विविध प्रकारे आंदोलने केल्यानंतरही आयआरबी कंपनीने कोल्हापुरच्या टोल दरात मंगळवारी मध्यरात्री बारानंतर वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूर- कोल्हापुरच्या टोल दरात मंगळवारी मध्यरात्री बारानंतर वाढ होणार आहे. पाच ते दहा रुपयांची वाढ होणार असल्याचे आयआरबी कंपनीने सांगितले. यात टेम्पो, बससाठी पंचवीस ऐवजी तीस रुपये, ट्रक, बसगाड्यांना चाळीस ऐवजी पन्नास रुपये, तर त्या पुढील अवजड वाहनांना पन्नास ऐवजी साठ रुपये टोल द्यावा लागेल.
भाजप-शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत टोलचा प्रश्न आम्हीच सोडवू, असा दावा केला होता. सत्तेवर आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली. रस्ते प्रकल्पाचे पुनर्मूल्यांकन करून आयआरबीचे देणे देऊन कोल्हापूर टोलमुक्त करण्याचे आश्वासन दिले गेले. प्रत्यक्षात मात्र टोल बंद नव्हे तर वाढणार आहे.
दरम्यान, कोल्हापूर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाच्या मोबदल्यात टोल आकारण्यात येत आहे. या विरोधात उच्च न्यायालयानेही ‘टोल हटवला जाणार नाही’, असा निर्णय दिला. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती मदन लोकूर आणि न्यायमूर्ती ए. के. गोयल यांच्यासमोर खटल्याची सुनावणी सुरू आहे. टोलविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. आता या खटल्याची पुढील सुनावणी १३ एप्रिलला होणार आहे.