कुण्या पोलीस आयुक्तांची बदली तसे म्हटले तर बातमीचा विषय होण्याचे कारण नाही. सरकारी नोकर म्हटला की, बदली आलीच. पण नागपूरचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांची अडीच वर्षानंतर झालेली बदली चांगलीच गाजतेय, वाजतेय.
कुण्या पोलीस आयुक्तांची बदली तसे म्हटले तर बातमीचा विषय होण्याचे कारण नाही. सरकारी नोकर म्हटला की, बदली आलीच. पण नागपूरचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांची अडीच वर्षानंतर झालेली बदली चांगलीच गाजतेय, वाजतेय.
नागपुरातील गुन्हेगारी रोखण्यात ते कमी पडले म्हणून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाग्रेट बनले होते. त्यामुळे पाठक यांचे पार्सल जाणार हे ठरले होते. प्रश्न टायिमगचा होता.
३१ मार्चच्या पहाटे पाच कैदी नागपूर सेन्ट्रल जेल फोडून पळाले तेव्हाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्णय केला होता. तो जाहीर व्हायला १३ दिवस लागले. गृहमंत्री म्हणून प्रथमच मुख्यमंत्र्यांनी या खात्याला हात लावला.
तब्बल ३७ आयपीएस अधिका-यांच्या बदल्या केल्या. पत्ते पिसावे तशा या बदल्या झाल्या आहेत. कुणाला कुठे पाठवायचे याचे काही ‘लॉजिक’ नाही.
पाठक यांना पुण्यातच का पाठवले? पाठक यांना पाठवले म्हणून चोखंदळ पुणेकर नाराज आहेत. अनेकांनी आपली नाराजी वाहिन्यांवर बोलून दाखवली. नागपूरची गुन्हेगारी सांभाळू शकला नाही तो माणूस पुण्यासारख्या संवेदनशील महानगराला कसा सांभाळणार? हा पुणेकरांचा सवाल आहे. ‘आमचे कसे होणार?’ ही पुणेकरांची चिंता आहे. आधीच्या पोलीस आयुक्तांच्या राज्यातही ती होती.
नागपूरचा गवगवा जरा जास्तच झाल्याने त्यांचा रक्तदाब वाढणे समजू शकते. पुण्यात अतिरेकी बॉम्ब फोडतात. नरेंद्र दाभोलकर यांच्यासारख्या ज्येष्ठ विचारवंताला भर सकाळी गोळ्या झाडून संपवण्यात येते. वर्ष उलटूनही मारेकरी सापडले नाहीत. शेजारी कोल्हापूरमध्ये गोविंद पानसरे यांनादेखील त्याच पद्धतीने मारण्यात आले. त्यांचे मारेकरीही अजून मिळाले नाहीत. पण म्हणून तिथले पोलीस आयुक्त फार अडचणीत आले नाहीत.
दाभोलकर, पानसरे यांचे मारेकरी सापडत नाहीत म्हणून लोकांनी सरकारला टाग्रेट केले. लोकांचा राग सरकारवर होता व अजूनही आहे. पुणे आणि नागपुरातल्या आक्रोशात हा मुख्य फरक आहे. नागपुरात मुख्यमंत्र्यांचे गाव म्हणून स्वत: मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्त पाठक लोकांच्या नजरेत खलनायक बनले. पाच कैदी ज्या तुरुंगातून पळाले त्या तुरुंगातून ब-याच भानगडी उजेडात आल्या. पण त्या तुरुंगाचे डीआयजी शशिकांत शिंदे यांचे केवळ बदलीवर निभावले.
सारा मीडियाचा खेळ आहे. घरात बोलायचे झाले तर, कुणीही पोलीस आयुक्त आणला तरी जादूची कांडी फिरेल अशी अपेक्षा कुणी करू नये, असे एकूण चित्र आहे. पोलीस आयुक्त कोण आहे? ते पाहून गुन्हेगार गुन्हे करीत नाहीत. गुन्हेगारी हा आता ‘वर्ल्ड फिनोमिना’ झाला आहे. वैश्विक झाला आहे. पोलीस आपले संरक्षण करतील या भ्रमात कुणी राहू नये. आपापली सोय करून घ्यायची? गुन्हेगार पकडले म्हणून पोलिसांचे कौतुक करायचे की गुन्हेगारी वाढली म्हणून चिंता व्यक्त करीत बसायचे हा खरा पेच आहे.
