‘क्राइम नेव्हर पेज’ असं इंग्रजीत एक वचन आहे. पण मनोरंजन वाहिन्यांसाठी मात्र ‘क्राइम ऑलवेज पेज’ अशी स्थिती आहे. प्रत्येक वाहिनीवर जशा सास-बहूच्या मालिका असतात, तशाच आता गुन्हयांशी संबंधित मालिकाही असतात. एकेकाळी केवळ पोलिसी तपास, त्यांचं चातुर्य आणि गुन्हयाच्या उकलीमागचं धक्कातंत्र एवढयापुरत्या मर्यादित असलेल्या या मालिकांचं स्वरूप आता अधिकाधिक अतिरंजित होऊ लागलंय. प्रत्येक वाहिनीला टीआरपी वाढवण्यासाठी अशा मालिकांची गरज का भासू लागली आहे, त्याचा हा धांडोळा..
भारतात दूरदर्शनची सुरुवात झाली आणि मनोरंजनाचं एक मोठं दालन खुलं झालं. पुढे तर हे दालन इतकं मोठं झालं की, त्याने सर्व जीवनच व्यापून टाकलं. घरबसल्या करमणूक देणा-या या माध्यमासाठी काम करणं हे भल्याभल्यांना आव्हान वाटू लागलं. खासगी वाहिन्यांच्या स्पर्धेच्या या काळात टीआरपी हा परवलीचा शब्द झाला. आपल्या वाहिनीची प्रेक्षकसंख्या म्हणजेच टीआरपी वाढवण्यासाठी वाहिन्यांनी विविध पर्याय निवडले. करमणूक क्षेत्रात ज्याला ज्यॉनर म्हणतात, असे अनेक ज्यॉनर छोटया पडद्यावर आलेले आहेत.
यातलाच एक महत्त्वाचा ज्यॉनर म्हणजे क्राइम स्टोरी. यात एकतर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कथा असतात किंवा पोलिसी तपासावर आधारित. जगभरात हा ज्यॉनर अतिशय लोकप्रिय आहे. अनेक रहस्यकथा, गुन्हे व त्यांची थरारक उकल यांच्या कथा अनेकांनी वाचलेल्या असतील. वाचकांच्या या आवडीचा विचार करून काढण्यात आलेली अनेक मासिकं, साप्ताहिकंही बरीचं लोकप्रिय झाली होती. श्रीकांत सिनकरांच्या पोलिसी चातुर्यकथा असतील किंवा ‘दक्षता’, ‘पोलिस टाइम्स’सारखी नियतकालिकं असतील, त्यांची लोकप्रियता सार्वकालिक आहे. त्यामुळे त्यांचं प्रतिबिंब टेलिव्हिजन आणि चित्रपटाच्या पडद्यावरही स्वाभाविक आहे. अगदी सुरुवातीपासूनच या ज्यॉनरवर आधारित अनेक मालिका छोटय़ा पडद्यावर आलेल्या आहेत.
भारतात गुन्हेगारी मालिकांची सुरुवात ही दूरदर्शनपासूनच झाली. राष्ट्रीय प्रसारणात दाखवण्यात आलेल्या ‘करमचंद’ या मालिकेने एकेकाळी लोकांचं चांगलंच मनोरंजन केलं. या मालिकेने पंकज कपूर आणि सुश्मिता मुखर्जी यांना स्टारपद मिळवून दिलं. त्यानंतरही ‘तहकीकात’, ‘एक शून्य शून्य’, ‘हॅलो इन्स्पेक्टर’ यांसारख्या मालिका लोकप्रिय ठरल्या. भारतात खासगी वाहिन्यांना सुरुवात झाली मात्र त्यावेळच्या वाहिन्यांनी या प्रकारच्या कार्यक्रमांना काहीसे दूरचं ठेवले होते. ‘सोनी’ या वाहिनीने भारतात प्रेक्षकवर्ग मिळवण्याकरता अनेक प्रयोग केले, त्यातलाच यशस्वी प्रयोग म्हणजे ‘सीआयडी’ ही मालिका. सुरुवातीला ही मालिका मराठीतल्या ‘एक शून्य शून्य’ सारखीच होती. कारण दोन्हीचे दिग्दर्शक बी. पी. सिंह हेच होते. याच मालिकेत अधिकाऱ्याच्या भूमिकेत असलेले शिवाजी साटम ‘सीआयडी’ या मालिकेच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाले. ‘सीआयडी’ या मालिकेने सर्वाधिक काळ चाललेली मालिकेचाही विक्रम आपल्या नावावर केला. आतापर्यंत 12 र्वष टिकून असलेली दुसरी कोणतीही मालिका नसावी.
