भारतातील सरकारी बाबूंच्या निर्लज्जपणामुळे मुलगा गमावलेल्या वडिलांना जिवंतपणीच मरणयातना भोगाव्या लागत आहेत.
कोल्हापूर – भारतातील सरकारी बाबूंच्या निर्लज्जपणामुळे मुलगा गमावलेल्या वडिलांना जिवंतपणीच मरणयातना भोगाव्या लागत आहेत. कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातील रहिवासी तुकाराम पाटील यांचा मुलगा नितीश मस्कत येथे मृत्यू पावल्याने विमा कंपनीने दिलेल्या नुकसानभरपाईचा २३ लाखांचा डीडी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने गहाळ केला आहे. या रकमेसाठी या वृद्ध पित्याची एकाकी झुंज सुरू आहे.
२४ वर्षीय नितीशचा २४ जुलै २०१४ रोजी मस्कतमध्येच अपघातात मृत्यू झाला होता. मुलाचा परदेशात मृत्यू झाल्यामुळे तुकाराम पाटील पुरते भेदरून गेले. नितीशवरील अंत्यसंस्कार तुकाराम यांनी ओमन आणि मस्कतमध्येच पूर्ण केले. त्यानंतर नितीशचा अपघात कशामुळे झाला? त्याची नुकसान भरपाई, यासाठी तुकाराम यांनी माहिती घेऊन लढा देण्याचे ठरवले. मुलगा गमावल्यामुळे तुकाराम यांच्यावर आधीच आभाळ कोसळले होते.
तरीही तुकाराम हिंमत हरले नाहीत. त्यांनी या लढाईसाठी जमिनीचा एक तुकडा विकला. मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने विमा कंपनीने भरपाई द्यावी, अशी मागणी तुकाराम यांनी केली होती. ओमनमधील एका कोर्टाने तुकाराम यांची मागणी अगदी ग्राह्य मानली आणि स्थानिक विमा कंपनीला भरपाई देण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या या आदेशाने तुकाराम यांच्या कुटुंबाला दिलासा मिळाला तरी तुकाराम यांची ही लढाई इथेच संपली नव्हती.
त्यांचा खरा लढा भारत सरकारशी होता. कोर्टाच्या आदेशानंतर विमा कंपनीनेही भरपाईची रक्कम अदा केली. त्यानुसार ओमन सरकारने २३ लाखांचा ड्राफ्ट भारतीय दूतावासाकडे सोपवला. भारतीय दूतावासाने १० जानेवारी २०१५ रोजी बँक ऑफ बडोदात कोल्हापूर जिल्हाधिका-यांच्या नावे डीडी काढला.
ओमन दूतावासाने कोल्हापूर जिल्हाधिका-यांना पत्र लिहून नितीश पाटील यांच्या कुटुंबीयांना ही रक्कम देण्याच्या सूचना केल्या होत्या. तशी प्रत नितीशच्या कुटुंबीयांनाही पाठवली होती. ओमन दूतावासातून आलेल्या पत्रानंतर, कोल्हापूरचे निवासी जिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी १२ मार्च २०१५ रोजी चंदगडच्या तहसीलदारांना तुकाराम पाटील यांच्या कागदपत्रांची दोन दिवसांत पडताळणी करण्याचे आदेश दिले, मात्र जिल्हाधिका-यांनी डीडी डिपॉजिट केला नव्हता.
कारण कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून डीडी हरवला होता. पाटील कुटुंबीय सुमारे सात महिने पैशांची वाट पाहत राहिले. चौकशीअंती कोल्हापूर प्रशासनाने पाटील कुटुंबीयांना डीडी हरवल्याचे सांगितले. स्वत:च्याच देशात इतका मोठा अडचणीचा डोंगर उभा राहील, अशी साधी कल्पनाही तुकाराम यांना नव्हती. या हलगर्जीमुळे तुकाराम यांना चंदगड ते कोल्हापूर हे सुमारे १०० किमीचे अंतर दररोज पार करावे लागत होते.
सुमारे महिनाभर त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चकरा सुरू होत्या. त्यातही या कार्यालयाच्या मुख्य लिपीक सुनीता नेर्लेकर यांनी त्यांना चांगली वागणूक दिली नाही. त्यामुळे पाटील कुटुंबीयांनी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र लिहिले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी अमित सनी यांनी डीडी हरवल्याचे मान्य केले आहे. तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार आणि कार्यकारी निवास जिल्हाधिकारी संगीता चौगुले यांना या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे सनी यांनी सांगितले. या प्रकरणी भारतीय दूतावासाला पत्र लिहिल्याचे चौगुले यांनी सांगितले. वडिलांना हेलपाटे मारायला लावणाऱ्या सरकारी बाबूंच्या हलगर्जीबद्दल कोण आणि काय शिक्षा देणार? तुकाराम यांच्या हक्काचे पैसे त्यांना कधी आणि केव्हा मिळणार या प्रश्नांची उत्तरे मात्र अनुत्तरीत आहेत.