मुख्यमंत्र्यांचे गाव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गाव म्हणून नागपूरची ताजी ओळख आहे. त्यात भर पडली ती वाढत्या गुन्हेगारीची.
गुंडागर्दीसाठीदेखील नागपूर ओळखले जाऊ लागले. नागपुरात वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय झाली होती. आधीही गुंडागर्दी होती. पण गुन्हेगारांची एवढी हिम्मत वाढली नव्हती. ३० लाख लोकसंख्येचे नागपूर पोलिसांना आवरेनासे झाले आहे. वर्षाला १०० खून म्हणजे काय गंमत आहे? गडचिरोलीतील नक्षलवाद्यांना मागे टाकणारी ही गुन्हेगारी आहे. सर्वच शहरांमध्ये ही समस्या आहे.
वाढत्या नागरीकरणाच्या या समस्या आहेत. लोकसंख्या वाढल्यामुळे गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे पोलिसांना अशक्य होत आहे. किंवा त्यांची तशी इच्छाशक्ती राहिली नाही असे म्हणता येईल. पूर्वी आपल्या कार्यक्षेत्रात एकही खून पडला तर त्या भागाचा ठाणेदार अस्वस्थ होत असे. आता पोलिसांना काही वाटत नाही. चालायचेच म्हणून कोणी ते मनावर घेत नाही. उलट किती गुन्ह्यांचा आपण छडा लावला हे ते छाती फुगवून सांगतात.
२५ वर्षापूर्वी साधी सायकल चोरीला गेली तरी पोलीस तक्रार नोंदवून घेत. आता स्कूटर चोरीला गेली तर पोलीस चार दिवस थांबायला सांगतात. चो-या, वाटमारी यांना हल्लीची यंत्रणा गुन्हा समजत नाही. नागपूरचे एक पोलीस आयुक्त काही वर्षापूर्वी नागपूरचे पोलीस आयुक्त होते. सध्या ते भाजपाचे खासदार आहेत.
‘नागपूर में चुहे बिल्ली का क्राईम है’ असे ते म्हणायचे. सायबर क्राईम, आर्थिक गुन्हे, दहशतवाद असले गुन्हे आजची यंत्रणा आव्हान मानते. खून, टोळीयुद्ध, खंडणी वसुली, मंगळसूत्र पळवणे असले गुन्हे पोलीस गंभीरपणे घेत नाहीत ते या कारणाने. नागपुरात सक्करदरा भागात गेल्या आठवडयात एकाच कुटुंबातील तिघा भावांचा अतिशय क्रूरपणे खून झाला. जुगार अड्डयावरून हे टोळीयुद्ध झाले. नागपुरात असे किमान १० ते १५ हजार जुगार अड्डे चालत असतील.
पोलिसांना याची माहिती नसेल असे होऊ शकत नाही. वर्चस्वाच्या वादात गुंडांच्या टोळ्या आपसात रक्त सांडतात. नागपुरातील सराफा बाजार एका गुंडाच्या ताब्यात असल्याने सुरक्षित आहे. महिन्याला ठरावीक रक्कम या गुंडाकडे पोहोचवली जाते. उद्या दुस-या गुंडाने तिथे हप्ता मागतो म्हटले तर टोळीयुद्ध होणारच. गुंड गुंडांना मारतात म्हणून त्याचे समर्थन करता येऊ शकत नाही. प्रत्येकानेच कायदा हातात घेतो म्हटले तर अराजक पसरेल.
आज तेच होत आहे. पोलिसांचा धाक संपला. कायद्याची भीती राहिली नाही. करून करून काय करणार? फार फार तर बदली करतील. के. के. पाठक यांचे शेवटी काय झाले? बदली झाली. पण गुंडाला हप्ता दिला नाही मारल्या गेलेल्या सीताबर्डीतील त्या तरुण व्यापा-याचा जीव बदलून परत येणार नाही त्याचे काय?
