सारवण करणे हे आजच्या पिढीला माहिती असेलच असे नाही; पण नागेश्वराच्या मंदिरात महाराष्ट्रातील नव्हे तर परराज्यातील माता-भगिनी येथे येऊन चक्क सारवण करतात. नुसत्या हाताने नव्हे तर कुणी जिभेने.. तर कुणी डोक्याच्या केसाने ..नागवे गावाच्या नागेश्वराकडे जे जे आपण काही मागू ती ती इच्छा तो पूर्ण करतो अशी भक्तांची भावना आहे. विशेषत: महिलावर्ग नागरायाला आपला भाऊ मानतात. आपल्या मनातील वेदना सांगतात.एखादी इच्छा व्यक्त करतात ती पूर्ण झाल्यानंतर डोकीच्या केसाने तुझ्या समोर सडारांगोळी घालेन असा नवसही बोलतात. मनोमन विनंती करतात. अन् त्यांच्या समस्या दूर होतात अशी अनेकांची भावना आहे. याची प्रचिती आलेली मंडळी पौष महिन्याच्या सोमवारी नागेश्वरासमोर दाखल होतात. हा महिना म्हणजे भक्तिभावाचा ..या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी नागरायाजवळ असंख्य महिला भगिनी दाखल होत असतात.
कोकणचा सांस्कृतिक इतिहास अभ्यासताना पाताळ म्हणजेच कोकण प्रदेश व नागांचे मूळस्थान म्हणजे कोकण अशा प्रकारचे संशोधन इतिहासाचार्यानी केले आहे. या संदर्भातील अनेक अस्पष्ट दुव्यांचा ग्रंथातून अभ्यास झाला आहे. यातील निसटलेले बंध जुळविताना अनेक गूढ स्थळांचा उलगडा करताना एका महान संस्कृतीचे दर्शन होते. बहुजन परंपरा, लोककथा यांच्या साधनातून या सर्वाचा शोध घेताना आपल्या उच्च संस्कृतीचे, परंपरेचे समग्रपणे उलगडा करण्याचे आव्हान आपल्या समोर येते.
कोकणच्या भूमीतील संस्कृतीचे निसर्ग व मानव यांचं अतूट नात जपले आहे. आदिम संस्कृतीत निसर्गाशी असलेले नाते वृक्षदेवता, जलदेवता, वरुणदेवता, नागदेवता यांच्या रूपात वंदिले आहे. यक्ष व नाग या दोन्ही गोष्टी आपल्या पुरातन संस्कृती व मूर्तिकलेच्या विश्वात महत्त्वाचे स्थान मिळवून आहेत. लोकजीवनातील नाग संकल्पना निसर्गशक्ती दृढ व निगडित आहे. निसर्गातील शक्ती ज्यास गूढतेचे व भयाचे वलय आहे त्यांना पूजनाचे स्थान दिले आहे. असे गूढरम्य परंतु ज्या बाबतीत मनात भय दाटून राहते असे प्रतीक म्हणजे नाग! जो आपल्या धार्मिक संस्कृतीत इतिहास व इतिहासपूर्व काळापासून एक शक्तिपूजक घटक म्हणून सर्वमान्य झाला आहे.
आदिवासी जमातीपासून ते सुसंस्कृत असा समाज या प्रतीकाचे पूजन करतो. या नाग प्रतीकाचा सर्पाचा संचार सर्वत्र आढळतो. अनेक पुराण कथा, लोककथा, लोकगीत, लोकजीवन, अनेक मानवी भावभावना या प्राणी देवताच्या विळख्यात बंदिस्त आहेत. हा प्राणी म्हणजे नुसता सरपटणारा, डौलदार, फणा काढणारा आक्रमण करून चावा घेणारा महाभयंकर विषारी साप नसून तो आहे सृजनाचे प्रतीक, संतानदाता, प्राणदाता, प्रेरणादायी, धन-समृद्धीदाता, वास्तूचे रक्षणकर्ता, वास्तुपुरुष, जलतत्त्वाचा नागदेव, अर्धनाग, अर्धमानवी रूपात दैवत म्हणून स्थापित झालेला आहे.
