कल्याण-कर्जत राज्य महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असून, या रस्ता रुंदीकरणात डिकसळ गावातील अनेकांची घरे गेली आहेत.
नेरळ – कल्याण-कर्जत राज्य महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असून, या रस्ता रुंदीकरणात डिकसळ गावातील अनेकांची घरे गेली आहेत. त्यातच आता अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर प्रचंड खोदकाम करण्यात आले आहे. परिणामी गावातील रोजगार हरवण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, अपघाताला निमंत्रण देणारा रस्ता गावच्या हद्दीत बनवू नये, अशी मागणी डिकसळ ग्रामस्थांनी केली आहे.
रस्त्याचे चौपदरीकरण करताना डिकसळ गावातील दुकाने आणि घरांचे नुकसान होणार असल्याने येथील रहिवाशांनी डिकसळ गावाजवळ उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी सुरुवातीपासून लावून धरली होती, मात्र कोणताही निर्णय होत नसल्याने अखेर ग्रामस्थ कर्जतचे आमदार सुरेश लाड यांच्याकडे गेले. यावर रस्ता चौपदरीकरण करताना येथील पाच मीटरची साइड पट्टी न टाकता रस्ता तयार करण्यावर एकमत झाले. मात्र त्यानंतरही मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने डिकसळच्या ग्रामस्थांचा विश्वासघात केल्याची भावना ग्रामस्थांत निर्माण झाली आहे. कारण रस्ता तयार करण्यासाठी सहा ग्रामस्थांची घरे आणि २० ग्रामस्थांची दुकाने तोडण्यात आली. या टपरीवजा दुकानांवर हे ग्रामस्थ आपले कुटुंब चालवत आहेत.
दरम्यान, डिकसळ गावात रस्त्यावर असलेली लहानशी टेकडीही तोडण्याचे काम प्राधिकरणाने हाती घेतले आहे. परिणामी सध्या अस्तित्वात असलेला रस्ता तब्बल पाच-सहा फूट खाली जाणार आहे. त्यामुळे रस्त्यातून जाणा-या वाहनातील लोकांना काही खरेदी करायचे असेल तर रस्तावर उतरून पाय-या चढून दुकानात जावे लागेल. अशी कसरत पर्यटक-पाहुणे करतील की नाही, अशी शंका आहे. अशा स्थितीत वाहने रस्त्यावर थांबली नाहीत तर डिकसळकरांची संपूर्ण आर्थिक घडी विस्कटेल, अशी भीती निर्माण झाली आहे.