‘केळी’ हे उत्तम पौष्टिक व शक्तिवर्धक फळ असून त्यात भरपूर प्रमाणात कार्बिय पदार्थ असतात. केळी मुख्यत: गरिबांचे फळ समजले जाते. कारण ते स्वस्त व भरपूर प्रमाणात वर्षभर उपलब्ध असते. भारतातून सौदी अरेबिया, इराण, कुवेत, जपान व युरोपिय बाजारपेठेत केळीची निर्यात होत असून परकीय चलन मिळवून देणारे हे नगदी पीक आहे.
महाराष्ट्रात जळगावनंतर कोकण किनारपट्टीतील हवामान केळी पिकास अतिशय पोषक आहे. शिवाय केळफुले व कच्ची फळे भाजीसाठी वापरली जातात. जाम, मुरंबे, चिप्स, वेफर्स इत्यादी पदार्थ बनविले जातात. तर उत्सवात कोळीचे पान मंगलचिन्ह म्हणून वापरतात.
केळी पिकासाठी साधारण उष्ण व दमट वातावरण अधिक फायदेशीर असते. यासाठी तापमान १५ अंश ते ४० अंश से. ग्रे. लागते. मुबलक पाणी या पिकास अनुकूल ठरते. तर कडाक्याची थंडी हानिकारक ठरते. केळी लागवड करण्यासाठी भारी कसदार सुपीक भुसभुशीत, मध्यम काळी किंवा उत्तम गाळाच्या जमिनीची निवड करावी.
बसराई, हरिसाल, सफेद वेलची, लाल वेलची, मुठेळी, लाल केळी अशा जाती आहेत. तर झाडांच्या खोडापासून निघणारे मुनगे (पिले) लावूनही लागवड करता येते. केळीची लागवड पावसाळयाच्या सुरुवातीला करावी. किंवा मुबलक पाणी असल्यास मे महिन्याच्या दुस-या पंधरवडयात करावी. लागवडीसाठी काढलेल्या मुनग्यांच्या कंदाचे वजन १ किलोपर्यंत असावे. उन्हाळयात जमीन चांगली नांगरून भुसभुशीत करुन घ्यावी. मातीमध्ये हेक्टरी सुमारे ५० टन शेणखत मिसळून घ्यावे.
१.५ बाय १.५ मीटर अंतर ठेवावे. शिवाय भातपिकास हेक्टरी ४५० किलो नत्र, १५० किलो स्फुरद द्यावे. केळीच्या प्रत्येक झाडाला खतांच्या मात्रा गोलाकार पद्धतीने लागवडीनंतर ४ ते ५ महिन्याच्या आत घ्यावा. केळी पिकाला उन्हाळयात पाण्याची कमतरता भासणार नाही. याची काळजी घ्यावी.
पाणी कमी असल्यास जमिनीवर पालापाचोळा टाकावा. शिवाय झाडाचे वय जमिनीचा प्रकार व हंगामानुसार पाणी देण्याच्या वेळा निश्चित कराव्यात. ४ ते ५ महिन्यांनी झाडाभोवती २० से. मी. उंच भर घालावी. केळीच्या बागेत मावा, सोंड, कीड, सुगकृमी, खोडकीड, मर रोग, शेंडा झुपका, सिगार अॅण्ड रॉट, करपा अशा प्रकारच्या रोग व किडींपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी बागेतील प्रत्येक झाडांवर योग्य त्या औषधांची फ वारणी करावी. लागवडीपासून वर्षाच्या आत झाडावर केळफूल येण्यास सुरुवात होते.
केळफूल आल्यापासून ४ ते ५ महिन्यांत घड कापणीस योग्य होतो. थंडीच्या दिवसात थोडा उशीर लागतो. केळीचा घड कापताना दांडेफळ लागलेल्या जागेच्या वर दीड फूट अंतर सोडून कापावा.
लांबच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी
७५ ते ८० टक्के तयार झालेला घड काढावा. घडाच्या टोकाला पॅराफीन लावल्यास फळे जास्त दिवस टिकतात. महाराष्ट्रातून केळया यांचे उत्पादन प्रति हेक्टरी ३० ते ३५ टनापर्यंत होते. प्रत्येक घडाचे वजन साधारण १० किलोच्या आसपास होते.
पिकविण्याच्या पद्धती भट्टी पद्धतीने केळी पिकविण्यासाठी बंद खोलीत केळय़ांचे घड एकावर एक पद्धतीने ठेवून वाळलेल्या पानांनी झाकून ठेवावेत. खोलीच्या एका कोप-यात शेणाच्या गोव-यांचा धूर करून ठेवावा. २० ते ४५ तास खोली बंद ठेवल्यास केळी पिकतात.