लोककथांचा नायक आहे, त्याला अनेक कल्पनाविलासाचे पंख आहेत. नागरूपात शूरवीर, पूर्वजन्मीच्या अन्यायाने सूड घेणारे नाग-नागीन अशा हजारो कथा त्याच्याभोवती लोक वाङ्मयात सापडतात. या नाग प्रतिमेंची जुनी नोंद सिंधू संस्कृतीत सापडते. लोकगीतातून तो भाऊ, पिता, बंधू म्हणून पुरुषत्वाचा प्रतिनिधी अनंत काळापासून ज्ञात आहे. ‘नाग हे विश्वात्मक कामभावाचं प्रतीक मानवी मनाच्या गाभ्यात रुजून बसलेले आहे.’ आपण शास्त्रीय चिकित्सेत जात नाही. त्यामुळे आपण प्रतीक पूजेत असतो. वारुळ हे त्यांचे घर म्हणजे भूमी ही स्त्री तत्त्वाची प्रतिनिधी जगन्माता पार्वती तिचे रूप. जगपित्याचे विशाल रूप शिव. हा शिव नाग बंधनाने बांधलेले, असे हे शिवशक्ती स्त्री-पुरुषत्त्वाचे बद्ध रूप असा हा नाग, ज्याने शव वैष्णव, जैन व बौद्ध या धर्माना आपल्या शक्तीचा, संकल्पनेचा स्वीकार करायला लावला आहे. जो पूर्वजांच्या रूपात पूजला जातो.
ज्यास ब्राह्मण समजतात. जो गुप्त धनाचा रक्षक आहे. जो भूपुत्र आहे. ज्याची माता नागमाता क द्रू जी धरणी ही मूर्तरूप आहे. धनस्थानी त्याची शिल्प आढळतात. इष्टदेवता म्हणून त्याचे पूजन होते. अनेक राजे, राजवाडय़ाची ती कुलदेवता म्हणून पूजा केली जाते, पुराणात त्याला पृथ्वी पेलणारा आदीशेष, सर्परुपी वासुकी, अनंत अशा नावाने अनेक कथात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. समुद्रमंथनात मेरुपर्वताच्या रवीची दोरी बनलेला वासुकी, श्री विष्णूना शय्या देणारा शेष, चिमुरडय़ा कृष्णकन्हैयाकडून हतबल झालेला कालिया, शंकराच्या गळय़ातील व दंडातील शेष बंद, बुद्धाच्या चिंतन अवस्थेतील छत्र धरणारा मुधालिंद नाग, गौतम बुद्धाच्या जन्मावेळी नंद व उपनंद या दोन्ही नागांनी उष्ण व थंड पाण्याचे झरे निर्माण करून नवजात बाळाला स्नान घातले असा येत असलेला संदर्भ. त्यामुळे बौद्ध धर्मात अविभाज्य स्थान मिळविलेले नाग, जैनांचे २३ वे र्तिथकार पार्श्वनाथाचे रक्षण धारणेंद्र या नागाने केले. त्यामुळे पार्श्वनाथाच्या प्रतिमेमागे नागपूजा दाखविलेली असते.
अयोध्येचा राजा मांधात यांच्या पुत्राने पुरुकुत्सान नागकन्येशी लग्न केले. अर्जुनाने नागकन्या उल्फीशी लग्न केले. विक्रमादित्याने नागकन्या कुबेरगंगाशी लग्न केले. नागभट्ट नागराजाने प्रतिहारांचे साम्राज्य स्थापन केले. गजाननाच्या लंब उदराला नाग बंधन आहे. कृष्णाचा बंधू हा शेषाचा अवतार मानला गेला आहे.
