सद्य:स्थितीत कोकणातील प्रश्न प्रखरपणे मांडेल, असा नेता युतीकडे नाही. यापूर्वी कोकणचे नेते नारायण राणे यांनी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेत कोकणातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले. गतवर्षी आंबा पिकाला भरपाई मिळवून देण्याचे कामही श्री. राणे यांनीच केले होते. परंतु, तशी धमक युतीतील एकाही नेत्याकडे नाही. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतक-याला अच्छे दिन आता दूरच राहिले असून नुकसान भरपाईसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अवकाळी पावसामुळे कोकणचा राजा संकटात आला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हापूसचे उत्पादन पावसामुळे वाया गेले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळजवळ ८० टक्के आंबा उत्पादन नष्ट झाले. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदार, शेतकरी अडचणीत आला. या शेतक-याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा कोणताही प्रयत्न राज्य सरकारकडून अद्याप झाला नाही.
काही दिवसांपूर्वी रत्नागिरी दौ-यावर आलेले राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनंगटीवार आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यांकडून आंबा नुकसानीसंदर्भात कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदार, शेतक-यांसाठी ‘अच्छे दिन’ दूरच राहिले आहेत.
हवामानात सातत्याने होत जाणारे बदल, त्यातही अवेळी येणारा पाऊस या सा-या कारणांमुळे कोकणातील आंबा उत्पादनावर परिणाम झाला. यंदा ८० टक्के आंबा पीक अवकाळी पावसामुळे वाया गेले. जे उत्पादन आले त्याचा दर्जाही चांगला नसल्याने नाईलाजास्तव हा आंबा कॅनिंगला पाठवण्याची वेळ बागायतदारांवर आली आहे.
दररोज आंब्याचे दर घसरत आहेत. कॅनिंगकडूनही अपेक्षित दर बागायतदारांना मिळत नाही. त्यातही गतवर्षीपेक्षा यंदा आंब्याच्या निर्यातीवरही चांगलाच परिणाम झाला. निर्यातीचे प्रमाणही निम्म्यावर आले. त्यामुळे त्याचा फटका बागायतदार, शेतक-यांना बसला आहे. आंबा पिकासाठी घेण्यात आलेली कर्जे कशी भागवायची असा प्रश्न सध्या बागायतदार, शेतक-यांना पडला आहे.
यासंदर्भात भाजपाचे प्रदेश प्रवक्ते बाळ माने यांनी पुढाकार घेऊन कोकणातील दोन्ही जिल्ह्यातील आंबा बागायतदार, शेतक-यांना एकत्रित केले. यात देवगडचे माजी आमदार अजित गोगटे यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील आंबा बागायतदारांनी एकत्रित येत रत्नागिरीत या विषयावर बैठक घेण्यात आली.
या बैठकीत उपस्थित आंबा बागायतदार, शेतक-यांनी आपल्या व्यथा मांडल्या. अवकाळी पावसामुळे आलेले आंबा उत्पादन वाया गेल्याचे अनेकांनी सांगितले. राज्य शासनाकडून नुकसानभरपाईची अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
दरवर्षी शासनाकडून आंबा पिकाला हेक्टरी भरपाई देण्यात येते. मात्र, ही भरपाई अपुरी पडत असल्याने यावेळी वेगळे निकष असावेत, असा आग्रहदेखील आंबा बागायतदार, शेतक-यांनी धरला आहे. ज्याप्रमाणे आंबा पिकासाठी प्रति झाड कर्ज दिले जाते. तोच निकष भरपाई देताना लावण्यात यावा, अशी बागायतदार शेतक-यांची मागणी आहे.
शासनाने हेक्टरी मदत न करता प्रत्येक शेतक-याला प्रति झाड रुपये दीड हजार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पुढे आली आहे. याशिवाय कर्जावरील व्याज माफी आणि कर्ज मुदतीत वाढ करण्याची मागणीही करण्यात आली आहे. परंतु, अजूनही राज्य सरकारकडून अपेक्षित मदत जाहीर करण्यात आलेली नाही.
गणपतीपुळे येथील कार्यक्रमानिमित्ताने राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनंगटीवार हे रत्नागिरी दौ-यावर आले होते. यावेळी दोन्ही जिल्ह्यातील आंबा बागायतदार, शेतक-यांना नुकसानभरपाई देण्याच्या अनुषंगाने काहीतरी घोषणा करतील, अशी सर्वाची माफक अपेक्षा होती. परंतु, भरपाईचा कोणताही विषय न काढता मुनंगटीवार यांनी या विषयालाच बगल दिली.
केवळ पावसाळयानंतर कोकणात मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येईल, असे सूचित केले. यातून आंबा बागायतदार, शेतक-यांच्या पदरी काय पडणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यानंतर लगेचच राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे हे दापोलीत कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहोचले पाहिजे, असे थातूर-मातूर बोलून त्यांनीही शेतक-यांना भरपाई देण्याच्या अनुषंगाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही.
आंबा नुकसानभरपाई मिळावी यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाचे नेते पुढाकार घेत आहेत. त्याचवेळी भाजपाचेच मंत्री या विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आज पाहावयास मिळत आहे. शेवटी भाजपाच्या नेत्यांनाच कोल्हापूरची वारी करावी लागली. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. त्यावेळी रत्नागिरी आणि सिंधुदुग्ह्र्य जिल्ह्यातील बागायतदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची मागणी केली. मात्र, त्यातूनही फारसे काही निष्पन्न झालेले नाही.
सद्य:स्थितीत कोकणातील प्रश्न प्रखरपणे मांडेल, असा नेता युतीकडे नाही. यापूर्वी कोकणचे नेते नारायण राणे यांनी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेत कोकणातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले. गतवर्षी आंबा पिकाला भरपाई मिळवून देण्याचे कामही नारायण राणे यांनीच केले होते. परंतु, तशी धमक युतीतील एकाही नेत्याकडे नाही. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतक-याला अच्छे दिन आता दूरच राहिले असून, नुकसानभरपाईसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.