चित्रपटाची श्रीमंती जितकी आर्थिक असते तितकीच ती सर्जनशीलतेच्या पातळीवरचीही असते. अशाच सर्जनशीलतेच्या दृष्टीने, कामाच्या परिपूर्णतेचा अनुभव आपल्याला ‘अ रेनी डे’ हा चित्रपट पाहताना येतो.
![a rainy day (2)](http://prahaar.in/wp-content/uploads/2014/02/a-rainy-day-2-300x240.jpg)
दिग्दर्शक : राजेंद्र तालक
कलाकार : मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे
या चित्रपटाला एक कथा आहे, एक सूत्र आहे, एक र्सवकष अनुभव आहे. ही काही चार-दोन वाक्यांत सांगण्याची काऊचिऊची कथा नाही. कथा आहे नवरा-बायकोची, कथा आहे समाजाची, कथा आहे बदलत्या जाणिवांची, कथा आहे संस्कारांची, जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची, वैचारिक, आर्थिक श्रीमंतीची. ही एक कथा नाही, या एका कथेतून अनेक कथा, अनेक जाणिवा परिष्कृत होताना दिसतात. त्या भावतात, त्या अंतर्मुख करतात. आपल्याच जीवनाचा पुन्हा एकदा नव्याने व साकल्याने विचार करायला लावतात. आपल्या मूल्यांना चाचपडून पाहायला भाग पाडतात. कथा तशी दोघांची अनिकेत (सुबोध भावे) व मुग्धा (मृणाल कुलकर्णी). बस्स इतकंच. बाकी सगळं पडद्यावर पाहण्यासारखं, अनुभवण्यासारखं, चर्चा जर करायची असेल तर ती माध्यमाची. त्यातल्या परिपूर्णतेची.
राजेंद्र तालक यांची ही कथा, आता दिग्दर्शकाचीच कथा असल्याने मांडणीही त्याचीच. ही मांडणीच या चित्रपटाचे खरे बलस्थान आहे. काही काही प्रसंग पाहताना थेट आपल्या इराकी किंवा इराणी चित्रपट पाहत असल्याचा फिल जरी आला तरी चित्रपट व प्रसंग अगदी आपले, आपल्या अवतीभवती घडणारे. फार थोडे असे चित्रपट असतात की जे अगदी पहिल्या फ्रेमपासूनच आपली पकड घेतात. प्रेक्षकाला चित्रपटात अंतर्भूत करून घेतात. थोडक्यात सांगायचं तर त्याला सिनेमागृहाच्या खुर्चीत बसल्या बसल्याच त्या जागेवर घेऊन जातात. चित्रपटाचं नावच ‘अ रेनी डे’ असल्याने दिवस सुरू होतो तो पावसातच. अगदी श्रेयनामावली सुरू असतानाच पाऊस आपल्या सोबतीला येतो. तो कॅमे-याच्या माध्यमातून इतका जिवंतपणे आपल्यासमोर येतो की केवळ मृदंगच तेवढा यायचा बाकी आहे, असं वाटतं. चित्रपट जसजसा पुढे जात राहतो तसतसा दिग्दर्शक अधिकाधिक मोठा होत गेलेला पाहायला मिळतो. एका वेळेला तर तो चित्रपट अशा पातळीवर नेऊन ठेवतो की आता काहीही झालं तरी चालेल पण चित्रपट सोडायचा नाही, अशी एक सार्वत्रिक भावना निर्माण होते. एरवी चित्रपटाचा मध्यंतर कधी होतो व खायला कधी जातो असे म्हणणारे प्रेक्षकही आता मध्यंतरही होऊ नये या विचारापर्यंत येतात. दिग्दर्शकाने आपल्या कामात कोणतीही तडजोड केली नाही. अगदी हा चित्रपट व्यावसायिक असूनही तो तुलनेने लहान आहे.
तरीही तो अशा ठिकाणी संपतो जिथे तो संपायलाच हवा होता. कुठेही फाफटपसारा नाही, कुठेही एकही अशी फ्रेम नाही की जी का आली असा विचारही मनाला शिवत नाही. थोड्या वेळाने तो प्रेक्षकांना आपल्यात इतकं एकरूप करून टाकतो की आपल्याला संमोहित करून टाकलंय की काय अशी शंका यावी. दिग्दर्शकाने कशी बांधीव पटकथा लिहावी यासाठी या चित्रपटाची पटकथा अभ्यासाला लावावी. त्यावर अभिराम भडकमकर याचे संवादही तितकेच मोजके. चित्रपटाला पूरक व त्याचा बोलपट होणार नाही याची पूर्ण दक्षता घेऊन लिहिलेले. ‘मी व्यावसायिक आहे त्यामुळे काय बोलायचं यापेक्षा काय बोलायचं नाही हे मला चांगलं कळतं’ हे याच चित्रपटातल्या एका वाक्यासारखं.
