बायबलबद्दल अनेक चुकीच्या कल्पना लोकमानसात रूढ आहेत. ते येशू ख्रिस्ताने लिहिले आहे इथपासून ते कुणा लेखकाने एका ठिकाणी बसून लिहिले आहे इथपर्यंत अनेक गरसमज आहेत.
बायबलबद्दल अनेक चुकीच्या कल्पना लोकमानसात रूढ आहेत. ते येशू ख्रिस्ताने लिहिले आहे इथपासून ते कुणा लेखकाने एका ठिकाणी बसून लिहिले आहे इथपर्यंत अनेक गरसमज आहेत. वास्तवात बायबल म्हणजे जवळजवळ १००० वर्षे अनेक लेखकांनी लिहिलेल्या एकूण ६६ पुस्तकांचा संग्रह आहे. यातील येशू ख्रिस्ताच्या जन्माआधीच्या पहिल्या ३९ भागांना ‘जुना करार’ म्हणतात. (मात्र त्यात प्रभूच्या जन्माच्या ६०० वर्षेपर्यंत आधीच्या लेखात त्याच्या जन्माबद्दल आणि जीवनाबद्दलच्या अनेक भविष्यवाण्या दिसतात.)
उरलेल्या केवळ २७ भागांचा ‘नवा करार’ होतो. यात येशूच्या स्वर्गारोहणानंतर शिष्यांनी लिहिलेली त्याची ४ ढोबळ चरित्रे, एक बखर, एका शिष्याला झालेला साक्षात्कार आणि शिष्यांनी विविध चच्रेसना लिहिलेल्या २१ पत्रांचा संग्रह आहे. पूर्णलेखन अतिशय सोपे, सरळ, बोधप्रद असून, त्यातील अनेक साहित्यिक सौंदर्यस्थळेही मोठी मोहक आहेत.
काही गूढ संदर्भ
‘उत्पत्ती’ ते ‘अनुवाद’ या प्रेषित मोशेने लिहिलेल्या भागात विश्वनिर्मिती, माणसाचे स्वर्गातून अध:पतन, देवाने दिलेले नियम, मोशेचे समाजशास्त्रीय आणि राजकीय विवेचन, इतिहास, राजकीय घडामोडी, धार्मिक कर्मकांड याबद्दलचे सविस्तर लेखन आहे. याशिवाय इस्रायल लोकांच्या प्राचीन नेत्यांचा इतिहास आणि संदेष्टे म्हणून उल्लेख केलेल्या प्रबुद्ध धार्मिक व्यक्तींचे सविस्तर लेखन आहे.
‘यहेज्केल’ या भागातील काही वर्णन तर परग्रहावरील मानवाच्या पृथ्वीभेटीसारखे वाटते. (यहेज्केल अध्याय १ वचन ४ ते ९. आणि १६ ते २८. विशेषत: पहिल्या अध्यायातील वचन ९, १९, २०, २१, २३, २५, आणि २८. तेव्हाची भौतिकशास्त्रातील प्रगती पाहता लोकांना मुळीच परिचित नसलेल्या प्रगत अभियांत्रिकी वाटणा-या वस्तूंबद्दलचे ते वर्णन आहे, असे स्पष्ट होते.
टीव्हीच्या ट्रॉलीला सगळ्या बाजूला फिरू शकणारी चाके हे अगदी अलीकडे नव्याने घडलेली मेकॅनिक्समधील नवी सुधारणा आहे. तशी चाके जोडलेल्या आणि अवकाशातून उतरलेल्या वाहनांचे यहेज्केलने केलेले वर्णन गूढ वाटते. प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कुणी असे वर्णन करू शकणार नाही. काही पाश्चिमात्य आधुनिक लेखकांनी अशा काही भागांवर संशोधन करून ते नक्कीच परग्रहावरून आलेल्या अंतराळीय वाहनाचे आणि तेथील प्रगत मानवाचे वर्णन असल्याचे म्हटले आहे. (Chariots of God संशोधनपर पुस्तक मुळातून पाहावे.)
यहेज्केल, यिर्मया, योएल, यशया या संदेष्टय़ांनी मानवकल्याणासाठी दिलेले अनेक संदेश आपण वाचतो. काही वेळा तर या संन्यस्त लोकांनी राजाचा पाणउतारा करून त्याला समजाविण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला, सत्तांध राजसत्तेला जनहित आणि शहाणपण शिकविल्यामुळे काही प्रेषितांना जीवही गमवावा लागल्याचे दिसते.