आपण काहीही केले तरी कुणी आपले वाकडे करू शकत नाही, मोठा व्यापारी असो की हातठेलेवाला, हप्ता दिल्याशिवाय धंदा करू शकत नाही. त्या भागातला दादा आणि पोलीस, अशा दोघांना त्याला हप्ता द्यावा लागतो, हे उपराजधानीचे दाहक वास्तव आहे. त्या भागातले सामाजिक कार्यकत्रे त्या गरिबाच्या पाठीशी उभे राहत नाहीत. इतरांसाठी तो गुंड असेल. पण त्या गरिबासाठी तो गॉडफादर असतो. पोलीस आपलेच आहेत, पकडले तरी काही दिवसांनी बाहेर यायचेच आहे, अशी मानसिकता बनल्याने गुंडागर्दी वाढल्याचे आजचे चित्र आहे.
ठिकठिकाणचे पोलीस आयुक्त, पोलीस यंत्रणा अपयशी होत आहे याचे कारण या बेफिकिरीत आहे. नाशिकमध्ये गेल्या १५ दिवसांत चार खून पडले. नाशिकचे पोलीस यात काही गंभीर आहे असे मानायला तयार नाहीत. नागपुरात एका महिलेवर अत्याचार झाला. आरडाओरडा झाला तेव्हा पोलिसांनी हातपाय हलवले. या टोळीने अशा ४० महिलांवर बलात्कार केल्याचे उजेडात आले. आता बोला. कोण म्हणेल इथे पोलीस असतात? सोनसाखळी घालून कुणी महिला रस्त्यावर फिरू शकत नाही. काय दिवस आणले आपल्या राज्यकर्त्यांनी. कुठला गुंड कुठे राहतो, काय करतो याची पोलिसांना बित्तंबातमी असते.
पोलिसांनी मनात आणले तर एका रात्रीत गुन्हेगारी संपू शकते. पण तशी कुणाची इच्छा आहे? पोलीस आणि गल्लीबोळातले राजकीय पुढारी यांचे साटेलोटे असते. पैशाला हात लावत नाहीत असे काही पोलीस अजूनही शिल्लक आहेत. पण बोटावर मोजता येतील एवढे. पैसे खात नाहीत असा पोलीस सापडणे अवघड आहे. रात्रंदिवस पोलीस गुंडांच्या सान्निध्यात असतात.
पूर्वी पोलिसांमध्ये ‘खब-या’ नावाची व्यवस्था होती. ती पद्धतशीरपणे मोडून काढण्यात आली. त्यामुळे आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे पोलिसांना ठाऊक नसते. सामान्य माणसाशी असलेली त्याची नाळ केव्हाच तुटली आहे. लोक पोलिसाला आपला मित्र मनात नाहीत आणि पोलीसही माणसाला माणूस नव्हे तर ‘बकरा’ मानतो. राज्यात सर्वात सुरक्षित मानल्या जाणा-या सेन्ट्रल जेलमध्ये हेच घडले.
नागपूरच्या सेन्ट्रल जेलमधील बराकीच्या सळाखी कापून, भिंत चढून खतरनाक कैदी पळाले. हे एका दिवसात घडलेले नाही. झाडाझडतीत या तुरुंगात तब्बल ७५ मोबाईल सापडले, २८ चार्जर, १५ सीम कार्ड, गांज्याच्या ५ पुडया मिळाल्या. गुंडांनी सारा तुरुंगच विकत घेतला होता. इथे याकूब मेमन, अरुण गवळी आणि अनेक कुख्यात गुन्हेगार आहेत. ते आळशी निघाले म्हणून आत आहेत, असेच म्हणावे लागेल.
नागपूरच्या तुरुंगात काय काय चालते त्याच्या बातम्या मीडियाने अनेकदा चालवल्या. पण लक्ष द्यायला कोणाला वेळ आहे? या तुरुंगातल्या विहिरीत खूप मोबाईल सापडतील असा दावा तिथल्याच एका कर्मचा-याने केला होता. प्रशासनाने अजून ती विहीर उपसली नाही. अख्खी यंत्रणा सडली आहे. जेल अधीक्षकाला निलंबित करून मुख्यमंत्री मोकळे झाले. उद्या तो प्रमोशनवर येईल. या देशात काहीही होऊ शकते. आभाळ फाटले आहे. कुठे कुठे ठिगळ लावणार? लोकहो, ‘अच्छे दिन’ची वाट पाहू नका. स्वत:ची सुरक्षा स्वत: घ्या. मोदी, फडणवीस यांना आम माणसासाठी कुठे वेळ आहे?