आता सर्वच वाहिन्यांवर अशा प्रकारच्या मालिकांचं पेव फुटलंय. पण यातला महत्त्वाचा फरक असा की, पूर्वीच्या या प्रकारच्या ज्या मालिका होत्या, त्यात पोलिसांच्या किंवा डिटेक्टिव्हच्या तपासावर, म्हणजेच डोकॅलिटीवर, उत्कंठेतून निर्माण होणा-या थरारावर अधिक भर होता. सध्या अशा प्रकारच्या ज्या मालिका सुरू आहेत, त्यात गुन्हे अधिकाधिक रक्तरंजित करून दाखवण्यावर अधिक भर असतो. सुरुवातीला काहीशा वेगळ्या प्रकारच्या आक्रमक, नाटकी निवेदनाचा वापर करून या मालिका अधिकाधिक रंजक करण्यावर या वाहिन्यांनी, विशेषत: वृत्तवाहिन्यांनी भर दिला. ‘सनसनी’, ‘वारदात’ सारख्या मालिका लोकप्रियही ठरल्या. वृत्तवाहिन्यांवरील या मालिकांना मिळत असलेल्या प्रतिसादाने करमणूक वाहिन्यांनाही हा ज्यॉनर वापरण्यासाठी उद्युक्त केलं. ‘ई टीव्ही मराठी’ने ‘क्राइम डायरी’ ही मालिका आणून मराठीत या प्रकाराचा श्रीगणेशा केला. त्याचाच कित्ता सध्या ‘स्टार प्रवाह’वर ‘लक्ष्य’ आणि ‘पंचनामा’च्या रुपात गिरवला जातोय. हिंदीत ‘सोनी’ने ‘क्राइम पॅट्रोल’ ही मालिका सुरू केली. आता ‘स्टार प्लस’ या वाहिनीनेही या स्पर्धेत उडी घेतली असून त्यांनीही ‘अर्जुन’ ही मालिका सुरू केली आहे. ‘लाइफ ओके’ या वाहिनीवर सुरू असलेली ‘सावधान इंडिया’ ही सत्य घटनांवर आधारित मालिकाही गुन्ह्यांच्या संयत हाताळणीमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
‘क्राइम पॅट्रोल’चं यश
‘क्राइम पॅट्रोल’ ही मालिका सध्या या सगळ्या मालिकांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. ज्या गुन्ह्यांमधून समाजाची बदललेली मानसिकता दिसून येईल, अशा कथानकांबरोबरच उत्कृष्ट सादरीकरण या गुणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रत्येक भागानंतर त्या भागातल्या घटनेतून समाजाने काय शिकावं, याचं विश्लेषणही करण्यात येतं. त्याचप्रमाणे आपल्या देशाच्या एकंदरीत व्यवस्थेविषयी सर्वसामान्य माणसांच्या मनात निर्माण होण्या-या प्रश्नांचं प्रतिबिंबही या मालिकेत उतरलेलं दिसून येत आहे. कोणताही गुन्हा घडण्याआधी त्या गुन्ह्याची चाहूल लागत असते. ही चाहूल ओळखायला शिकावं, हा या मालिकेचा मूळ उद्देश असल्याचं या मालिकेच्या प्रसारित करण्यात आलेल्या अनेक भागांवरून दिसून येतं.
सादरीकरणातलं नाविन्य महत्त्वाचं
आज आपल्या अवतीभवतीच्या घटनांकडे आपण पाहातो तेव्हा यात सत्य कोणतं आणि काल्पनिक कोणतं हा प्रश्न माणसाच्या मनात निर्माण होतो. अनेक सत्यघटना या कल्पनेच्याही पलिकडे गेलेल्या दिसतात. त्यामुळे ‘अर्जुन’मध्ये आम्ही केवळ काल्पनिक कथाच घेतल्या आहेत. या मालिकेचं वैशिष्टय़ म्हणजे तिच्या माध्यमातून छोटया पडद्यावरच्या मालिकांचं स्वरुपच आम्ही बदलत आहोत. आतापर्यंत अशा प्रकारच्या मालिका या ‘इनडोअर ड्रामा’ म्हणून सादर केल्या जात असत. ‘अर्जुन’ या मालिकेत मात्र आम्ही वेगवेगळे लोकेशन्स वापरले आहेत. त्याचबरोबर या मालिकेत काही थरारक साहसदृश्यांचाही वापर करण्यात आला आहे. आज भारतातला छोटया पडद्याचा प्रेक्षकही प्रगल्भ झाला आहे. त्याला त्याच्या अपेक्षेप्रमाणे कलाकृती दिल्या पाहिजेत, असं मला वाटतं. त्यामुळे या मालिकेचा भाग पाहाताना एखादा चित्रपट पाहात असल्याचा फील आम्ही प्रेक्षकांना मिळेल.
