देवनार कचरा भराव भूमी धुमसण्याला एकटी महापालिकाच जबाबदार नसून केंद्राने कायद्यात अडकवले आणि राज्य सरकाने प्रकल्प रखडवला अशा शब्दांत शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपाचा समाचार घेतला
मुंबई – देवनार कचरा भराव भूमी धुमसण्याला एकटी महापालिकाच जबाबदार नसून केंद्राने कायद्यात अडकवले आणि राज्य सरकाने प्रकल्प रखडवला अशा शब्दांत शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपाचा समाचार घेतला. याला आता भाजपानेही चोख प्रत्युत्तर देत शेवाळेंचा खडे बोल सुनावले.
कचरा भराव भूमी ही शास्त्रोक्त पद्धतीने बंद करणे व त्याचे नियमन करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे, याचा माजी स्थायी समिती अध्यक्षांना विसर कसा पडला, असा सवाल करत नेमका चिखल व कच-यामध्ये कोण कुठे आहे? हे मुंबईकरांना चांगलेच माहिती असल्याचे सांगत त्यांचा अर्थपूर्ण अभ्यास कमी असल्याचा टोला शेवाळेंना लगावला. शेवाळेंसोबत भाजपाचे मनोज कोटक यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर शरसंधान साधले.
देवनार व मुलुंड येथील भाडेकरारावर स्वाक्ष-या केलेल्या नाहीत. त्यामुळेच कचर विल्हेवाटीचे प्रकल्प रखडले आहेत. मग देवनारचा कचरा धुमसण्याला एकटी महापालिका जबाबदार कशी, असा खडा सवाल करत शिवसेना खासदार राहुल शेवाळेंनी करत भाजपाला टार्गेट केले. त्यांच्या या आरोपांची दखल घेत भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी शेवाळेंची चांगलीच उतरवली.
देवनारची ही आग अग्निशमन दलाच्या जवानांमुळे नियंत्रणात आली आहे. तरीही शिवसेनेचे नेते विनाकारण राजकारण करत असल्याचा आरोप केला. पण शेवाळे यांचे हे आरोप केवळ अर्थपूर्ण असल्याचे स्पष्ट करत त्यांनी स्थायी समिती असो वा सभागृह प्रेत्येक ठिकाणी कचरा भराव भूमी शास्त्रोक्तपणे बंद करण्याबाबत प्रश्न उपस्थित केले. दौरे केले. राज्य सरकारकडे पाठपुरावा करून भाडेकरार करण्याचे काम मार्गी लावले. पण खासदार म्हणून शेवाळे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे काय पत्रव्यवहार केला याची माहिती द्यावी, असे आव्हान दिले.
मिठी नदी असो वा कचरा भराव भूमी, नालेसफाई असो व मुंबईकरांच्या भल्यासाठी आमची चर्चेची तयारी आहे, हिंमत असेल तर तुम्ही पुढे येवून ही तयारी दाखवावी,असेही भाजपाने दंड थोपटत शिवसेनेला मैदानात येण्याचे आव्हान दिले आहे.
काही नेत्यांचा नालेसफाईचा अभ्यास व भूमिका यापूर्वी देखील मुंबईने पाहिलेली आहे. त्यामुळे नेमका चिखल व कच-यामध्ये कोण कुठे आहे हे मुंबईकरांना चांगलेच माहित असल्याची कोपरखळीही कोटक यांनी शेवाळेंना मारली. राज्याचे पर्यावरणमंत्री हे शिवसेनेचे आमदार आहे. परंतु आगीमुळे मुंबईच्या प्रदूषणाची पातळी वाढत असताना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडून कोणतीही हालचाल नाही. मग हे पर्यावरणमंत्री कसले, असा सवाल कोटक यांनी करत कदम यांचा पाणउतराच केला. जर येनकेन प्रकारे भाजपाला टार्गेट करण्याच प्रयत्न झाला तर ते सहन करणार नाही. येत्या निवडणुकीत निश्चित मुंबईकर त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा कोटक यांनी दिला.