गडचिरोली जिल्ह्यातील ८० टक्के नागरिक आजही आधारकार्डपासून वंचित असल्याची माहिती उघड झाली आहे.
गडचिरोली- जिल्ह्यातील फक्त २० टक्के नागरिकांच्या आधारकार्डची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर, ८० टक्के नागरिक आजही आधारकार्डपासून वंचित असल्याची माहिती उघड झाली आहे. जिल्ह्याची लोकसंख्या १० लाख ७१ हजार ७६५ आहे. मात्र, यापैकी फक्त २ लाख ८७ हजार १७६ नागरिकांची आधारकार्डची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर, शिल्लक ७ लाख ८४ हजार नागरिकांना अद्याप आधारकार्ड मिळालेले नाही.
केंद्र सरकारतर्फे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड काढण्याची मोहीम देशभरात राबवली जात आहे. जिल्ह्यात बंगळूरु येथील एका कंपनीला आधारकार्ड तयार करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. आधारकार्डची नोंदणी केल्यानंतर ही नोंदणी कंत्राटदार कंपनीच्या बंगलोर येथील मुख्यालयामध्ये नोंद होते. त्यानंतर तयार झालेले आधारकार्ड पोस्टामार्फत संबंधित नागरिकांच्या पत्त्यावर घरपोच पाठवण्यात येतात.
जिल्ह्यात पुरवठा विभागाच्या वतीने स्वस्त धान दुकानामार्फत आधारकार्ड तसेच राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते क्रमांक मागवले जात आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांसाठीही आधारकार्ड आवश्यक आहे. जिल्ह्यातील ८० टक्के नागरिक आधारकार्डपासून वंचित आहेत. त्यांची ना तात्काळ नोंदणी करून आधारकार्ड देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.