खेड तालुक्यातील खोपी-पिंपळवाडी येथील डुबी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणात गेली 27 वर्षे मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.
खेड- तालुक्यातील खोपी-पिंपळवाडी येथील डुबी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणात गेली 27 वर्षे मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. पण सरकारचे उदासीन धोरण व उन्हाळी शेती करण्यास शेतक-यांनी दर्शवलेली असमर्थतता यामुळे आतापर्यंत या धरणातील पाण्याचा कधीच शेतीसाठी वापर करण्यात आलेला नाही. हे धरण केवळ शोभेपुरते राहिले आहे.
येथील डुबी नदीवर 1983 मध्ये धरण बांधण्यात आले. धरण क्षेत्रात दरवर्षी जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने सद्य:स्थितीत धरणात 18.895 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. यापैकी 17.947 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणाला चार दरवाजे असून, धरणातील पाण्याचा वापरच होत नसल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन हे दरवाजे गेल्या 27 वर्षात एकदाही बंद करण्यात आले नाहीत. त्यामुळे गेल्या 27 वर्षात हे धरण एकदाही पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. यंदा पावसाने दमदार हजेरी लावली तरी गेल्यावर्षीच्या तुलनेने धरण क्षेत्रात 717 मिमी कमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी 21 ऑगस्टअखेरीस धरण क्षेत्रात 3887 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर यंदा 3170 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
या धरणाला 20-20 किलोमीटरचे दोन कालवे असून, त्यांच्या पिचिंगचे काम अपूर्णावस्थेतच आहेत. गेल्या 27 वर्षात या कालव्यांचा वापरच न झाल्याने कालव्यांची डागडुजीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे कालवे धोकादायक स्थितीत आहेत. डाव्या कालव्यामुळे खोपी, कुळवंडी व मिर्ले तर उजव्या कालव्यामुळे खोपी, कुंभाड, बिजघर व मिर्ले परिसरातील शेतकऱ्यांची तब्बल 1336 हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे. मात्र, कालव्याची सध्याची धोकादायक स्थिती पाहता आधी कालव्यांचे पिचिंग पूर्ण करा मगच पाणी सोडा, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.
गेल्यावर्षी दोन्ही कालव्यांच्या दीड किलोमीटर परिसरातील शेतक-यांची बैठक घेऊन त्यांचे उन्हाळी शेती करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. उन्हाळी शेती करण्याचे आवाहन करण्यात आले. पण शेतक-यांनी असमर्थता दर्शवली. – आर. जी. आलंदकर, उपविभागीय अधिकारी (पाटबंधारे उपविभाग, खोपी)
मे 2012 च्या टंचाईकाळात नातूवाडी धरणातून शहरासाठी करण्यात येणारा पाणीपुरवठा अचानक बंद करण्यात आल्याने शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. यामुळे आजपर्यंत कधीही वापरात नसलेल्या पिंपळवाडी धरणातील पाणी डुबी नदीत सोडून शहरवासीयांची तहान भागवण्यात आली होती. त्यामुळे आता टंचाईकाळात नातूवाडी धरणातील पाणी न घेता खोपी-पिंपळवाडी धरणातील पाणी घेण्याचा निर्णय येथील नगर प्रशासनाने घेतला आहे.