‘यशया’ नावाच्या संदेष्टयाचा ग्रंथ तर भविष्याचा वेध म्हणून आणि सुंदर साहित्यिक कृती म्हणूनही वाचण्यासारखा आहे. कधी कठोर न्यायाधीशाच्या रूपातील ईश्वर आणि त्याची चुका करणारी प्रजा यांच्यात मध्यस्त तर कधी क्षमाशील पिता आणि त्याची भरकटलेली लेकरे यांच्यातील समेट घडवून आणणारा गुरू या भूमिकेतून या संदेष्टय़ांनी आपली भूमिका पार पडली आहे. ‘यशया’ने भावी चांगल्या काळाचे, जणू सत्य युगाचे, केलेले वर्णन उत्तम साहित्याचा नमुना आहे.
‘लांडगा कोकराजवळ राहील. चित्ता करडाजवळ बसेल. वासरू, तरुण सिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. तान्हे बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल. थानतुटे मुल फुरशाच्या बुबुळाला हात लावील. देवाच्या पवित्र डोंगरावर ती इत:पर उपद्रव देणार नाहीत, कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी (त्या काळी) परिपूर्ण होईल.’
सर्व रसांचे भांडार
‘गीतरत्न’ हा भाग अत्यंत रमणीय असे उत्तम साहित्यिक गुण असलेले शृंगारिक दीर्घकाव्य म्हणूनही अभ्यासता येतो. त्यातील शृंगाररसाने ओतप्रोत भरलेल्या भागातील एकच सूचक उतारा पाहा, ‘माझा वल्लभ मला म्हणाला, माझे प्रिये, माझे सुंदरी, उठ, चल.पाहा, हिवाळा गेला आहे; पृथ्वीवर फुले दिसू लागली आहेत;
पक्षी गाऊ लागण्याचा समय आला आहे;
आमच्या प्रांतात होल्याचा शब्द ऐकू येत आहे.
अंजिराची हिरवी फळे लाल होऊ लागली आहेत; द्राक्षीस फुलवरा येऊन सुगंध सुटला आहे.
माझे प्रिये, माझे सुंदरी, उठ, चल ये.’
तसेच ‘उत्पत्ती’ या भागातील विश्वाच्या निर्मितीबद्दलचा हा उतारा पाहा – ‘मग देव बोलला, ‘‘दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होवोत, त्या चिन्हे, ऋतू, दिवस व वर्षे दाखविणा-या होवोत.’’ देवाने दोन मोठया ज्योती केल्या. दिवसासाठी मोठी ज्योती (सूर्य) आणि रात्रीसाठी चंद्र.’ किती सुंदर वर्णन!
एका भागात परमेश्वराची स्तुती करताना बायबल म्हणते, ‘आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरीक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. वाचा नाही, शब्द नाही, वाणी ऐकू येत नाही तरी त्याचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो, त्याचे शब्द दिगंतरी पोहोचतात.’ हा उल्लेख भारतीय आध्यात्मातील ‘ब्रह्मांडातल्या अनाहत नादाच्या’ संकल्पनेच्या किती जवळ आहे हे पाहून आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही.
स्रोतसंहितेतील परमेश्वराच्या वत्सलतेचे हे वर्णन पाहा, ‘तो मेघांनी आकाश आच्छादितो, भूमीकरिता पर्जन्य तयार करितो. पशूंना, पक्ष्यांना, कावकाव करणा-या पिलांना त्यांचे अन्न देतो.’ एका ठिकाणी एखाद्या मराठी संतांप्रमाणे एका स्तोत्राच्या लेखकाने देवाशी कशी जवळीक साधलीये पाहा, तो म्हणतो,
‘हे परमेश्वरा, माझ्या वै-यांपासून मला मुक्त कर,
मी तुझ्या पाठीशी येऊन लपलो आहे.’
परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकल्यावर तो कृतज्ञपणे मात्र अगदी अलंकारिक भाषेत म्हणतो,
‘नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून
त्याने मला वर काढिले. माझे पाय खडकावर ठेविले
आणि माझी पावले स्थिर केली.’
‘स्तोत्रसंहिता’ नामसंकीर्तनाचे महत्त्व सांगताना म्हणते,
‘कर्ण वाजवून, सतार व वीणा वाजवून त्याचे स्तवन करा.
डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करा.
तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्याचे स्तवन करा.
खणखणणारे टाळ वाजवून त्याचे स्तवन करा,
झणझणणा-या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा.
प्रत्येक प्राणी परमेशाचे स्तवन करो.’
