‘बर्फी’ पाहिल्यावर काय काय होतं? प्रचंड आनंद होतो, दार्जिलिंगचं नेत्रसुखद, स्वप्नवत चित्रण पाहून दिल खूश होतं, रणबीरच्या दमदार अभिनयापेक्षाही मुख्य व्यक्तिरेखेतलं त्याचं विरघळणं पाहून मन भरून येतं
‘बर्फी’ पाहिल्यावर काय काय होतं? प्रचंड आनंद होतो, दार्जिलिंगचं नेत्रसुखद, स्वप्नवत चित्रण पाहून दिल खूश होतं, रणबीरच्या दमदार अभिनयापेक्षाही मुख्य व्यक्तिरेखेतलं त्याचं विरघळणं पाहून मन भरून येतं, मूकबधिर असूनही दु:खाची, त्रासाची सावलीही स्वत:वर पडू न देणारा सदैव हसरा, चार्मिग बर्फीचं भावविश्व पाहून हृदय उचंबळून येतं, पटकथेतले असंख्य छोटेमोठे लोभस क्षण त्या व्यक्तिरेखांशी आपलं आतडयाचं नातं निर्माण करतात.. खूप कमी चित्रपटांच्या बाबतीत असं होतं. आठवडयागणिक तयार होणारे बहुसंख्य बिनडोक, धंदेवाईक चित्रपट पाहून आपलं मन निबर झालेलं असताना एखाद्या चित्रपटाने असा परिणाम साधणं तर महाकठीण. पण अशाच चित्रपटांच्या भाऊगर्दीत एखादा ‘बर्फी’ येतो आणि अद्याप सगळं काही संपलं नसल्याचा हवाहवासा दिलासा देऊन जातो.
‘बर्फी’ अनेक जणांच्या मजबूत खांद्यावर उभा आहे. अभिनेता-स्टार रणबीर कपूर आणि नवोदित अभिनेत्री इलियाना डिक्रुझ आहे, छायालेखक रवी वर्मन आहेत, संगीतकार प्रीतम आहेत.. पण या सगळ्यांपेक्षा, ‘द टॉलेस्ट ऑफ टॉल्स’ आहे, तो लेखक-दिग्दर्शक अनुराग बसू. फारशा वेगळ्या नसलेल्या कथेला ब्रिलियंट पटकथेच्या जोरावर आणि प्रेक्षकांना सहज आपलसं करतील, आपल्या मागे येण्यास भाग पाडतील, अशा व्यक्तिरेखा निर्माण करून बसूने ‘बर्फी’चं विलक्षण सुंदर भावविश्व बनवलंय. १९७२ ते १९७८ या काळातलं दार्जिलिंग. छोटसं गाव, निसर्गसुंदर आणि ब्रिटिशांनी वसवलेलं असल्यामुळे कमालीचं देखणं. जागतिकीकरण, गळेकापू स्पर्धा यांचं वारं अद्याप लागलेलं नसल्यामुळे तिथली माणसंही लोभस. त्यातलाच एक बर्फी. त्याचं खरं नाव मर्फी, पण मूकबधिर असलेला मर्फी आपलं नाव जमेल तसं सांगताना त्याच्या तोंडातून जो काही आवाज येतो, तो बर्फीसारखा ऐकू येतो, त्यामुळे त्याचं नावच पडून जातं बर्फी.
तल्लख, हुशार, गमत्या, हसरा आणि मूकबधिर असला तरी या व्यंगाचं सावटही आपल्या स्वभावावर पडू न देणारा बर्फी गरीब आहे. वडील ड्रायव्हरची नोकरी करतात. हा पडेल ती कामं करतो. त्याचं विश्व तो, त्याचे वडील आणि गावातले आसपासचे लोक एवढय़ापुरतंच मर्यादित आहे. पण गावातली, त्याच्याच वयाची, पण धनाढय बापाची गतिमंद झिलमिल (प्रियंका चोप्रा) आणि बाहेरून आलेली, श्रीमंत, सुंदर आणि शालीन श्रृती (इलियाना डिक्रुझ) त्याच्या आयुष्यात येतात आणि त्याचं आयुष्य ढवळून निघतं. या दोन प्रेमकहाण्यांबरोबरच कथेला किंचित रहस्याचीही किनार आहे.
