खोपोली नगरपालिकेच्या हद्दीतील मिळ ठाकूरवाडी, धनगरवाडी व कातकरवाडी येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे.
खोपोली- खोपोली नगरपालिकेच्या हद्दीतील मिळ ठाकूरवाडी, धनगरवाडी व कातकरवाडी येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. गावातील विहिरींचे पाणी आटले असून िवधन विहिरींचे पाणीही बंद झाल्याने तीनही वाडय़ांमधील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
पालिकेकडून या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुरा असल्याने पाण्यावाचून येथील ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. खोपोलीसारख्या मोठय़ा शहराला लागून या वाडय़ा आहेत.
मात्र पालिकेच्या उदासीनतेमुळे या ठिकाणी मूलभूत सुविधाही नाहीत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर गंभीर असून पालिकेच्या कारभाराविषयी स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे.
खोपोली शहरातील अनेक भागात सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे.
पालिकेची पाणी योजना रखडल्याने मुख्य शहरातही पाणी प्रश्न आहे. मोगलवाडी, काटरंग, लौजी, शिळफाटा व अन्य ठिकाणी पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पालिकेच्या पाणी योजनेचे काम गेली अनेक वर्षे संथगतीने सुरू आहे.
मिळ आदिवासीवाडी, धनगरवाडी व ठाकूरवाडी तर पाणी योजनेचे कामही अद्याप सुरू नाही. येथील महिलांना पाण्यासाठी विहीर व विंधन विहिरींचा आसरा आहे. मात्र त्यांचे पाणीही गायब झाल्याने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे.
खोपोली पालिकेकडून टँकरने या भागांना पाणीपुरवठा केला जात असला तरी टँकर जाण्यासाठी रस्तेही नसल्याने लांबवर उभ्या करून ठेवलेल्या टँकरमधून महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पाणी न्यावे लागत आहे.
पालिका टँकरने पाणीपुरवठा करत असली. तरी हा पाणीपुरवठा अपुरा असल्याने महिलांची टँकर आल्यानंतर पाणी मिळविण्यासाठी झुंबड उडाल्याची चित्र तिनही ठिकाणी पाहायला मिळत आहे.
खोपोली नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर आजही येथील आदिवासी बांधवांना पिण्याचे पाणी व मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने पालिकेच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.
अनुसूचित जमातीसाठी शासनाकडून विशेष अनुदान पालिकेला प्राप्त होते. त्या अनुदानाचा वापरच केला जात नसल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. येथील स्थानिक नगरसेवक राजू ढूमणे पाणी योजनेसाठी अनेक वर्षे पाठपुरावा करत आहेत.
परंतु पालिकेच्या प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसादच मिळत नसल्याने येथील ग्रामस्थ व महिलांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी करावी लागणारी वणवण व मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून पालिका कार्यालयात घालावे लागणारे खेटे यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
आदिवासी बहूल भागात पालिकेच्या कोणत्याही सुविधा नाहीत. प्रशासनाचेही सहकार्य मिळत नाही. शहरात पाणीयोजनेचे काम झालेले नाही. साधा पिण्याच्या पाण्याचा पाईपही टाकण्यात आलेला नाही. पालिकेकडून टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी ते पाणी अपुरे आहे. त्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागत आहे.
– राजू ढुमणे, स्थानिक नगरसेवक