येशू ख्रिस्तानेही आपल्या प्रवचनांत अतिशय चित्रमय भाषेचा वापर केल्याची नोंद शुभवर्तमाने करतात. ‘तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कुणाचे दोष काढू नका. तू डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का काढू पाहतोस?’ असाही तर्कशुद्ध प्रश्न प्रभू विचारतो.
एकदा येशू लोकांशी बोलत असता प्रलयकाळाविषयी सांगत होता. लोकांना ते समजत नव्हते तेव्हा त्याने म्हटले, ‘जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येतात तेव्हा तुम्ही लागलेच म्हणता पावसाची सर येत आहे. आणि तसे घडते.
दक्षिणेचा वारा सुटतो तेव्हा कडाक्याची उष्णता होईल, असे तुम्ही म्हणता आणि तसे घडते. अहो ढोंग्यांनो, तुम्हास पृथ्वीवरील व आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो तर त्या (भावी विनाश आणि प्रलय) काळाचा अर्थ तुम्ही का लावीत नाही?’
जुन्या करारातील राजा शलमोनाने लिहिलेला ‘उपदेशक’ हा भाग म्हणजे बायबलमधला जणू विषादयोगच! राजा म्हणतो,
‘व्यर्थ हो व्यर्थ! सारे काही व्यर्थ!
या भूतलावर नवे असे काहीच नाही.
जे घडून गेले तेच घडणार.
एक पिढी जाते, आणि दुसरी येते.
पृथ्वीच काय ती सदा कायम राहते.
सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात,
तरीही तो भरून जात नाही.
ज्या स्थळी त्या जाऊन मिळतात
तिथेच त्या पुन्हा पुन्हा वाहत राहतात.’
प्रलयकाळाबद्दल अनेक भाकिते पुढे शिष्यांनी लिहिलेली पत्रेही आहेत. त्यातील काही तर तंतोतंत खरी ठरलेली भाकिते आहेत. कसे ते पाहू या, संत पौलाने टिमोथी नावाच्या शिष्याला लिहिलेल्या पत्रात जगाच्या अंतकाळाबद्दल भाकिते आहेत:-
‘शेवटच्या काळी कठीण दिवस येतील कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, िनदक, आई-बापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेशी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी अशी ती होतील. त्यांच्यापासून दूर राहा.’
आजच्या समाजाबद्दलचे वरील एखादे तरी विधान आपण नाकारू शकतो का? उलट सुमारे २००० वर्षापूर्वीच करून ठेवलेल्या या भविष्यवाणीने मन आश्चर्यचकित होते.
परमेश्वाराची स्तुती करणारी १५० स्तोत्रे बायबलमध्ये आहेत. नमुन्यादाखल एक स्तोत्र पाहा,
‘तू पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करितोस.
कनातीप्रमाणे आकाश विस्तारतोस.
मेघांना आपला रथ करितोस, वायूच्या पंखावर
आरोहण करून जातोस. वायूना आपले दूत करितोस,
अग्नी व ज्वाला यांना आपले सेवक करितोस.
तू पृथ्वीला वस्त्रांप्रमाणे जलाशयाने आच्छादिले.
पर्वतावर जले स्थिर राहिली. तुझ्या धमकीने ती पळाली.
ती पर्वतावरून जाऊन खाली खो-यातून वाहिली.
त्यांच्यासाठी तू नेमिलेल्या स्थळी ती जाऊन राहिली.’
परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो,
त्याला आपल्या कृतीपासून आनंद होवो.
तो पृथ्वीकडे पाहतो तेव्हा ती कापते,
तो पर्वतास स्पर्श करितो तेव्हा ते धुमसतात.
माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत
मी परमेश्वराचे गुणगान गाईन.’
याशिवाय विविध लेखकांनी वारंवार ईश्वराच्या प्रेममय स्वरूपाचे, विशालतेचे, सर्वशक्तिमान असण्याचे वर्णन केलेले दिसते. ‘प्रकटीकरण’ हा शेवटचा भाग विश्वाच्या अंत:काळाबद्दलची गूढ भाषेतील भाकिते आहेत.
एक बोधप्रद शिक्षण देणारे साहित्यिक पुस्तक म्हणून वाचले तरीही बायबल वाचकाला खूप आनंद देऊ शकते. येशूच्या शिकवणुकीचा भाग प्रामुख्याने ‘शुभवर्तमान’ या नावाने लिहिल्या गेलेल्या त्याच्या ४ संक्षिप्त चरित्रात दिसतो. या शिकवणुकीच्या संत पॉलने केलेल्या निरूपणावर ख्रिस्ती धर्माची स्थापना झाली. त्या आगळ्यावेगळ्या शिकवणुकीचा विचार पुढील लेखांकात!