– नचिकेत पंतवैद्य, जनरल मॅनेजर, स्टार प्लस
मराठी मालिका आघाडीवर
गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारित मालिकांमध्ये मराठी वाहिन्यांनी नेहमीच अग्रस्थान पटकावलेलं दिसून येतं. मुंबई दूरदर्शनवर अगदी सुरुवातीला आलेली ‘एक शून्य शून्य’ ही मालिका त्या काळी अमराठी प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय होती. त्यानंतरच्या ‘हॅलो इन्सपेक्टर’ या मालिकेतला रमेश भाटकर यांनी साकारलेला डॅशिंग आणि शैलीदार पोलिस अधिकारीही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. ‘ई टीव्ही मराठी’वर दाखवण्यात आलेली ‘क्राइम डायरी’ ही मालिका अनेक र्वष चालली. ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीनेही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मालिकेला महत्त्व दिलंय. त्यांनी ‘लक्ष्य’ या मालिकेतून काल्पनिक गुन्हय़ांची उकल करण्यातलं नाटय़ प्रेक्षकांसमोर आणलं. या मालिकेने नुकतेच दीडशे भाग पूर्ण केले. आता याच वाहिनीवर ‘पंचनामा’ ही मालिका सुरू झाली असून त्यात महेश मांजरेकर निवेदकाच्या भूमिकेत आहे.
पुरुष प्रेक्षकांना खेचण्यासाठी
पुरुष प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारच्या मालिका आवश्यक ठरतात. गुन्हेगारीवर आधारित कथानकं बघायला प्रेक्षकांना आवडतं. या कथा अधिक चांगल्या पद्धतीने, तांत्रिकदृष्टय़ा अधिक परिपूर्णतेने सादर व्हाव्यात, अशी माझी कल्पना होती. एकाच वेळी क्राइमवाल्या दोन मालिका असल्या तरी त्याचं सादरीकरण वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. कोणालाही क्राइम स्टोरीज वाचायला आवडतात. आज कोणतंही वर्तमानपत्र उघडलं तरी त्यात गुन्ह्यांशी संबंधित बातम्या मोठया प्रमाणावर असतात. अनेक वृत्तवाहिन्यांनीही त्यात काही काल्पनिक भाग मिसळून तो अधिकाधिक रंजक करण्यावर भर दिलेला आहे. आम्ही मात्र या गुन्हेगारी कथांमधून लोकांना या गुन्ह्यांपासून दूर राहाण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या प्रत्येक भागाच्या शेवटी पोलिस अधिकारी येऊन प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. त्यातून अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी काय काय दक्षता घेता येईल, हेही सांगितलं जाणार आहे.
– श्रावणी देवधर, क्रिएटिव्ह हेड, स्टार प्रवाह
‘क्राइम पॅट्रोल’ या कार्यक्रमाचं यश त्याच्या प्रामाणिकपणामध्ये आहे, असं मला वाटतं. केवळ एक कार्यक्रम करायचा अशा दृष्टिकोनातून या कार्यक्रमाची निर्मिती होत नाही. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जे दाखवतोय त्यातून आपण एका महत्त्वाच्या सामाजिक गोष्टीकडे लोकांचे लक्ष वेधून घेत आहोत. कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एक जनजागृतीचे महत्त्वाचे कार्य करत आहोत, या जबाबदारीची जाणीव या कार्यक्रमाशी संबंधित असलेल्या सर्वच घटकांना आहे. ज्या गोष्टींचं नाटयमय सादरीकरण केलं जातं, त्यातही हे भान ठेवलं जातं. कोणताही प्रसंग अतिरंजित करून नाटय़मय पद्धतीने किंवा असंवेदनशील पद्धतीने सादर केला जात नाही. कार्यक्रमाच्या माध्यमातून गुन्हयाचं उदात्तीकरण करायचं नाही, या कार्यक्रमातून जे दाखवलं जाणार आहे, त्याचा प्रेक्षकांवर योग्य परिणाम झाला पाहिजे, ही गोष्ट आम्ही जपलेली आहे. त्यामुळे प्रेक्षकही या कार्यक्रमाकडे मनोरंजनासाठी पाहात नाहीत, तर सन्मानाने पाहातात ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.
या कार्यक्रमाच्या निवेदनातही हा प्रामाणिकपणा जपावा लागतो. लोकांशी संवाद साधताना तो खरा असावा लागतो. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं म्हणजे माझ्यासाठी अभिनय करणं नाही. या कार्यक्रमाने मला खूप शिकायला मिळालं. जी गोष्ट मी लोकांना करायला सांगतो, ती गोष्ट मीही आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. हा कार्यक्रम सादर करताना मला देशाच्या विविध भागातून अनेक फोन, मेसेज, मेल येत असतात. या कार्यक्रमाचे चाहते अगदी श्रीनगरपासून चंडिगढ, मुंबई, सोलापूर अशा विविध भागांत आहेत. लोकांना हा कार्यक्रम इतका खरा वाटतो की, ते आपल्या व्यक्तिगत समस्याही माझ्याशी शेअर करतात. अगदी कुणा कुणाच्या घरातल्या भांडणांमध्येही त्यांना माझं मार्गदर्शन हवं असतं.
ं