आता इतक्या चांगल्या दिग्दर्शनाला कॅमे-याचीही तितकीच साथ हवी. संजयने ती जबाबदारी अगदी लीलया उचलली आहे. त्याच्या कॅमे-याचे काम इतके प्रामाणिक आहे, त्यातही त्याने वापरलेला प्रकाश इतका खरा की त्याला आता कुठे ठेवावं व कुठे नाही असं होऊन जातं. चित्रपट हे माध्यम काय आहे, त्याची ताकत काय या सा-या प्रश्नांची उत्तरे संजय जाधव अगदी आपसूक देऊन जातो. एक श्रेष्ठ सिनेमॅटोग्राफर एखाद्या चित्रपटाची उंची किती वाढवू शकतो याचा एक वस्तुपाठच संजयचं काम देतं.
त्याच्यानंतरच सगळ्यात मोठं योगदान आहे रसूल पुक्कुटीचं. या माणसानं ‘स्लमडॉग मिलेनिअर’ केलाय. एखाद्या सामाजिक क्षेत्रात काम करणा-या व्यक्तीला मॅगेसेसे पुरस्कार मिळाल्यानंतर भारतीयांना त्याचं महत्त्व कळतं तसं काहीसं त्याचं झालंय. हा चित्रपट अनुभवण्याचा आहे, पाहण्याचा आहे तसाच तो रसूलमुळे ऐकण्याचाही झाला आहे. चित्रपट पाहताना जीवाचे कान देऊन तो ऐकावा हे त्याने या चित्रपटातून मराठी चित्रपट प्रेक्षकांना शिकवलंय. चित्रपटातल्या ध्वनीचे इतके बारकावे त्याने टिपलेत की क्या बात हैं, चिअर्सच्या कोलाहालात ग्लासाला ग्लास भिडल्याचा आवाज असो, रेल्वे गाडी जंगलातून, मैदानातून, पुलावरून, बोगद्यातून जातानाचा ध्वनीतला फरक असो की एका मेणबत्तीच्या ज्योतीवर पडलेल्या एका पाण्याच्या थेंबाचा आवाज असो हे सारे त्याने आपल्याला ऐकवलेत. काही काही कलाकार एकत्र येतात व स्वत:च्या समाधानासाठी, पूर्ण कौशल्य वापरून चित्रपट करतात तसे या चित्रपटाचे झाले आहे. त्याच्याबरोबरीने अशोक पत्की यांचे संगीत इतके संयत, इतके पारदर्शी व चित्रपटाच्या एकंदरीत पोताबरोबर जाणारे आहे की त्याला किती दाद द्यावी! त्यावर कडी म्हणजे ती आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या आवाजातली भैरवी. एका अभिरुची संपन्न मैफलीची अखेर तितकीच समृद्ध असावी हे स्पष्ट करणारी. बरं चित्रपटातल्या या सा-या तांत्रिक कौशल्याच्या बाबी, कथेच्या आशयाला, त्याच्या गाभ्याला कुठेही झाकाळून टाकत नाहीत तर त्याला अधिक निखार प्रदान करतात.
आता या सा-या गोष्टी ज्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत त्या अभिनेत्यांनीही जे काम केले आहे, त्याला अभिनय म्हणावा का अशी भावना निर्माण होते. प्रत्येकानेच आपापल्या भूमिकेत जाऊन आपल्यासमोर ती ती पात्रं जी हवी होती अशी उभी केली आहेत, असंच त्यांच्याविषयी बोलता येईल. त्यातही मुख्य भूमिकेत असलेल्या सुबोध व मृणाल यांनी आपली अशी काही जुगलबंदी सादर केली आहे की कोणाचाही एक सूरही कुठे हललेला नाही. सुबोधने आपली ही भूमिका करताना पुन्हा एकदा त्याच्यातल्या परिपक्व व संयत अभिनेत्याचे दर्शन घडवले आहे. मृणालसाठी या अशा भूमिकेचा पोत नवीन नसला तरी आपल्यासमोर ती जो अनुभव पेश करते, ज्या पद्धतीने या भूमिकेतले बारकावे, त्यातले अनेक पदर आपल्यासमोर उकलते, त्याला खरोखरच तोड नाही. या दोघांवर बराच वेळ कॅमेरा आहे, त्यांनी तर आपलं काम चोख केलंय, मात्र त्यांच्याबरोबरीनेच जे एका एका प्रसंगापुरते आले आहेत त्यांनीही आपले ते ते पात्र सजीवपणे दाखवले आहे. मनोज जोशी, अजिंक्य देव, नेहा पेंडसे, मीनल, सुलभा आर्य, संजय मोने सगळ्यांनी या चित्रपटात जे योगदान दिले आहे त्याने हा अनुभव अधिकच व्यापक, सर्वसमावेशक व पुन्हा समृद्ध झाला आहे. या चित्रपटाने एका चांगल्या संघभावनेचा अनुभव दिलाच, त्याचबरोबर या माध्यमात काय काय करता येऊ शकते हेही दाखवून दिले आहे. मराठी चित्रपटसृष्टीला पन्नास वर्ष पुढे घेऊन जाणारा हा चित्रपट दिल्याबद्दल सर्व रसिकांतर्फे या सा-या टीमचे आभार मानायला हवेत. एखाद्या महोत्सवातले अधिकाधिक चित्रपट पाहून रोमांचित झालेल्या जाणकार प्रेक्षकांसमोर मराठी चित्रपटसृष्टीच्या वतीने हा एक चित्रपट जरी ठेवला तरी बाजी आपल्या हातात येईल.