चित्रपटाची कथा फार काही जगावेगळी आहे, अशातला भाग नाही. पण अनुराग बसूने चित्रपटाची मांडणी इतक्या विलक्षण पद्धतीने केली आहे की, साधीसुधी कथा साधी राहत नाही. व्यंग असलेल्या दोन प्रमुख व्यक्तिरेखा कथेच्या केंद्रस्थानी ठेवूनही तो त्यांना सहानुभूती मिळावी, याचा किंचितही प्रयत्न करत नाही. उलट त्यांना सामान्य व्यक्तिरेखांप्रमाणे समजून तशीच वागणूक देतो. त्यामुळे प्रेक्षकांचं त्यांच्याशी नातं निर्माण होतं. ते कणव म्हणून नव्हे, तर त्यांच्या लोभसपणामुळे, चार्ममुळे आणि हाच चित्रपटाचा सर्वात मोठा यूएसपी आहे. लेखक म्हणून बसूने आपलं कसब पणाला लावलं आहे. चित्रपट सध्याचा काळ, १९७८ आणि १९७२ अशा तीन काळांमध्ये फिरतो. या तीन काळांतल्या घटना दाखवताना बसूने फ्लॅशबॅक आणि फ्लॅशफॉरवर्ड या तंत्राचा मुबलक वापर केलाय.
(योगायोग म्हणजे रणबीरच्या गेल्या वर्षी आलेल्या ‘रॉकस्टार’मध्ये हेच तंत्र होतं.) पण दोन काळांमधलं ट्रान्झिशन इतकं सुलभ आहे की, कुठेही अडखळायला होत नाही. शिवाय, साध्या कथेला अनवट वीण देण्याचं काम हे तंत्र करतं. पटकथेची रचना अशी करतानाच बसूने पटकथेत असंख्य लहान-मोठे लोभस क्षण शोधून काढून सतत त्यांची पखरण केल्यामुळे कथेचा गाभा गंभीर असूनही चित्रपट मेलोड्रामॅटिक, जड होत नाही. चित्रपट संपल्यानंतर भावनिक थकवा आल्यासारखं वाटतं, पण त्याचबरोबर हृदय आनंदाने उचंबळूनही येतं. मुख्य म्हणजे हे क्षण व्यक्तिरेखांशी सुसंगत असल्यामुळे केवळ रिलीफसाठी, ह्युमरसाठी घुसडलेले ठरत नाहीत, तर ते कथेचा भाग म्हणून अतिशय उत्स्फूर्तपणे येतात, व्यक्तिरेखांना अधिक खोली देऊन जातात.
कथेतली रहस्याची बाजू मात्र किंचित कमकुवत आहे. मुळात ते रहस्यच नाही. कारण त्याचा कर्ताकरविता कोण आहे, याचा अंदाज पहिल्याच फटक्यात येतो. एवढा एक दोष वगळता ‘बर्फी’तले दोष काढणं अवघड आहे आणि चित्रपटच इतका लोभस आहे की, दोष काढावेत, असं वाटतच नाही.
बर्फीचं भावविश्व हे एखाद्या स्वप्नवत जगासारखं आहे. त्यामुळेच दार्जिलिंगहून कोलकात्यासारख्या शहरात आल्यावर मूकबधिर नायक आणि गतिमंद नायिकेला कुठल्याच अडचणी येत नाहीत. त्यांना भली माणसं भेटतात, राहायला जागा मिळते, नायकाला नोकरी मिळते. पण हे प्रेक्षक म्हणून आपल्याला कुठेही खटकत नाही, कारण चित्रपटाचा अवघा पोतच स्वप्नील आहे. दिग्दर्शकाचं हे व्हिजन छायालेखक रवी वर्मननं अचक पकडलंय. बरचसं चित्रण सॉफ्ट फोकसमध्ये करताना त्याने फ्रेम्सच्या रंगसंगतीतूनही हा स्वप्नील जगाचा आभास निर्माण केलाय. दार्जिलिंगचा आजवर न दिसलेला लँडस्केप चित्रपटाला फ्रेशनेस देतोच, पण छायालेखकाने आपलं कर्तृत्व दाखवण्याचा अट्टहास केलेला नाही, हे अधिक महत्त्वाचं आहे. संगीतकार प्रीतमने आपली आजवरची सर्व पापं धुऊन टाकण्याच्या हेतूनेच बहुदा ‘बर्फी’चं संगीत दिलं असावं. त्याची गाणी, गाण्यांचा पोत, त्याचे सूर सर्व काही ‘बर्फी’च्या विश्वाशी विरघळून गेलेत. त्याची गाणी सुश्राव्य आहेतच, पण चाली काय किंवा संगीत काय, इथल्या मातीतलं आहे.