रामाचा बंधू लक्ष्मण हा शेषाचा अवतार आहे. हे सर्व पाहता आर्य व नाग द्रविड यांच्या सामाजिक मिलनाचा इतिहास आहे, असे जाणवते. त्यामुळे पुराण कथातील प्रतीकांचा मिथकांचा अभ्यास करण्याचे मते नाग हे वंशचिन्ह आहे व त्यावरून नाग हे वंश नामाने ओळखले जातात. प्रत्यक्षात सर्पजात मनुष्य रूपांतर झालेले नाहीत. तर हजारो वर्षाच्या प्रवाहात प्रतीक हे सत्यात उतरले आहे. नवनाग पूजेचा मंत्रात हे वंश दिसून येतात. या नागराजाच्या अनेक कथा आणि देवस्थाने सांगता येतील. यातील एक देवस्थान म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नागवे गाव..
देवाकडून काही तरी मागताना आपणही त्याच्या ऋणात राहायला हवे. कोणाकडूनही काही घेताना आपण देण्याचीही वृत्ती जोपासायला हवी हे पूर्वजांनी जाणले आणि प्रत्येकाच्या मनात गुंतवलेही. यातूनच ग्रामदेवताकडे आपली इच्छा व्यक्त करताना, साकडे घालताना त्याची प्रचिती आल्यावर काही ना काही द्यायला हवे ही प्रथा रूढ झाली. इच्छापूर्तीनंतर कुणी देवाला दागिने घालतात कुणी देवाला आणखी काही करतो.अशा अनेक देवस्थानांची ख्याती आपल्याला माहितीच असेल. कणकवलीपासून काही मिनिटांच्या अंतरात असलेल्या नागवे गावातील नागरायासमोर अनेक महिला भक्त नवसपूर्ती म्हणून केसाने आणि जिभेने सारवण करतात, असे सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. दरवर्षी पौष महिन्यातील प्रत्येक सोमवारी या ठिकाणी दर्शनासाठी हजारो भक्तजन येतात. यात महिलांची संख्या लक्षवेधी असते.
या देवळातील काही भाग गाईच्या शेणापासून सारवल्यास त्या व्यक्तीच्या मनातील इच्छा नागेश्वर पूर्ण करतो, अशी आख्यायिका आहे. पूर्वी मंदिरात सडासंमार्जन व्हायचे. अलीकडे मंदिराच्या जीर्णोद्धार झाल्यावर मातीच्या जमिनीची जागा फरशीने घेतली तरीही प्रथा थांबलेली नाही. शेण म्हटल्यावर अनेक जण विचित्र चेहरा करतात. गायीच्या शेणाने केलेल्या सारवणाला पुराणात मोठे स्थान देण्यात आले असले तरी आज सारवण इतिहासजमा झाले आहे. आजच्या युगात वावरणा-या अनेकांना सारवण म्हणजे काय याची माहितीही नसेल. शेणात हात कसा घालायचा हा अनेकांसमोर प्रश्न असतो. मग सारवण म्हणजे नेमके काय करायचे ? असे आजच्या पिढीसमोर प्रश्न असतो. जिभेने अथवा केसाने सारवणे हे तर खूप लांबचे.. पण ग्रामीण भागातील मंडळीबरोबर शहरी भागातील माता भगिनी नागेश्वराच्या मंदिरात जेव्हा पोहोचतात तेव्हा तेथे सारवण करण्याच्या वैविध्यपूर्ण परंपरा पाहता येतात.
या सारवण्याचेही वेगवेगळे प्रकार येथे पाहायला मिळतात. काही भक्त सुहासिनी डोक्यावरील केसाने या परिसरात सारवतात. याला केसाने सारवण, असे संबोधले जाते. तर काही सुहासिनी जिभेने देवळाचा भाग सारवतात. गेली शेकडो र्वष ही नवस बोलण्याची आणि फेडण्याची अनोखी परंपरा नागेश्वरावर असलेली अपूर्व श्रद्धा आणि वैशिष्टय़ जपून आहे.
