सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही. चांदा ते बांदा योजना राबविण्याचे स्वप्न दाखवून जिल्हावासियांची पालकमंत्र्यांनी फसवणूक केली आहे. पालकमंत्र्याचा कारभार दिशाहीन आहे.
कणकवली – सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही. चांदा ते बांदा योजना राबविण्याचे स्वप्न दाखवून जिल्हावासियांची पालकमंत्र्यांनी फसवणूक केली आहे. पालकमंत्र्याचा कारभार दिशाहीन आहे. जिल्हावासियांचा विकास करायचा असेल तर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि जिल्हय़ाच्या विकासाला हातभार लावावा, असा उपरोधिक टोला काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला. कणकवली येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात ते बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी गेल्या अडीच वर्षात जिल्हय़ाच्या जनतेला फसवण्याचे काम केले आहे. चांदा ते बांदा योजना अंतर्गत जिल्ह्याचा विकास करणार असे भासवणाऱ्या पालकमंत्र्यांनी केवळ थापा मारण्याचे काम केले आहे. या योजनेमधून जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. मात्र अशा कोणत्याही योजना जिल्ह्यात राबविल्या गेल्या नाहीत. विकास कामे करताना कोणत्याही योजनेत ते काम बसत नसलं तरी ते बसवा असे सांगणाऱ्या पालकमंत्र्यांनी योजनेची चेष्टा केली आहे.