चिपळूण तालुक्यातील पाचांबे-पुनर्वसन खेरशेत येथील प्रलंबित विकासकामांची जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह अधिका-यांनी नुकतीच पाहणी केली.
चिपळूण- तालुक्यातील पाचांबे-पुनर्वसन खेरशेत येथील प्रलंबित विकासकामांची जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह अधिका-यांनी नुकतीच पाहणी केली. या वेळी जिल्हाधिका-यांनी लघुपाटबंधारे विभागाच्या अधिका-यांना प्रलंबित विकासकामांचे अंदाजपत्रक बनवण्याच्या सूचना केल्या आहेत.
तसेच प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत येत्या काही दिवसांत बैठकीचे आयोजन केले जाईल, असे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले. यामुळे आगामी काळात गडनदी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. याबाबत माजी खासदार निलेश राणे, काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत तसेच प्रकल्पग्रस्त पाठपुरावा करत आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण प्रकल्पासाठी पाचांबे येथील ग्रामस्थांचे खेरशेत येथे पुनर्वसन करण्यात आले, मात्र खेरशेत येथे या ग्रामस्थांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. या ठिकाणी गटारे, विहीर, सार्वजनिक शौचालये, वीज, संरक्षक भिंत आदी कामे करण्यात आली, मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने सरकारच्या निधीचा चुराडा झाला.
तसेच येथील ग्रामस्थांकरिता सुमारे पाच किलोमीटरवरून नळपाणी योजना राबवण्यात आली आहे. या योजनेतील जलवाहिनीला गळती लागत असल्याने पाणी समस्येस सामोरे जावे लागत आहे. शिवाय प्रकल्पग्रस्तांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. प्रकल्पग्रस्त या प्रलंबित विकासकामांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.
यानंतर प्रकल्पग्रस्तांनी हा विषय माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष सावंत यांच्या निदर्शनास आणून दिला. याची दखल घेऊन सावंत यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन दिले. अप्पर जिल्हाधिका-यांनी प्रकल्पग्रस्तांची बैठक बोलावली.
या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली नाही. यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी प्रकल्पग्रस्तांसह कॉँग्रेसच्या शिष्टमंडळासमवेत जिल्हाधिका-यांची भेट घेत प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा पाढाच वाचला. या वेळी सरकारी पथकासह आपणही प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांची पाहणी करू, असे सांगितले.
यानुसार जिल्हाधिका-यांनी शनिवारी पाचांबे-खेरशेत पुनर्वसन येथील कामांची पाहणी केली. यात संरक्षक भिंत, गटारे, नळपाणी योजना, पाण्याची टाकी, विहीर, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक शौचालये आदी समस्यांची पाहणी केली. या वेळी संरक्षक भिंत नसल्याने घरांना धोका असल्याचे जिल्हाधिका-यांनी मान्य केले.
घरांच्या वरच्या बाजूला संरक्षक िभत उभारण्याबाबत अंदाजपत्रक तयार करण्यास लघुपाटबंधारे विभागाच्या अधिका-यांना सांगितले. आरसीसी गटारे बांधण्याबाबतही योग्य सूचना केल्या आहेत. या वेळी प्रकल्पग्रस्त दत्ताराम गायकवाड यांनी या ठिकाणी झालेल्या कामांबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आगामी काळात मान्यताप्राप्त कंत्राटदाराकडूनच कामे करून घ्यावीत, अशी आग्रही मागणी केली.
तसेच प्रकल्पग्रस्तांना शेतजमीन दिली नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. निर्वाहभत्ता दिला जात नाही. पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाली आहे इत्यादी समस्या मांडल्या. सावंत यांनीही प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा पाढाच वाचला. या समस्या लवकरच निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन जिल्हाधिका-यांनी दिले.
या वेळी उपजिल्हाधिकारी अजित निगुडकर, चिपळूणच्या तहसीलदार वृषाली पाटील, संगमेश्वर-देवरुखच्या तहसीलदार वैशाली पाटील-माने, पाचांबे ग्रामविकास कमिटीचे शांताराम बल्लाळ, विलास गायकवाड पंकज सावंत, जयराम निकम, वसंत भुरावणे, सुभाष बल्लाळ, बाबासाहेब गायकवाड, विजय गायकवाड, उत्तम गायकवाड, जयराम निकम, संतोष सावंत, अर्जुन जाधव, केशव घाडगे, प्रकाश बल्लाळ, सचिन जाधव, किशोर बल्लाळ, पांडुरंग जाधव, विठ्ठल जाधव, अमृत सावंत, मारुती बल्लाळ, काँग्रेसचे प्रवक्ते प्रभाकर जाधव, खेर्डी जि.प. गट अध्यक्ष अमित सावंत, युवक काँग्रेस गुहागर विधानसभा क्षेत्राध्यक्ष गुलजार कुरवले, सिद्धार्थ कदम, निलेश भडवळकर, दिनेश गुढेकर पंचायत समिती सदस्य चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.