नागवे गावाला नावही या देवावरूनच मिळाले. येथील मंदिरात नागेश्वरासमोर सारवण करून नवस फेडण्याची परंपरा केव्हापासून सुरू झाली असावी, याची मात्र निश्चित माहिती मिळत नाही. देवावरच्या निस्सीम श्रद्धेपोटी सुहासिनी याच पद्धतीने नवस फेडतात, असे ग्रामस्थ सांगतात. नागवे गावच्या पश्चिमेस नदीजवळ घनदाट जंगलात सुमारे ३०० वर्षापूर्वीपासून स्थापन केलेले श्री देव नागेश्वर आणि पावणादेवीचे मंदिर आहे. या देवळात दरवर्षी पौष महिन्यातील सोमवारी भाविकांची नवस फेडण्यासाठी झुंबड उडते.
जिल्हय़ातून आणि परजिल्हय़ातूनही मोठय़ा संख्येने भाविक आपल्या मनातील इच्छा देवाजवळ सांगण्यासाठी या ठिकाणी येतात. मनातील मागण्या पूर्ण झाल्यावर बोललेला नवसही फार वैशिष्टय़पूर्ण रितीने फेडला जातो. हा नवस फेडण्याचा कालावधीही निश्चित करण्यात आलेला आहे. पौष महिन्याच्या सोमवारीच असे नवस फेडले जातात. आपली कृतज्ञता सुहासिनी व्यक्त करतात. जिभेने सारवणे शक्य नसते, या मुळे गायीचे शेण हाताने सारवून त्यावर जिभ टेकवली जाते.
सोमवारच का?
पौष महिन्याच्या सोमवारीच असे सारवण करण्याची प्रथा का? याबाबत गावातील ग्रामस्थ परंपरेकडे लक्ष वेधतात. इतर दिवशीही नागरायाचे दर्शन घेतले जातेच.पण सोमवार हा दिवस शेषाचा समजला जातो. गावातील अनेक पिढय़ा सोमवारीच असा नवस फेडत आले आहेत.त्यामुळे गावक-यांची या दिवशी दर्शन घेण्याबाबत श्रद्धा आहे. गावातील वडीलधा-या व्यक्तींच्या माहितीनुसार, नागवे गाव नागेश्वराच्या पवित्र अस्तित्वाने पुनीत झालेले आहे. पांडवही या भागात येऊन गेले असावेत. त्यावेळी या प्रदेशात सर्वत्र नागच नाग होते म्हणून या गावाला ‘नागवे’ नाव पडले. या मंदिराजवळच श्री पावणादेवीचे मंदिर आहे.
नवस फेडताना नागेश्वर मंदिरात नवस फेडून सुहासिनी ओटी भरण्यासाठी पावणादेवी मंदिरात येतात. पौष महिन्यात दर सोमवारी नवस फेडण्यासाठी भाविकांकडून अन्नदानही करण्याची परंपरा आहे. चौथ्या सोमवारी गावातील ग्रामस्थांकडून महाप्रसादाची सोय करण्यात येते. १ फेब्रुवारीला हा उत्सव होत आहे. कणकवली शहरापासून नजीकच असलेल्या गावात पोहोचल्यानंतर नागदेवतेवर असणारी अपार श्रद्धा कशी आणि किती आहे हे लक्षात येते.
या गावात सरपटणा-या कोणत्याही प्राण्यावर कोणी काठी उगारत नाही. एकीकडे सरपटणा-या प्राण्यांना मारू नये, त्यांना मित्र मानावे, असे पर्यावरणवादी सांगत असतात. या गावाने तर ही परंपरा शतकोन्शतके जपली आहे. हा वसा एका पिढीकडून दुस-या पिढीकडे सक्षमपणे नेला आहे. हे गाव म्हणजे नागासाठी अभयारण्यच आहे.