कोकण ही एक सांस्कृतिक रंगभूमी आहे. ही कलावंतांची भूमी आहे. संपूर्ण कोकण प्रातांत विविध कलागुणांचा प्रसार आहे.
कोकण ही एक सांस्कृतिक रंगभूमी आहे. ही कलावंतांची भूमी आहे. संपूर्ण कोकण प्रातांत विविध कलागुणांचा प्रसार आहे. इथल्या लोककला इथल्याच माणसांनी जपल्या आहेत. सातासमुद्रापलीकडे पोहोचवल्या आहेत. दशावतार, भजन, संगीत, नाटय़, बाल्या डान्स, नमन, कलगीतुरा अशा अनेक क्षेत्रात वर्षानुवष्रे रंगभूमीची सेवा करणारे इथले कलावंत. इथले तंत्रज्ञ यांना ग्रामीण भागात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
आज टीव्ही सीरियल किंवा हिंदी मराठीत जे तंत्रज्ञ आहेत, पडद्यामागचे कलाकार बहुतांशी कोकणातले आहेत. त्यामुळे लोककला मूळ रुजली ती कोकणात, आणि जपलीही कोकणाने. मात्र या लोककलांचे सेवक अजूनही शासन दरबारी असमाधानी आहेत. वृद्ध कलाकारांच्या मानधनाचे प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे धूळ खात पडल्याचे वाचनात आले. ४०० प्रस्तावांपैकी ६० प्रस्ताव प्रत्येकवेळी मंजूर करण्यात येतात. एवढेच नव्हे तर त्यांचे मानधनाची रक्कमही कमीच आहे. तेव्हा प्रतिवर्षी प्रस्तावांची संख्या वाढवा आणि मानधनाची रक्कम सुद्धा वाढली पाहिजे. मूळ कर्नाटकातला दशावतार कोकणात विस्तारला, कोकणात त्याचा उदोउदो झाला. अनेक नाटयमंडळे निर्माण झाली. आणि आजही ही कला सिंधुदुर्गात आहे.
एवढेच नव्हे तर दथले कलाकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दशवतार सादर करतात. मुंबईत या नाटकांचे बरेच प्रयोग सादर होतात. दशावतारला आजही चांगला दर्जा आहे. भजन संस्कृतीही ह्या कोकणात रुजली. अनेक नामवंत भजनी बुवा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यातून उदयास आले. आणि सिंगलबारी, डबलबारी ट्वेंटी-ट्वेंटी अशा अनेक प्रकारात आपली भजने सादर करतात. ऑडियो-व्हीडियोच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कलेचा प्रसार केला. महाराष्ट्रभर भजन संस्कृतीतून संत महात्म्य पोहोचवले. मुबई शहरात नोकरीनिमित्त स्थिरावलेल्या अनेक तरुणांनी स्वत:ची कला शिकून भजन मंडळे स्थापन केली.
अनेक मृदंग विशारदांकडे जावून मृदगांचे ज्ञान संपादन करण्याकडे अनेक तरुणांचा ओढा आहे. केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर या कलाक्षेत्राची आवड असणारा तरुण वर्ग कोकणातला आहे. पिंगुळीतील ठाकर कला आंगण हे प्रेक्षकांचे एक आवडते ठिकाण आहे. कळसूत्री बाहुल्यांचे खेळ प्रसिद्ध आहेत. शक्तिवाले, तुरेवाले, नमन ह्या कला रत्नागिरी जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात आहेत. मुंबईत यांचेही प्रयोग होतात. ह्या सर्व कला वर्षानुवष्रे घराघरात जपणारा माणूस कोकणात आहे. त्याचा मोबदला किती हे त्याने कधीच महत्त्वाचे मानले नाही. मात्र कलेचा वारसा जपला. कलेला दैवत मानणारा कोकणी माणूस त्याच्या कलेचा आदर झालाच पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात असा एकमेव विभाग आहे. जिथे अल्प मानधनात काम करणारे कलावंत आहेत. व्यासपीठासाठीची त्यांची आग्रही धावपळ असते. कोकण पट्टय़ात ह्या सर्व लोककला वर्षानुवर्षे जपल्या जातात. त्यांच्याकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता राजाश्रय मिळायला हवाच.
साहित्याची जाण असलेली रत्ने याच भूमीत जन्माला आली. वि. स. खांडेकर, मंगेश पाडगावकर, विं. दा. करंदीकर, आरती प्रभू, कविवर्य वसंत सावंत यांसारख्या साहित्यिक मंडळींनी कोकणाची शान वाढविली. कोकण ही कलावंतांची भूमी आहे. यासाठीच म्हणावे लागेल आणि म्हणून या सर्व लोककलाकारांना वृद्धापकाळात योग्य मानधन मिळणे व ते नियमित मिळणे गरजेचे आहे. त्यांना उतारवयात राजाश्रयाची गरज आहे. तरुण कलाकारांना प्रोत्साहनाची गरज आहे. विषेशत: हे कलाकार ग्रामीण भागातले असल्याने आर्थिकदृष्टया सबळ नसतात.
ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कुणाच्या तरी आधाराची त्यांना गरज असते. म्हणूनच या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता कोकणातील सर्व लोककलेच्या उपासकांना योग्य तो सन्मान आणि योग्य ते मानधन मिळावे. जेणेकरून महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा या लोककलांना वाव मिळाले, कलावंताना प्रोत्साहन मिळेल आणि कोकणचा नावलौकिक आणखीनच वाढेल.