‘जगाला विश्वबंधुत्वाची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांचा बुद्धयांक सारखाच आहे,’ असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर काँग्रेसने सोमवारी सडकून टीका केली.
नवी दिल्ली- ‘जगाला विश्वबंधुत्वाची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांचा बुद्धयांक सारखाच आहे,’ असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर काँग्रेसने सोमवारी सडकून टीका केली. गडकरी यांचे हे वक्तव्य त्यांच्या पक्षाची विचारपद्धती व मानसिकतेच्या स्तराचे दर्शन घडवत असून, त्यांनी याबाबत जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
‘मानसशास्त्रानुसार स्वामी विवेकानंद व दाऊद इब्राहिम यांच्या बुद्धयांकाची तुलना केल्यास तो सारखाच असल्याचे दिसून येईल. अर्थात, विवेकानंदांनी त्याचा वापर राष्ट्रनिर्मिती, विश्वबंधुत्व आणि अध्यात्माच्या प्रचारासाठी केला, तर दाऊदने गुन्हेगारी विश्वात स्वत:चा दबदबा निर्माण करण्यासाठी बुद्धयांकाचा वापर केला,’ असे रविवारी भोपाळ येथील एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचा काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी खरपूस समाचार घेतला.
‘गडकरी यांचे वक्तव्य म्हणजे त्यांच्या पक्षाच्या संस्कृतीचे प्रदर्शन आहे. देशातील एका श्रेष्ठ विचारवंताशी एका कुख्यात गुंडाची तुलना कशी काय केली जाऊ शकते’, असा सवाल माहिती व प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी केला. एकीकडे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे स्वामी विवेकानंद यांचे आदर्श जोपासत असल्याचे भासवत असतानाच, दुसरीकडे पक्षाच्या अध्यक्षांनी असे वक्तव्य करणे हे पक्षाच्या दुटप्पी धोरणाचे द्योतक आहे. या वक्तव्याबाबत केवळ सारवासारव करून चालणार नाही, तर भाजपने देशातील जनतेची माफी मागावी, अशी मागणीही तिवारी यांनी केली.
दरम्यान, आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे. स्वामी विवेकानंदांनी सत्कर्मासाठी, तर दाऊदने दुष्कृत्यांसाठी आपल्या बुद्धीचा वापर केला, असे आपणास म्हणायचे होते. मात्र प्रसारमाध्यमांनी आपले बोलणे चुकीच्या पद्धतीने सादर केले, असे ते म्हणाले.
गडकरींची तुलना कसाबशी केली तर..
गडकरींच्या या वादग्रस्त विधानाचा समाचार घेताना काँग्रेस नेते जगदंबिका पाल म्हणाले, ‘कोणत्या आधारे गडकरी यांनी विवेकानंदांची तुलना दाऊदशी केली. उद्या जर कोणी गडकरींची तुलना अजमल कसाबशी केली तर भाजप त्याला काय उत्तर देईल?’
मोदी व त्यांचे समर्थक आता गप्प का?
स्वामी विवेकानंद यांच्या सत्य व निष्ठा या आदर्शाचे आपण पालन करतो, असे सांगणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व त्यांचे समर्थक गडकरी यांच्या वक्तव्याबाबत मूग गिळून गप्प का आहेत, असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेशमधील राघवगड येथे पत्रकारांशी बोलताना केला. अशी वक्तव्ये करण्याची संघाची परंपरा आहे. गडकरी याच मुशीतून आले असल्याने ते ही परंपरा पुढे चालवत आहेत, असेही सिंह म्हणाले.