणसेवक नेमण्याबाबत केलेल्या सूचनांत ते किती असावेत, याचीही कल्पना दिली आहे. छोटय़ा मंडळांनी कमीत कमी 10 व मोठ्या मंडळांनी जास्तीत जास्त 15-20 गणसेवक नेमावेत, असे समितीने सुचवले आहे. हे गणसेवक तीन पाळ्यांत काम करतील, असे प्रशिक्षण गेल्या वर्षीही देण्यात आले होते. मात्र यंदा दोन ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे. अधिकाधिक कार्यकर्त्यांनी या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठीही समन्वय समिती प्रयत्न करते आहे. प्रशिक्षण घेणा-या गणसेवकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून, हे प्रशिक्षण केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित नसेल. गणेशोत्सवानंतरही शहर-उपनगरांत आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास प्रशिक्षित गणसेवक पोलिस, पालिका कर्मचा-यांना मदत करतील, असेही समितीचे अध्यक्ष दहिबावकर यांनी सांगितले.
वरळी सी-फेस येथील पालिकेच्या शाळेत सात सप्टेंबर रोजी तर विलेपार्लेतील पालिका शाळेत 12 सप्टेंबर रोजी आपत्ती व्यवस्थापनाची कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत मार्गदर्शनासाठी पोलिस आयुक्तांना बोलावण्यात येणार आहे. तसेच पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाशीही चर्चा सुरू आहे. या कार्यशाळेमध्ये मुसळधार पाऊस, आग, बाँबस्फोट अशा आपत्कालीन स्थितीत गर्दीचे व्यवस्थापन कसे करायचे, सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना करायच्या याबाबत प्रशिक्षण दिले जाईल. – अॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती