रक्तातील साखरेची मात्रा कमी असल्यास रक्तदात्याचे रक्त घेतले जात नाही. मात्र, काही खासगी रक्तपेढय़ा सरकारचे नियम धाब्यावर बसवत पैशांसाठी रक्त घेत असल्याची धक्कादायक बाब ‘ब्लड सेंटर ऑफ टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’च्या परिषदेत उघडकीस आली आहे.
मुंबई – रक्तातील साखरेची मात्रा कमी असल्यास रक्तदात्याचे रक्त घेतले जात नाही. मात्र, काही खासगी रक्तपेढय़ा सरकारचे नियम धाब्यावर बसवत पैशांसाठी रक्त घेत असल्याची धक्कादायक बाब ‘ब्लड सेंटर ऑफ टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’च्या परिषदेत उघडकीस आली आहे. परळच्या केईएम रुग्णालयात राज्यभरातील रक्तपेढय़ांतील तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असलेले रक्त गरजू रुग्णाला दिल्यास त्याची प्रकृती बिघडू शकते. त्यामुळे खासगी रक्तपेढय़ांनी रक्त तपासून घ्यावे, असा सल्ला तंत्रज्ञांनी दिला.
या परिषदेत रक्तपेढीमध्ये काम करणा-या तंत्रज्ञांनी कोणत्या नियमांचे पालन करावे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मोठय़ा संख्येने तंत्रज्ञ उपस्थित होते. पालिका रुग्णालयात उपचारांसाठी येणा-या गरजू रुग्णांना चुकीचे रक्त चढवले जाते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी असलेले रक्त रुग्णांना दिल्याने त्यांच्या प्रकृतीत बिघाड होण्याची दाट शक्यता असते.
मात्र, काही खासगी रक्तपेढय़ा पैशांसाठी साखरेची मात्रा कमी असलेले रक्त घेतात. या चुकीमुळे एखाद्या रुग्णाच्या जीवावरही बेतू शकते, असे तंत्रज्ञांच्या संघटनेचे अध्यक्ष धनाजी राणे यांनी म्हटले आहे. राज्यातील सर्व रक्तपेढय़ांना सरकारच्या निकषांनुसार रक्तदात्याच्या रक्ताची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. दात्याच्या रक्तात साखरेचे प्रमाण कमी आढळल्यास हे रक्त घेऊ नये. मात्र, काही खासगी रक्तपेढय़ा हा नियम पाळत नाहीत ही दुर्दैवी बाब आहे. यावर आळा घालण्यासाठी कायद्यात बदल करून या नियमाचे उल्लंघन करणा-यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. रक्त चाचणीसाठी लागणा-या ‘किड्स’चा खर्च खूप आहे.
त्यामुळे रक्त तपासणीसाठी रुग्णाकडून जास्त पैसे आकारले जातात. सरकारी रुग्णालयात हे किड्स गरजूंना परवडणा-या दरात असतात. पण, खासगी रुग्णालयात तशी सुविधा नाही. त्यामुळे खासगी रक्तपेढय़ांनी रक्त तपासणीचे दर कमी करणे आवश्यक असल्याचेही राणे यांनी म्हटले आहे.