पार्श्वसंगीत हा या चित्रपटाचा आणखी एक महत्त्वाचा घटक. चित्रपटाचा नायक मुका आणि नायिका एखाद-दोन शब्द बोलणारी गतिमंद, त्यामुळे काहीही संवाद नसलेले अनेक दीर्घ प्रसंग चित्रपटात आहेत. या प्रसंगांमध्ये पार्श्वसंगीताने मोलाची कामगिरी बजावली आहे. रणबीर कपूरने सुरेख काम केलंय, हे अंडरस्टेटमेंट ठरावं, इतका तो या भूमिकेत विरघळून गेलाय. गेल्या वर्षीच्या जॉर्डनच्या विरुद्ध टोकाला उभा असलेल्या बर्फीपर्यंतचं अंतर रणबीरने विनासायास पार केलंय. तो उत्तम अभिनेता आहे, हे यापूर्वीही त्याने दाखवून दिलंय. पण त्याची सर्वात भावणारी गोष्ट आहे ती म्हणजे त्याचा निर्भीडपणा. व्यावसायिक स्टार असूनही तो चाकोरीबाहेरच्या भूमिका स्वीकारताना बिचकत नाही. उलट आजवरचे त्याचे चित्रपट पाहिले तर प्रत्येक चित्रपटात एक नवं आव्हान असेल, याची काळजी घेताना तो दिसतो. बर्फीच्या व्यक्तिरेखेत त्याने गहिरे रंग भरले आहेत. त्याचा चेहरा आणि त्याचे डोळे विलक्षण बोलतात. बर्फीची व्यक्तिरेखा गमतीशीर करतानाही त्यातलं गांभीर्य कुठेही हरवणार नाही, चार्ली चॅप्लिन आणि मिस्टर बीनच्या छटा दाखवतानाही तो कुठेही कॅरिकेचरिश होणार नाही, याची पुरेपूर काळजी त्याने घेतली आहे. त्याचवेळी गमतीशीर प्रसंगातून भावस्पर्शी प्रसंगातलं ट्रान्झिशन तो असं काही दाखवतो की, ज्याचं नाव ते.
दक्षिणेत लोकप्रिय असलेल्या इलियाना डिक्रुझचं हिंदीतलं पदार्पण आश्वासक आहे. पहिल्याच चित्रपटात ग्लॅमरस ते डीग्लॅम ही रेंज दाखवताना अभिनयाचीही समज तिने दाखवली आहे. मुख्य म्हणजे रणबीरसारखा भन्नाट अभिनेता समोर असतानाही ती तिची दखल घेण्यास भाग पाडते, हे मोठंच यश आहे. प्रियंका चोप्राने झिलमिलसाठी मेहनत घेतली असली तरी तिच्यात सातत्याचा अभाव आहे. नेहमीसारखी ओव्हरअॅक्टिंग ती करत नाही, हेच तिच्या या व्यक्तिरेखेचं यश. आकाश खुराना, रूपा गांगुली, सौरभ शुक्ला, आशीष विद्यार्थी या सहकलाकारांनी समर्थ साथ देऊन कुठेच काही उणं राहणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. ‘बर्फी’सारखे चित्रपट अनुभवायचे असतात, रसरसून भोगायचे असतात. ‘बर्फी’चा संदेशच तो आहे.
बर्फी
लेखक-दिग्दर्शक : अनुराग बसू
संगीतकार : प्रीतम
कलाकार : रणबीर कपूर, इलियाना डिक्रुझ, प्रियंका चोप्रा